नवी दिल्ली : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने चार गडी राखून विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली. या सामन्यातील विजयात जेवढा फलंदाजांचा वाटा होता तेवढाच टेल एण्डर म्हणून आलेल्या शार्दुल ठाकूरचाही होता. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने त्याचे अस्सल मराठीत कौतुक केले आहे.
शार्दुलने गोलंदाजीत 66 धावा दिल्या तरी संघाला गरज असताना त्याने केवळ सहा चेंडूंमध्ये 17 धावा चोपल्या. विजयानंतर कोहलीने ट्विटरवर शार्दुलसोबतचा फोटो टाकत ''तुला मानला रे ठाकूर'' असे कॅप्शन दिले आहे.
विंडीजने दिलेल्या 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी भक्कम सुरवात करुन दिली. भारताची धावसंख्या दोन बाद 188 असताना डाव गडगडला आणि भारताची अवस्था पाच बाद 228 झाली. त्यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवला. कोहली 85 धावांवर बाद झाला तेव्हा भारताला 23 चेंडूंमध्ये 30 धावा हव्या होत्या.
कोहलीनंतर जडेजा आणि शार्दुल ठाकूरने भारताला विजय मिळवून दिला. 48व्या षटकात भारताला 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंत तीन धावा काढल्यावर शार्दुलने पुढील चेंडूंवर षटकार खेचला. त्यानंतर लगेच त्याने चौकार मारला. त्यामुळे त्या षटकात भारताने 15 धावा केल्या आणि पुढील षटकात विजय संपादन केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.