Crop Damage : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला ! बाळापूर तालुक्यात निसर्गाचा प्रकोप

Soybean Cotton Crop Damage : बाळापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून तातडीने नुकसान भरपाईची मागणी आहे.
Crop Damage  akola
Crop Damage sakal
Updated on

बाळापूर : तालुक्यात निसर्गाचा प्रकोप सुरूच आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे नित्याचेच झाले. यंदा मात्र, यापेक्षा भयंकर परिस्थितीचा सामना बाळापूर तालुक्याला करावा लागत आहे. एकाच हंगामात आलेले दोन संकट सर्व काही घेऊन गेले आहे. परतीच्या पावसाने हातात आलेला घास हिरावून घेतला.

वर्षभर राबूनही हातात दमडी पडणारच नाही, तर झालेला खर्च कोठून काढायचा या चिंतेत पुढच्या वर्षीचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. खरीप हंगामाला मोठा तडाखा बसला आहे. सोंगणी करून ठेवलेले ५० टक्के सोयाबीन पावसात भिजले आहे, तर कपाशीला देखील परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले आहे. त्यामुळे भर दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात शिमगा करण्याची वेळ अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

गुरुवारी (ता. १०) सायंकाळच्या सुमारास विजांच्या प्रचंड गडगडाटासह बरसलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या सोंगूण ठेवलेल्या गंजी पावसात भिजल्या आहेत. खरीप हंगामासाठी तब्बल ६० हजार ८४९ हेक्टर क्षेत्रापैकी ३० हजार ५२३ हेक्टरवर सोयबीनची पेरणी झाली आहे. १८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यापैकी नव्वद टक्के सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे भुईसपाट झाले आहे, तर अतिवृष्टीतून कसेबसे वाचलेल्या सोयाबीन पिकाला पुन्हा परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे.

शासनाने फिरवली पाठ

परतीच्या पावसामुळे खरिपाचे प्रचंड नुकसान झाले, शेती खरडून गेली. एवढे प्रचंड नुकसान होऊनही सरकार आणि प्रशासन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कागदी घोडे नाचवत आहेत. विमा कंपन्या नुकसानीचा पुरावा मागत आहे. झालेल्या नुकसानीचे ऑनलाइन फोटो डाऊनलोड करण्याच्या सूचना देत आहेत. शेतकरी चिखल तुडवत झालेल्या नुकसानीचे फोटो काढण्यासाठी शेतात जात आहे. मात्र, याचवेळी विमा कंपन्यांचे सर्व्हर डाऊन होत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सोयाबीनच्या घुगऱ्या होण्याची शक्यता

धुवाधार पावसाने अक्षरशः सोयाबीनच्या घुगऱ्या आणि कापसाच्या वाती होण्याची शक्यता आहे. शेतात काढून ठेवलेले सोयाबीनचे ढिगारे पूर्णपणे भिजले आहेत. नुकसान झालेला शेतकरी आता चिंतेत आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांवर यंदा शिमगा करण्याची वेळ आली आहे. कारण एकरी सोयाबीनचा खर्च वीस हजाराच्या घरात आहे, तर एकरी कापसाचा खर्च सोळा हजाराच्या घरात आहे. पदरात मात्र काहीच नाही.

शेतातील शंभर टक्के पीक वाया गेले आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना बांधावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी.

- निरंजन शिरसाट, शेतकरी, बाळापूर.

शेतात सोंगूण ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी पावसामुळे भिजत आहेत. परिणामी शंभर टक्के नुकसान झाले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांचा विमा कंपनीवर विश्वास राहणार नाही.

- सुधाकर देशमुख, शेतकरी, रिधोरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.