नवी दिल्ली : जगातील बहुतांश देशांना उष्णतेच्या लाटेचा जबरदस्त फटका बसू लागला असून आतापर्यंत दरवर्षी १.५३ लाख मृत्यू हे साधारणपणे उष्णतेच्या प्रकोपामुळे झाले असून त्यातील एक पंचमांश मृत्यू हे एकट्या भारतातील असल्याचे दिसून आले आले आहे.
अभ्यासकांनी यासाठी १९९० पासूनच्या तीस वर्षांतील आकडेवारीचा अभ्यास केला असता त्यातून ही बाब उघड झाली आहे. भारतापाठोपाठ चीन (१४ टक्के) आणि रशियाला (८ टक्के) देखील उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागतो आहे. ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे.
उन्हाळ्याचा कालावधी विचारात घेतला तर १.५३ लाखांपेक्षा अधिक मृत्यू हे उष्णतेमुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातील अर्धे मृत्यू हे एकट्या आशियातील तर ३० टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यू हे युरोपातील आहेत. साधारणपणे कोरडे वातावरण असलेल्या प्रदेशात कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. ‘पीएलओएस मेडिसीन’ या नियतकालिकात ते ताजे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा कालावधी देखील वाढलेला दिसून येतो. हा कालावधी १३.४ ते १३.७ दिवसांवर गेला आहे. प्रत्येक दशकामध्ये तापमान हे ०.३२ अंश सेल्सिअसने वाढत असल्याचे दिसून येते. जगातील मृत्यूचा दर देखील उष्णतेमुळे वाढल्याचे दिसून येते. या उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी दीर्घकालीन धोरणांची आवश्यकता असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे.
साधारणपणे १९९० ते २०१९ चा काळ लक्षात घेतला तर दरवर्षी केवळ उष्णतेमुळे १ लाख ५३ हजार ०७८ मृत्यू झाले असून जगभरामध्ये विविध कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूशी याची तुलना केली तर हे प्रमाण एक टक्का एवढे भरते. या संशोधनासाठी अभ्यासकांनी ब्रिटनमधील ‘मल्टी कंट्री- मल्टी सिटी’ नेटवर्कचा वापर केला. जगभरातील ४३ देशांतील ७५० ठिकाणांवरील मृत्यू आणि तापमानातील बदलांचा आढावा घेण्यात आला होता.
वातावरण बदल रोखण्यासाठीचे धोरण
उष्णतेविरोधातील कृती आराखडा
शहर नियोजन अन् हरित संरचना
सामाजिक साहाय्यता कार्यक्रम
आरोग्य सेवांचा विस्तार
शिक्षणाच्या माध्यमातून जागृती
समाजाचा सहभाग वाढविणारे उपक्रम
हवामान बदलामुळे वातावरणातील घटनांची तीव्रता वाढली असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. जगभरात सर्वसाधारणपणे दर तीस वर्षांनी उष्णतेची मोठी लाट येते. मात्र, हवामान बदलामुळे ही लाट अधिक प्रमाणात येण्याची शक्यता ४५ पटींनी वाढली असल्याचे ‘वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन’ (डब्लूडब्लूए) या संस्थेने म्हटले आहे.
यामुळे जगभरात आणि विशेषत: आशियामधील गरीबांसमोरील अडचणी आणि त्रासात वाढ झाली आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये कमाल तापमानाची नोंद झाल्याने सरकारनेही जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. सीरिया, लेबनॉन, इस्राईल, पॅलेस्टाइन, जॉर्डन यांसारख्या देशांमध्ये ४० अंशांच्यावर तापमान जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.