आभाळमाया - दिलासा कंटाळवाण्या व उबग आणणाऱ्या हिंदी व मराठी मालिकांमधून सुटका व्हावी म्हणून
संध्याकाळी पाचला डॉक्टरांची ओपीडी सुरू झाल्यानंतर झाडांना पाणी घालणं हा माझा
रोजचाच उपक्रम. नेहमीप्रमाणे पाइप नळाला जोडताना गेटमधून एका आजींना आत शिरताना
पाहिलं. बरोबर तिशीच्या नीटनेटक्या बाईंनी आजींचा तोल जाऊ नये म्हणून हाताला धरून
ओपीडीच्या बाहेर ठेवलेल्या बाकावर आणून बसविलं. एका छोट्या पिशवीतून आणलेल्या
बाटलीतील थोडं पाणी तिनं आजींना प्यायला दिलं. ""आई, दोन मिनिटं बसा हं, मी आत
नंबर लावून येते,'' असं म्हणून ती रिसेप्शनजवळ गेली. नंबर लावून आल्यावर ती
आजींना म्हणाली, ""आई, अजून नंबर यायला एक तास तरी लागेल. तुम्ही आत बेडवर जाऊन
झोपा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते,'' असं म्हणून तिनं पुन्हा हाताला धरून आजींना
आत कॉटवर आणून झोपवलं. पाच मिनिटांतच ती चहा घेऊन आली. चहा बशीत ओतून हातानं बशी
धरून आजींना तिनं चहा पाजला. कंपाउंडरनं नाव पुकारल्यावर तिनं आजींना आत
केबिनमध्ये डॉक्टरांकडे नेऊन तपासून आणलं. पुन्हा बाकावर बसवलं. मेडिकलमधून औषधं
आणून कंपाउंडरला दाखवून बिल जमा केलं व आजींना हाताला धरून सावकाश पायऱ्या उतरू
लागली.
मायलेकीचं हे अतूट प्रेम बघून मला राहवलं नाही व अभावितपणे तिला म्हटलं, ""आईची
फार काळजी घेताय बरं का तुम्ही आणि शेवटी आईची काळजी लेकच घेणार. कारण आजकालची
मुलं व सुना...'' माझं बोलणं ऐकून किंचित हसत त्या बाई म्हणाल्या, ""बाईसाहेब, या
माझ्या सासूबाई आहेत. थोडक्यात माझ्या आईच म्हणाना. आणि खरं सांगू मॅडम, मी जर
कधी आजारी पडले तर माझ्या आईपेक्षाही सासूबाई माझी जास्त काळजी घेतात आणि कर्तव्य
म्हणून मी हे करत नाही. पण जसं लग्न झालंय तसं आमच्यात आई व मुलीचं नातं आहे.
आमच्या दोघींचं संभाषण ऐकून आजींच्या चेहऱ्यावर आजारी असूनदेखील आश्वासक भाव
दिसले. "बरं येते बाईसाहेब' असं म्हणत आजींचा हात धरून ती बाहेर पडली. दोघींच्या
पाठमोऱ्या आकृतीकडे मी बराच वेळ कौतुकानं बघत होते.
माझ्या मनात प्रश्न आला, रोज आपलं डोकं सुन्न करणाऱ्या या मराठी व हिंदी
मालिकांमध्ये का बरं सासूचं किंवा सुनेचं इतकं विकृत रूप दाखवत असतील? खरंच
मालिकांमध्ये दाखवतात तितक्या सासवा दुष्ट, कजाग व क्रूर आणि सुना कपटी, मतलबी
आणि पाताळयंत्री असतात का? आणि ते जर खरं असेल तर आताच बाहेर गेलेल्या या
दोघींच्या नात्याचा अर्थ काय? प्रसारमाध्यमं खरंच आपली भूमिका, कर्तव्य विसरले
आहेत का? बदलत्या जीवनशैलीतील बिघडणारे नातेसंबंध दुरावणारी नाती आणखी दूषित करून
नात्यांची चिरफाड करण्याचा उद्योग तर या मालिकांना सुरू केला नाही ना?
सद्सद्विवेकबुद्धी तर या निर्मात्यांनी गहाण ठेवली नसेल? त्यांच्याबरोबर
दर्शकांचीही बुद्धी भ्रष्ट होईल इतक्या अतर्क्य घटनांची रेलचेल, मेंदूला अजीर्ण
होईल इतका पराकोटीचा हिंसाचार, सूड आणि मत्सर दाखविण्यातच ते धन्यता मानतात का? हे
व अशा अनेक प्रश्नांचं मोहोळ.
या मालिकांचं दुष्टचक्र थांबेल तेव्हा थांबेल, परंतु नाती इतकी तकलादू नसतात, हा
दिलासा आताच दवाखान्याबाहेर गेलेल्या सासू-सुनांनी दिल्यामुळे नुकतीच पाणी दिलेली
झाडं जशी तजेलदार व टवटवीत झाली, तसंच माझ्या मनातील शंका व निराशेचं मळभही दूर
झालं.
- सौ. नीता सावंत |