राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. यादरम्यान महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीतून बाहेर पडले आहेत. इतकेच नाही तर ते आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत.
महादेव जानकर हे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज होते त्यामुळे विधानसभा निवडणूक रासप स्वबळावर लढणार आहे.
दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना जाणकर यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जानकर म्हणाले की, " आपल्याला माविआ किंवा महायुती यापैकी कोणीही संपर्क केला नाही. या दोघांवर देखील आपण नाराज नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीने २८८ जागा लढवण्याची तयारी करत आहे. आम्ही आमच्या तकातीवर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेला त्यांनी (महायुती) आम्हाला एक जागा दिली होती, त्यांचे अभिनंदन. पण आम्ही आमच्या पक्षाची ताकद वाढवली पाहिजे, आमचा पक्ष मोठा केला पाहिजे. आमच्याही पक्षाचा मुख्यमंत्री, पंतप्रधान झाला पाहिजे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे."
"आमच्याकडे २०० उमेदवारांचे एका मतदारसंघातील तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त ८८ जगा राहिल्या आहेत. आम्ही काही ठिकाणी विजयी होऊ, काही ठिकाणी दोन तसेच तीन नंबरची मते घेऊ, आणि काही ठिकाणी किमान १० हजार मते घेऊ असेही जानकर म्हणाले. जेथे उमेदवार मिळेल तेथे उमेदवारी देणार, एकही जागा रिकामी सोडणार नाही असेही जाणकर यांनी स्पष्ट केलं.
#ElectionWithSakal
राज्यात एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून झारखंड या नक्षलप्रभावित राज्यात दोन टप्प्यांत येत्या १३ व २० नोव्हेंबरला मतदान होईल. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड हे लोकसभा मतदारसंघ तसेच विविध राज्यांमधील ४८ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी याचवेळी मतदान होणार आहे. दोन्ही राज्ये व पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या २३ नोव्हेंबरला होईल.