ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची माहिती आहे. भाजप आणि ठाकरे गटाचे नेते आमने-सामने आल्याचं कळतंय.
पंतप्रधान मोदी आज महायुतीच्या सभेसाठी मुंबई येथे आले आहेत. शिवाजी पार्क येथील सभेनंतर पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले.
मला खोट्या आरोपाखाली तुरुंगामध्ये टाकलं गेलं. पण, जेल का जवाब वोटने दिला जाईल. मी २१ दिवस जामिनावर आहे. मला तुरुंगातून बाहेर काढायचं असेल तर इंडिया आघाडीला मत द्या, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
शिवाजी पार्क इथल्या महायुतीच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी भाषणाला सुरुवात करताना नेहरुंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे मोदी पहिले पंतप्रधान असल्याचं म्हटलं. म्हणजे त्यांनी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचं जाहीर केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दादरमध्ये दाखल झाले आहेत. आता ते चैत्यभूमीकडं निघाले आहेत. संविधान बदलणार असे आरोप मोदींवर होत असताना मोदी चैत्यभूमीवर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीनं काय केलं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोविड काळात मोदी लस बनवत असताना दुसरीकडं महाराष्ट्रात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा घडत होता. याचा जाब आपल्याला विचारावा लागेल.
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेला सुरुवात झाली आहे. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित आहेत. थोड्याचवेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्यासपीठावर दाखल होणार आहेत. तत्पूर्वी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत.
शरद पवार, अरविंद केजरीवाल हे भिवंडीतील महाविकास आघाडीच्या सभेत दाखल झाले आहेत. यानंतर बीकेसीत महाराष्ट्रातील इंडिया आघाडीची शेवटची परिवर्तन सभा पार पडणार आहे.
राहुल गांधी यांच्या रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करत आहे. जसं मला तुमचं म्हणून सांभाळलं तसं राहुलला सांभाळा, राहुल तुम्हाला निराश करणार नाही असे सोनिया गांधी म्हणाल्या.
राज्यसभेवर जात असताना सोनिया गांधी यांनी असच भावनिक पत्र रायबरेलीकरांना लिहिलं होतं. या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी कुठल्याही प्रचाराला गेल्या नव्हत्या मात्र राहुल गांधी यांच्यासाठी झालेल्या सांगता सभेत सोनिया गांधी यांनी भावुक भाषण केलं.
मद्य धोरण प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाविरुद्ध दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ईडीच्या ताज्या पुरवणी आरोपपत्रात आप आणि केजरीवाल यांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २८ – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही समस्या अथवा तक्रार असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षातील ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.
२८ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १५५- मुलुंड, १५६ विक्रोळी, १५७ – भांडूप पश्चिम, १६९ - घाटकोपर पश्चिम, १७० – घाटकोपर पूर्व, १७१ – मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.
ज्येष्ठ आणि दिव्यांगासह मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी सांगितले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर, निवडणुकीच्या 4 टप्प्यांनंतर आम्ही खूप समाधानी आणि आनंदी आहोत. आम्हाला असे वाटते की लोकांनी पंतप्रधान मोदी आणि आमच्या युतीला भरपूर पाठिंबा दिला आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आम आदमी पार्टीचे संयोजन अरविंद केजरीवाल हे मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे आजच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होत आहे.
राहुल गांधींच्या खटाखट खटाखट अकाऊंटवर पैसे पडण्याच्या विधानावरुन पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, विरोधकांचं परदेश वारीचं तिकीट बुक झालं आहे... खटाखट खटाखट.. असं म्हणत त्यांनी टीकास्र सोडलं.
अमेठीतील जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, "मी पहिल्यांदा 42 वर्षांपूर्वी येथे आलो होतो, जेव्हा मी 12 वर्षांचा होतो. मी राजकारणात जे काही शिकलो ते अमेठीच्या जनतेने मला शिकवले. त्यावेळी येथे रस्ते नव्हते, विकास नव्हता आणि मी अमेठी आणि माझ्या वडिलांचे नाते माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि तेच माझे राजकारण आहे, असे समजू नका की मी रायबरेलीतून निवडणूक लढवत आहे, मी अमेठीचा होतो आहे आणि राहणार..."
मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
गिरीश महाजन हे छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर पोहोचले. भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन भुजबळांच्या भेटीला आल्याचं बोललं जात आहे. मागील १ तासांपासून गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे.
मतदान होताच पुण्यात पुन्हा गुन्हेगारी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा जणांनी कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. कोथरुड येथील डहाणूकर कॉलनीत काल रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीनु बिसलावत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. एकमेकाकडे बघण्यावरुन आणि पूर्व वैमनस्यातून खून केल्याची घटना घडली आहे. अलंकार पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या चार टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत.
भाजप नेते गिरीश महाजन मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फॉर्मवर दाखल झाले आहेत. भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन भुजबळांच्या भेटीला दाखल झाले आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आम्ही बारकाईने या प्रकरणाकडे पाहत होतो. आमच्यात मतभेद होते पण आम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. स्वाती बोलू शकते असे वाटल्यावर त्यांनी काल तक्रार दिली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला. कारवाईचा अहवाल तयार केला आहे. मी स्वाती सोबत स्वतः बोलेल... स्वातीवर मानसिक आणि शारीरिक आघात झाला आहे
पोलिस बिभव कुमारला सोधात आहेत. आम्ही उद्या पर्यंत वाट पाहू... उद्या जर बिभव स्वतः आला नाही तर आम्ही त्याच्या घरी जाऊन चौकशी करू. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माहीत होत काय होत आहे. मात्र त्यांना त्याच काहीही पडलेल नाही... मुख्यमंत्री महिलांसोबत नाहीत. त्यांनी (केजरीवाल) यांनी स्वतः बाजू ठरवली आहे... ते (केजरीवाल) बिभवच्या बाजूने आहेत
मी स्वतः स्वाती मालीवाल यांच्या सोबत उभी आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी यांची देखील चौकशी केली जाईल, असे राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आज भावेश भिंडेला किल्ला कोर्टात हजर केले जाणार, उदयपूरवरून गुन्हे शाखेने भिंडेला अटक केली होती.
अमृतसर, पंजाब: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबईला रवाना झाले आहेत.
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाई रंगणार? बारामतीत युगेंद्र पवारांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याती माहिती मिळत आहे. आठवड्यातील चार दिवस युगेंद्र पवार बारामतीत राहणार आहेत. तर दर मंगळवारी शरद पवार गटाच्या कार्यालयात युगेंद्र पवार लोकांच्या तक्रारी सोडवणार. विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढाईची बारामतीत चर्चा आहे.
भाजप महिला मोर्चाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर 13 मे रोजी AAP राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली.
मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो, पण असा उत्साह आणि अशी गर्दी कुठेही पाहिली नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीकरांच्या उत्साहाचे कौतुक केले. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले होते.
घाटकोपर येथे वादळीवाऱ्यात महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातानंतर नवी मुंबई महापालिका यंत्रणा सरसावली आहे. शहरातील बेकायदा होर्डिंगचा शोध अतिक्रमणविरोधी पथकाने सुरू केला आहे. या पथकाच्या सर्वेक्षणात बेलापूर ते दिघापर्यंत अवघे २३९ होर्डिंग अधिकृत परवानाधारक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ठाणे लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत येणार आहेत. यावेळी काढण्यात येणाऱ्या रॅलीतून महायुती शक्तिप्रदर्शन करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून आजपासून (ता. १७) ते १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी-विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल केला आहे. आजपासून पुढचे १५ दिवस रात्री १२ वाजून १४ मिनिटांची कसारा लोकल शेवटची असणार आहे.
मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे भरलेल्या कोकणवासीयांच्या मेळाव्यात दिली.
रत्नागिरी : राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून समुद्रात मासेमारी करता येणार नाही. हा बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे. या काळात आदेशाचे उल्लंघन केले गेले तर त्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल, असे मत्स्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
चार धाम यात्रेतील भाविकांची गर्दी लक्षात घेता, उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी व्हीआयपी दर्शनावरील बंदी 31 मे पर्यंत वाढवली आहे. जेणेकरून सर्व भाविकांना चार धामांचे दर्शन सहज करता येईल.
तासगाव : मुंबई घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तासगाव नगरपालिकेने शहरातील १२ जणांना या होर्डिंगबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील धोकादायक होर्डिंग हटवावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बंगळूर : राज्यात १८ ते २० मे दरम्यान तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने इशारा दिला आहे की, या तीन दिवसांत दक्षिण कर्नाटकात ११५.५-२०४.५ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. तसेच लोकांना शक्य तितके सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. तमिळनाडू राज्यात अतिवृष्टी होणार असल्याने सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे.
काठमांडू : नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन ऑक्साईड असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा निर्णय घेतला आहे. नेपाळनेही या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडची चाचणी सुरू केली आहे.
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) बाराबंकी, फतेहपूर आणि हमीरपूर येथे जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सकाळी 10 वाजता बाराबंकी येथील जैदपूरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. यानंतर ते दुपारी 12 वाजता फतेहपूर येथील कजरिया टाईल्स स्टोअरजवळील विमानतळ मैदानावर आणि दुपारी 1 वाजता हमीरपूर येथील ब्रम्हानंद इंटर कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील.
बंगळूर : माजी मंत्री व आमदार एच. डी. रेवण्णा यांनी होळेनरसिंपूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अंतरिम जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन व युक्तिवाद ऐकून ४२ व्या एसीएमएम न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज (ता. १७) दुपारपर्यंत सुनावणी तहकूब केली.
कोल्हापूर : शहरातील सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया न करणे, नाल्यांमधील प्लास्टिक कचऱ्यांची विल्हेवाट न लावणे, आणि सांडपाणी थेट नदीत मिसळणे या कारणांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेला आज कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
Latest Marathi News Live Update : लोकसभेच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रचाराची सांगता शनिवारी होत असताना आज (शुक्रवारी) महायुतीची शिवाजी पार्क येथे आणि इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसी मैदानावर सांगता सभा होत आहे. महायुतीच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. घाटकोपर येथे जो जाहिरात फलक कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला, तो फलक उभारणाऱ्या कंपनीचा मालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली. तर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हैदराबाद हेरगिरीप्रकरणी संशयित नुरुद्दीन ऊर्फ रफी याला अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांच्या बॅगची तपासणी का केली नाही, असा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगासह भरारी पथकाने त्यांच्या बॅगची तपासणी केली. त्याचबरोबर देशात उन्हाने होरपळणाऱ्या प्रत्येकाला आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.