नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘गांधी शांतता पुरस्कार’ उत्तर प्रदेशातील गीता प्रेसला देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
अहिंसेच्या मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणल्याबद्दल गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला २०२१ या वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार देण्यात येणार आहे; पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्यावतीने या पुरस्कारासाठी गीता प्रेसची निवड करण्यात आली आहे, असे सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.‘‘गीता प्रेस महात्मा गांधींच्या आदर्शांनुसार शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचे कार्य करत आहे’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी केले आहे.
गांधी शांतता पुरस्कार
महात्मा गांधी यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्यानिमित्ताने १९९५ पासून केंद्र सरकारच्या वतीने गांधी शांतता पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या आदर्शांवर चालणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. एक कोटी रुपये, मानपत्र आणि हस्तकलेपासून तयार करण्यात आलेली वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गीता प्रेस गोरखपूर
गीता प्रेस गोरखपूरची स्थापना १९२३ मध्ये करण्यात आली असून ही संस्था जगातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थांपैकी एक आहे. या संस्थेने आतापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे ४२ कोटी पुस्तके छापली आहेत. यामध्ये सर्वाधिक साडेसोळा कोटी श्रीमद्भभगवद्गीतेच्या प्रतींचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.