पाटणा : बिहारमधील जगप्रसिद्ध महाबोधी मंदिराचा परिसर आणि बोधगयेच्या परिसरातील जमिनीखाली वास्तूचा मोठा ऐतिहासिक ठेवा दडलेला असल्याचे उपग्रह छायाचित्रे आणि भू सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. राज्याच्या कला, संस्कृती आणि युवक कल्याण विभागाच्या ‘बिहार हेरिटेज सोसायटी’ने (बीएचडीएस) ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठाच्या सहकार्याने येथे संशोधन केले होते. महाबोधी मंदिर परिसराचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश होतो. भगवान बुद्धांना याच ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
या वारसास्थळाच्या खालीच हा वास्तू ठेवा असल्याने त्या ठिकाणी आणखी उत्खनन होणे गरजेचे असल्याचे कला, संस्कृती, युवक कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हरजतकौर बाम्हराह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चिनी बौद्ध भिक्षु युआन त्संग यांच्या भारत प्रवासाच्या ऐतिहासिक पाऊल खुणांचा शोध घेण्यासाठी कार्डिफ विद्यापीठ आणि ‘बीएचडीएस’च्या सहकार्याने एक शोध प्रकल्प राबविण्यात येत आहे. बंगळूरमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज’च्या अभ्यासक आणि या प्रकल्पातील एक सदस्य एम.बी.रजनी म्हणाल्या की,‘‘ महाबोधी मंदिराखाली असलेल्या वास्तू ठेव्याची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे आणि युआन त्संग यांनी केलेले वर्णन हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’
निरंजना नदी वळली
महाबोधी मंदिराच्या परिसरामध्ये ५० मीटर उंचीच्या आणखी एका मंदिराचा समावेश आहे. याशिवाय बोधीवृक्ष, भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीशी संबंधित सहा पवित्रे स्थळे आणि प्राचीन स्तूप या परिसरामध्ये पाहायला मिळतात. सातव्या शतकामध्ये भारतात आलेल्या युआन त्संग यांच्या प्रवास मार्गाचा कार्डिफ विद्यापीठ विविध मार्गाने अभ्यास करते आहे. उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रामध्येच निरंजना नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वळल्याचे दिसून येते. सुजाता स्तूप आणि अन्य ऐतिहासिक अवशेष हे या नदीच्या पूर्वेला आहेत. सध्या पूर्वेला असलेली अनेक ऐतिहासिक वारसास्थळे ही महाबोधी मंदिरापासून वेगळी मानली जातात. नव्या संशोधनानुसार दोन्ही मंदिरे, सुजाता स्तूप आणि अन्य काही वारसास्थळे ही कधीकाळी नदीच्या एकाच काठावर होती. सध्या नदीच्या पूर्वेला असलेली काही स्थळे ही कधीकाळी महाबोधी मंदिराचाच भाग असण्याची अधिक शक्यता आहे. आता नव्या संशोधनातून जी माहिती समोर आली आहे तिचा विचार करून महाबोधी मंदिर परिसराच्या सीमांची फेरआखणी करण्यासाठी सखोल संशोधन केले जात आहे.
चीनमधील बौद्ध धर्मावर प्रभाव
हर्षवर्धनाच्या राजवटीमध्ये युआन त्संग हे चिनी बौद्ध भिक्षु भारतामध्ये आले होता. त्यांचा प्रवास कालावधी हा साधारणपणे इसवीसनाचे ६२९ ते ६४५ वे शतक मानल जाते. याच काळामध्ये त्यांनी ६५७ बौद्ध संहिता चीनमध्ये नेल्याचे मानले जाते. चीनमधील बौद्ध धर्माच्या विकासावर त्यांच्या लिखाणाचा मोठा प्रभाव आहे. ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंगहम यांना युआन त्संग यांच्या लिखाणाच्या आधारेच ऐतिहासिक नालंदा आणि वैशाली ही स्थळे शोधता आली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.