Arvind Kejriwal Esakal
देश

Arvind Kejriwal: "तुरुंगात केजरीवालांवर अन्याय, मुलभूत हक्कही नाकारले जात आहेत," 'आप'चा आरोप

सकाळ वृत्तसेवा

दिल्लीतील दोन कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारच्या आदेशानुसार तुरुंगातील किमान मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांना कुटुंबियांशी प्रत्यक्ष भेट नाकारताना झरोक्यातून (विंडो बॉक्स) बोलण्यास सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही केजरीवाल यांच्या भेटीची परवानगी नाकारण्यात आली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांच्या मुलभूत हक्कांचे पालन होत नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज केला.

ते म्हणाले, की कारागृह नियम ६०२ आणि ६०५ नुसार कैद्याला भेटणाऱ्यांना प्रत्यक्ष भेटीची परवानगी मिळते. परंतु,मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांना त्यासाठीची परवानगी नाकारली. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भेटीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना झरोक्यातून बोलण्यासाठी सांगण्यात आले. एवढे अमानवीय वर्तन कशासाठी असा सवाल संजयसिंह यांनी केला.

याच तिहार तुरुंगामध्ये शेकडो भेटीगाठी समोरासमोर झाल्या आहे.परंतु दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अपमानीत करण्याच्या हेतूने,त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने अशी वागणूक दिली जात असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना केजरीवाल यांच्या भेटीची परवानगी नाकारण्यात आल्याकडे लक्ष वेधताना संजय सिंह म्हणाले,की मुख्यमंत्री मान आणि आपल्याला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीसाठी कारागृह प्रशासनाने टोकन क्रमांक ४१५२ देखील दिला.परंतु टोकन मिळण्याच्या आधीच आदल्या रात्री ईमेलने परवानगी नाकारण्यात आली. त्यासाठी भगवंत मान यांच्या सुरक्षेचे कारण देण्यात आले.

अर्ज केला जात असताना तुरुंग प्रशासनाला भगवंत मान कोण आहेत याची माहिती नव्हती काय,अशी खोचक विचारणा संजयसिंह यानी केली. याच तुरुंगात सुब्रतो राय,चंद्रा ब्रदर्स यांच्या सारख्या कैद्यांना दूरध्वनी, इंटरनेट सेवा वापरण्याची आणि व्यवसायाशी संबंधित बैठका घेण्याची परवानगी होती कागदपत्रांवर सह्या करण्याची परवानगी होती. परंतु,केजरीवाल यांचे भय सरकारला वाटत आहे,असाही टोला संजय सिंह यांनी लगावला.

आपचा उद्या"संविधान बचाओ दिवस"

दरम्यान,तुरुंगात असलेले आपचे समन्वयक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठिंब्यासाठी आम आदमी पक्षाने उद्या (ता.१४) डॉ.आंबेडकर जयंतीदिनी देशभरात "संविधान बचाओ, हुकूमशाही हटाओ" दिवस पाळण्याची घोषणा केली आहे.दिल्लीत राऊज एव्हेन्यू भागातील आप मुख्यालयामध्ये उद्या सर्व मंत्री, आमदार, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राज्यघटना वाचविण्याची शपथ देण्यात येईल, असे मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच देशभरातील २४ राज्यांमध्ये देखील राजधानीच्या ठिकाणी आम आदमी पक्षातर्फे शपथ घेण्यात येईल, असेही मंत्री गोपाल राय यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT