Narendra Modi Esakal
देश

Narendra Modi : वाराणसीत ‘आयेंगे तो मोदीही’

सकाळ डिजिटल टीम

वाराणसी : ‘‘गेल्या दहा वर्षात वाराणसीचा संपूर्ण चेहरा पालटला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच’’; ‘‘ज्यांची पाच हजार कमाई नव्हती ते दहा पटीने कमावतात’’; ‘‘आयेंगे तो मोदी ही’’; ‘‘इथे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाहीच’’ अशा भावना आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील नागरिकांच्या. येथे मोदींची लाट नव्हे तर त्सुनामी असल्याचे दिसून येते. पंतप्रधान मोदी २०१४ आणि २०१९ मधील मतांचा विक्रम मोडतील असे येथील चित्र आहे. येथे एक जून रोजी इथे मतदान होणार आहे. वाराणसीत कोणत्याही उमेदवाराचे साधे फलकही नाही. प्रचारही नाही. परंतु त्याने इथे काहीच फरक पडत नाही. महत्त्वाच्या विरोधी पक्षाचे उमेदवार केवळ मोदींच्या विरोधात उभे राहिल्याने आपली राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते याच समाधानासाठी उभे आहेत.

नरेंद्र मोदी २०१४ मध्ये वाराणसीमध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामांना वेग आला आहे, असा दावा अनेक स्थानिक करतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे वाराणसीतून सलग चौथ्यांदा रिंगणात आहेत. त्यांचा वाराणसीत चांगला प्रभाव असला तरी परंतु मोदींपुढे त्यांचा निभाव लागणार नाही याची त्यांना जाणीव आहे. २०१९ मध्ये अजय राय यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत एक लाख ५२ हजार मते घेतली. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांनी एक लाख ९५ हजार मते घेतली. तर पंतप्रधान मोदींनी सहा लाख ७५ हजार मतांचा आकडा पार केला होता. यावेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र असल्याने राय यांची मते काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

पूर्वांचलमध्ये वेगळे चित्र

उत्तर प्रदेशातील पूर्वांचलचे चित्र मात्र २०१९ च्या तुलनेत भाजपसाठी फारसे समाधानकारक दिसत नाही. भाजप उत्तर प्रदेशात ८० पैकी ७५ जागा लढवत आहेत तर, पाच जागा भाजपचे मित्रपक्ष लढवत आहेत. दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीतून समाजवादी पक्ष (६२), काँग्रेस (१७) आणि तृणमूल काँग्रेस (१) जागा लढवत आहे. पहिल्या तीन टप्प्यांत उत्तर प्रदेशच्या २६ जागांवर मतदान झाले आहे. या जागांवरील कौल संमिश्र दिसतो. पूर्वांचलमधल्या १३ लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. २०१९ मध्ये भाजपने नऊ तर अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलाने दोन जागा जिंकल्या होत्या. घोसी आणि गाजीपुरमध्ये बहुजन समाज पक्षाला(बसप) विजय मिळाला. यावेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे ‘इंडिया’ आघाडीचे भाग असल्याने पूर्वांचलमध्ये मतांचे विभाजन होताना दिसत नाही. तसेच यावेळी मायावतींचा विशेष प्रभाव जाणवत नसल्याने त्यांच्या मतदारांचा ओघ ओसरू शकतो परंतु तो भाजपकडे जातो की सप, काँग्रेसकडे तेही पाहावे लागेल. शहरी भागात भाजपचा प्रभाव अधिक आहे. ग्रामीण भागात मात्र मतदारांचा कौल ‘इंडिया’ आघाडीकडे अधिक दिसतो. अखिलेश यांचा ग्रामीण भागात प्रभाव आहे.

सतत बदलते उमेदवार

आझमगडमध्ये बसपने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला आहे. आधी माजी प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना उमेदवारी दिली होती. परंतु मायावतींनी राजभर यांना सलेमपूर मतदार संघात निवडणूक लढवायला सांगितले आणि आझमगड मधून शबिहा अंसारी यांना उमेदवारी दिली. आता त्यांनी अंसारी यांना हटवून मशहूद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. आझमगडमधून राजभर यांना हटविल्यानंतर भाजपने सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे.

त्यामुळे मायावतींची भाजपला मदत होत असल्याचे मानले जाते. आझडमधून भाजपचे दिनेशलाल यादव हे विद्यमान खासदार आहेत. तर समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव रिंगणात आहेत. आझमगड हा समाजवादी पक्षाचा गड मानला जातो. २००९ मधील पूर्वांचल स्थिती पाहिली तर तेरा लोकसभा मतदार संघापैकी केवळ वाराणसी आणि आझमगड हे भाजपकडे होते. सहा मतदार संघ समाजवादी पक्षाकडे तर पाच ठिकाणी बसपचे खासदार होते. २०१४ मध्ये मोदींच्या झंझावाताने येथील चित्र बदलले. आता दोन वगळता संपूर्ण मतदार संघ भाजप आणि मित्रपक्षांकडे आहेत.

परंतु यावेळी हे सगळेच मतदारसंघ टिकवून ठेवणे भाजपसाठी मोठे आव्हान ठरत आहे. रोजगार, महागाई या महत्त्वाच्या प्रश्‍नांसोबत जातीय समीकरण, काँग्रेस-सपची आघाडी यामुळे वाराणसी वगळता एकाही मतदार संघात कोणाच्याही बाजूने स्पष्ट कौल दिसत नाही.

वाराणसीत रोजगार वाढला

विश्वनाथ धाम कॉरिडॉरमुळे रोजगारात मोठी वाढ

गेल्या चार वर्षात पर्यटक व भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ

वाराणसीमधील हॉटेल व्यवसायाचाही कायापालट

हॉटेलची संख्या पाचशेवरून तीन हजारांवर

पर्यटक आणि भाविकांमुळे गंगेच्या पात्रात नाविकांचा व्यवसायही तेजीत

उन्हामुळे फटका बसण्याची शक्यता

पूर्वांचलमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. परंतु यावेळेस पूर्वांचलमध्ये एक जून रोजी मतदान होणार असून त्यावेळेस तापमान हे ४८ अंशापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळे मतदार बाहेर कसे पडू शकतील हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT