farmer budget : सणासुदीत बिघडले शेतकऱ्यांचे ‘बजेट’...सोयाबीन उत्पादकतेत घट

farmer budget : खरीप हंगामातील सलग अतिवृष्टीमुळे वाशीम जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असून, दिवाळी साजरी करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
farmer budget
farmer budgetsakal
Updated on

शिरपूर : यावर्षी खरीप हंगामातील जुलै ते सप्टेंबरमध्ये झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यातच बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ उपयोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोयाबीनचा बेल्ट म्हणून वाशीम जिल्हा ओळखला जातो. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे खरीपातील मुख्य पीक मानले जाते. जिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण या सोयाबीनच्या पिकावरच अवलंबून असते. यावर्षी खरिपामध्ये सुरुवातीला पर्जन्यमान समाधानकारक होते. त्यामुळे पेरणी ही वेळेवरच आटोपल्या होत्या. मात्र जुलैपासून ऑगस्टपर्यंत पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त झाले.

अनेक तालुक्यातील मंडळामध्ये सोयाबीनच्या वाढीच्या अवस्थेमध्ये व शेंगा परिपक्व होण्याच्या काळामध्ये व नंतर काढणीच्या काळामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर, करंजी, मुंगळा, मालेगाव व इतर मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. यामुळे ऐन काढणीला आलेले सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते.

सध्या सोयाबीन काढणीचे काम शेतकऱ्यांकडून जोमात सुरू आहे. मात्र सोयाबीनचा एकरी उतारा प्रचंड प्रमाणात घटला आहे. एक एकरमध्ये तीन ते चार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत आहे. सदर पिकाला २० ते २५ हजार रुपये एकरी उत्पादन खर्च येतो व बाजारामध्ये सोयाबीनचे बाजार भाव गडगडल्याने सोयाबीन पिकाचे अर्थकारण बिघडले आहे. शेती उपयोगी साहित्याचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.

उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा निघत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता पंधरा दिवसानंतर येणारा दिवाळी सण कसा साजरा करावा या विवंचनेत सध्या शेतकरी दिसत आहे. शेतकऱ्याचे सर्वच अर्थकारण या पिकावर अवलंबून असल्याने शेतकरी डबघाईस आला आहे.

आता पुढे रब्बी पिकासाठी येणारा खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य, दैनंदिन घर खर्च कसा करावा यामध्ये शेतकरी अडकला आहे. या बाबीसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात व शेतकरी वर्गास या विवंचनेतून बाहेर काढावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दर

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीन पिकाला आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळत आहे. तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपयांपर्यंत येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती शिरपूर येथे भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

आकांक्षित जिल्ह्याचा वाली कोण?

वाशीम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून शासन दरबारी नोंद आहे. असे असताना २०२३ मधला पिकविमा अद्याप शेतकऱ्यांना मिळला नाही व यावर्षी सुद्धा पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व मात्र तोंडावर बोट ठेवून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कोणीच वाली उरला नाही का, अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.