Durgadevi sakal
संस्कृती

Navratri Utsav : शक्तीचा उत्सव आणि जागर

सकाळ वृत्तसेवा

नवरात्र हा देवीचा उत्सव. देवी या शब्दातच तिचे सुंदर, सालंकृत, सुवर्णाचे दागिने घातलेले स्वरूप डोळ्यासमोर येते. भारतीय संस्कृतीने योजलेला नवरात्र उत्सव अंतर्बाह्य शुद्धी करणारा आणि शक्ती वाढवणारा उत्सव आहे.

शक्ती हा सर्वांच्याच श्रद्धेचा व आवडीचा विषय आहे. प्राचीन भारतीय शास्त्रात शक्तीला देवतास्वरूप मानले आहे, किंबहुना शक्तीच्या विविध स्वरूपांनाच आपण वेगवेगळ्या देवींची नावे दिलेली आहेत.

बुद्धी व स्मरणशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या विद्येची देवता म्हणजेच सरस्वती देवी, कर्मशक्तीच्या संपन्नतेतून साध्य होणाऱ्या संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मी देवी, शरीरशक्तीच्या साहाय्याने दुष्ट व अभद्र गोष्टीचे नामोहरम करणारी दुर्गादेवी, संपूर्ण वैश्विक शक्तीवर अधिकार असणारी गायत्रीदेवी अशा सर्वच देवता शक्तीशी संबंधित असल्याचे सापडेल.

आयुर्वेदात तर शक्तीला सर्वोत्तम स्थान दिलेले आहे. इंद्रिय, मन व आत्मा यांची प्रसन्नता हे आरोग्याचे लक्षण असते व शक्तीशिवाय आरोग्य नसते. शक्‍ती आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. या शक्‍तीला पुन्हा चैतन्याचा स्पर्श व्हावा, तजेला यावा यासाठी भारतीय संस्कृतीने ‘नवरात्र’ उत्सवाची योजना केली आहे.

पावसाळ्यात अनेक दिवस सूर्यदर्शनाच्या अभावामुळे आलेले मानसिक जाड्य दूर करण्यासाठी बाह्य अग्नीची उपासना, शक्तीची उपासना महत्त्वाची ठरते. नवदुर्गा उपासना व शक्ती उपासना करणाऱ्यांसाठी नवरात्र हा अमृतयोग होय. पुरेशी शक्ती मिळाली आणि शक्तीचा अपव्यय न करता तिचा योग्य वापर करायची कुशलता लाभली, तर संपन्न, यशस्वी जीवनाचे स्वप्न साकार होणे अवघड ठरणार नाही.

मधले एक केंद्र (न्यूक्लिअस) व आजूबाजूचे आठ हे एक शक्तीचे विशिष्ट स्वरूप समजले जाते आणि अशा शक्तीसुद्धा नऊ आहेत, हे लक्षात येऊ शकते. जिवाची मनुष्यजन्मापर्यंतची वाटचाल पूर्ण होण्यासाठी, म्हणजे गर्भधारणेपासून बालकाचा जन्म होण्यासाठी नऊ महिने, नऊ दिवस, नऊ तासांचा कालावधी सांगितलेला आहे. जीवोत्पत्ती होताना ९च्या क्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय संस्कृतीने शरद ऋतूमध्ये ९ रात्र, अर्थात नवरात्राची योजना केलेली दिसते.

आठवण सृजनाची

शारीरिक शक्तीच्या पाठोपाठ मानसिक व आध्यात्मिक शक्तीच्या आवाहनाचा हा उत्सव. उपासनेने अग्नी प्रकट करण्याचा व सावकाश सावकाश वाढवत नेण्याचा मार्ग भारतीय परंपरेने सांगितलेला आहे. या शक्तीच्या उपासनेत आपल्याला जीवोत्पत्ती कशी होते, अन्न कसे तयार होते, सृष्टी कशी तयार होते याची प्रचिती यावी यासाठी थोडीशी माती घेऊन, त्यात धान्य टाकून, त्यावर पाण्याने भरलेला मातीचा कलश ठेवतात.

सृजनाची आठवण राहावी या हेतूने धान्य पेरले जाते, सातत्य व पायरी पायरीने उत्क्रांत होणाऱ्या शक्तीचे स्वरूप सुचवण्यासाठी फुलांची माळ टांगली जाते. सूर्य ही प्रकाशाची देवता. प्रकाश म्हणजे अग्नी, प्रकाश म्हणजे ज्ञान व प्रकाश म्हणजे जीवन. या प्रकाशाची उपासना सुचवण्यासाठी नऊ दिवसांपर्यंत २४ तास नंदादीप तेवत ठेवणे, हवन, अन्नदान, कुमारी पूजन या गोष्टी केल्या जातात.

शक्तीचे उत्थान व्हावे व ती शक्ती शरीरात चलित व्हावी या हेतूने अनेकांनी जमून स्वतःभोवती व वर्तुळात घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गोल गोल फिरत नृत्य करण्याचा प्रघात आहे. या नृत्य प्रकाराला गरबा किंवा रिंगण नृत्य असे म्हणतात. शक्तीला आकृष्ट करून त्या शक्तीचे आवर्तिकी उत्थापन व्हावे या हेतूने नृत्याच्या मध्यभागी दीप ठेवला जातो, तसेच वातावरणाच्या शुद्धतेसाठी धूप केला जातो.

दिवसभर केलेल्या उपवासामुळे तयार झालेल्या शक्तीला आपल्यामध्ये आकृष्ट करण्यासाठी सायंआरतीचे आयोजन केले जाते. अत्यंत श्रद्धापूर्वक व भक्तियुक्त हृदयाने ही उपासना करायची असते, तसेच नवरात्रात शक्तीउपासना करत असताना शरीर शुद्ध राहावे या हेतूने स्नान, उपवास हे सर्व आचरणात आणणे आवश्यक असते.

अशा प्रकारे नवरात्रात देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही रूपात असलेल्या शक्तीची उपासना केली जाते. या सगळ्यामुळे शरीरातील दोष गेले, अहंकाराचा नाश झाला व नित्यानंद - परमानंदाचा अनुभव मिळाला की या उत्सवाचे सार्थक होते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे लिखित, संतुलन आयुर्वेद द्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT