लोकसभा निवडणुकांचे निकाल काल (मंगळवार) जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांचे ४०० पारचे स्वप्न भंगले आहे. मोदींना सत्ता स्थापनेसाठी आता मित्रपंक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मुदा भाजपने प्रचारात देखील जोरदार गाजवला. मात्र भाजपला याचा फार फायदा झाला नाही. उलट उत्तर प्रदेशाच भाजपच्या जागा कमी झाल्या. राम मंदिर असलेल्या अयोध्येत देखील भाजपला फटका बसला. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणी नंतर ही पहीलीच निवडणूक होती. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने ४०० पारचा नारा दिला. मात्र त्यांना आत्मविश्वास नडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ अनेक बड्या नेत्यांनी प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. तसेच काँग्रेस राम मंदिरावर बुलडोझर चालवेल, अशी हवा देखील भाजपने पसरवली. मात्र भाजपचा डाव त्यांच्यावरच पलटला. ज्या अयोध्येत राम मंदिर आहे त्याच अयोध्येत भाजपला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. अयोध्येच्या आसपासच्या सर्व जागा देखील भाजपने गमावल्या.
अयोध्येत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. भाजपचे विद्यमान खासदार आणि फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार लल्लू सिंह यांचा सपा उमेदवार अवधेश प्रसाद यांनी पराभव केला आहे. अखिलेश यादव यांनी फैजाबादच्या जागेवर राजकीय प्रयोग केला होता. ही एक सर्वसाधारण जागा होती आणि दलित समाजातील अवधेश प्रसाद यांना उमेदवारी दिली, जिथे त्यांना ५५४२८९ मते मिळाली तर भाजपच्या लल्लू सिंह यांना ४९९७२२ मते मिळाली. अशाप्रकारे अवधेश प्रसाद ५४५६७ मतांनी विजयी झाले. हा तोच फैजाबाद लोकसभा मतदारसंघ आहे, ज्याला अयोध्या म्हणतात.
भाजपकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठेमध्ये विरोधी पक्षांचा सहभाग नसणे हा राजकीय मुद्दा बनवण्यात आला होता. काँग्रेस आणि सपासह मोठ्या विरोधी नेत्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहिल्यावर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. सपा-काँग्रेसचे सरकार आल्यास राम मंदिरावर बुलडोझर फिरवून राम लल्लाला पुन्हा तंबूत पाठवेल, असे भाजपने म्हटले होते. मात्र भाजपला केवळ अयोध्येतच नाही तर आजूबाजूच्या १००-१०० किलोमीटरवरही विजय मिळवता आला नाही. अयोध्या जागेवरील निवडणूक हरण्याबरोबरच अयोध्या विभागातील फैजाबाद, बाराबंकी, आंबेडकर नगर, सुलतानपूर आणि अमेठी लोकसभा जागाही भाजपने गमावल्या.
एवढेच नाही तर अयोध्येला लागून असलेल्या बस्ती, श्रावस्ती आणि जौनपूरच्या जागाही भाजपला वाचवता आल्या नाहीत. योगी सरकारने विमानतळापासून अयोध्येपर्यंत सर्व प्रकारची विकासकामे करून केली, पण त्याचा कोणताही राजकीय परिणाम दिसून आला नाही. राज्यातील सर्वात हॉट सीट असलेल्या अयोध्येतील राजकीय लढाई जिंकण्याबरोबरच सपाला आजूबाजूच्या सर्व जागा जिंकण्यात यश आले.
अयोध्येपासून बलियापर्यंत भाजपचा पूर्णपणे सुफडा साफ झाला. अयोध्येला लागून असलेल्या बाराबंकी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तनुज पुनिया यांनी भाजप उमेदवार राजरानी रावत यांचा २१५७०४ मतांनी पराभव केला आहे. अयोध्येला लागून असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांच्याकडून १ लाख ६२ हजार मतांनी पराभव झाला. त्याचप्रमाणे अयोध्येला लागून असलेल्या सुलतानपूर लोकसभा जागेवर सपाचे राम भुआल निषाद यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनिका गांधी यांचा पराभव करण्यात यश मिळवले.
भाजपने विमानतळ वैगरे अशी अनेक कामके केली पण स्थानिक विकास करण्यात भाजप कमी पडली. हे विमानतळ करत असताना आजुबाजुला भूसंपादन झाले, होत आहे. यामुळे अनेक गावे संतप्त होती. अनेकांना मोबदला देखील मिळाला नाही.
अयोध्येतील मंदिरात स्थानिक लोक फार कमी जातात.अयोध्येत बाहेरचे भक्त जास्त असतात. आम्ही देखील रामाची पूजा करतो पण आमची उपजीविका हिरावून घेतल्यास तर आम्ही कसे जगणार?, रामपथाचे बांधकाम झाले तेव्हा पोट भरण्याची जागा बांधकामात गेली. वेगळी व्यवस्था करण्यात येईल, असं सांगितलं. पण आम्हाला काहीही मिळालं नाही, असे एका व्यवसायिकाने इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.
अवधेश प्रसाद म्हणाले, भाजप सरकारने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अनेक लोकांचे व्यवसाय उद्धवस्त केले. त्यांच्या जमीनी हिसकावून घेतल्या. मात्र यांना योग्य मोबदला देण्याचे काम मी करेन
अवधेश प्रसाद दलित नेता असल्यामुळे भाजपची मते त्यांचेकडे हस्तांतरीत झाली. अवधेश प्रसाद सपाचे प्रमुख नेते असून ते ९ वेळा आमदार राहिले आहेत. भाजपच्या पराभवात बेरोजगारी, महागाई, भूसंपादन ही कारणे महत्वाची ठरली. विरोधकांचा संविधान बदलण्याचा प्रचार देखील इथं जोरात झाला. भाजप उमेदवार लल्लू सिंह यांचे एक विधान देखील इथं वादग्रस्त ठरले. संविधान बदलण्यासाठी भाजपला ४०० जागांची गरज असल्याचे ते म्हणाले होते. एका खासदाराने असे बोलायला नको होते, असे अनेक नागरिकांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.
पेपर लिक प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे उत्तर प्रदेशात मोठे नुकसान झाले. लोकांना परिवर्तन हवे होते. कारण भाजपच्या खासदाराने राम मंदिर आणि राम पथ पांढरे करण्याशिवाय कोणतेही काम केले नाही. अयोध्येत रहिवासी वस्तीत प्रचंड गैरसोय आहे.
अयोध्येत झालेला विकास हा बाहेरील लोकांसाठी झाला. अयोध्येतील लोकांसाठी कोणतेही काम झाले नाही. भाजपला आपण अजिंक्य आहोत असे वाटत होते. पण लोकशाही मुळे आश्चर्यकारक काम केले, असे एका टेंट हाऊस चालवणाऱ्या व्यवसायिकाने सांगितले.
लल्लू सिंह यांनी आपला पराभव मान्य केला आहे. मी अयोध्येचा सन्मान राखू शकलो नाही. माझ्यात काही दोष असेल. मोदी-योगी यांचे नेतृत्व असूनही हे का घडले, याचे मी आत्मपरिक्षण करेन, असे लल्लू सिंह म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.