'आला रे आला गणपती आला...' गणेश चतुर्थी फक्त एक दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची जल्लोषात तयारी सुरू आहे.
प्रत्येक शुभ कार्याची सुरूवात गणरायाच्या पूजेने होते. कारण कोणतेही काम गणरायाच्या आशीर्वादाने केल्याने कामात यश मिळते अशी मान्यता आहे.
हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. या दिवशी गणपतीची बाप्पांची मूर्ती घरी आणून मनोभावे पूजा केली जाते. देशभरात गणेशोत्सव ढोल-ताश्यांच्या गजरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
यंदा गणेशोत्सव ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. दरवर्षी १० दिवसांचा गणेशोत्सव जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीलाच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करतात.
बाप्पांच्या स्वागतासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात घरोघरी तयारी सुरू झाली आहे. लंबोदराला मोदक खुप प्रिय आहे. गणपती बाप्पासाठी अनेक लोक उकडीचे मोदक बनवतात. पण अनेकांचे उकडीचे मोदक बनवतांना बिघडतात.
जर तुम्ही पहिल्यांदात उकडीचे मोदक बनवत असाल तर आम्ही उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मोदक कसा बनवावा हे दाखवले आहे.
तीन वाट्या ओलं खोबरं
दीड वाटी गूळ
अर्धी वाटी काजू आणि बदामची भरड पूड
१ चमचा वेलची पूड
२ चमचे तूप
जाड बुडाच्या पातेल्यात/ कढईत २ चमचे तूप घालून त्यावर ओलं खोबरं आणि गूळ घालावा, मध्यम आचेवर गूळ विरघळेपर्यंत सतत ढवळत राहावे, सारण थोडं कोरडं व्हायला लागलं, की त्यात काजू-बदाम पूड घालून ढवळावे. गॅस बंद करून वेलची पूड घालावी आणि गार होण्यासाठी ताटात पसरून ठेवावे.
तांदूळ पिठी 4 वाट्या
लोणी 2 चमचे
चवीपुरतं मीठ आणि पाणी
एका मोठ्या पातेल्यात पाणी (अंदाजे सव्वा/दीड लिटर) उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात २ चमचे लोणी आणि चवीपुरतं मीठ घालावं. गॅस बारीक करुन तांदुळाची पिठी घालावी. पिठी पाण्यावर तरंगत राहिली पाहिजे, पाण्यात मिसळून घ्यायची नाही. पिठात मध्यभागी उलटण्याच्या मागच्या दांड्याने एक भोक पाडावे ज्यातून पाणी वर आलं पाहिजे. गॅस मोठा बारीक करत तरंगणाऱ्या पिठीचा वरचा थर पूर्ण भिजला, की गॅस बंद करावा व पाच मिनिटं झाकून ठेवावी. नंतर पातेल्यावर झाकण लावून त्यातील पाणी ओतून/निथळून एका पातेल्यात/वाडग्यात काढावं. (सगळं पाणी निघालं पाहिजे) पातेल्यातील पिठी नीट ढवळून घ्यावी आणि पुन्हा ४/५ मिनिटे झाकून ठेवावी. नंतर एका परातीत काढून गरम असतानाच छान मऊसूत मळून घ्यावी. अंदाजे सुपारी एवढा पिठाचा गोळा घेऊन कडेकडेने बोटांनी दाबत दाबत पारी करून घ्यावी आणि त्यात तयार सारण घालून पारीला निऱ्या/पाकळ्या करून घ्याव्यात आणि डाव्या हाताच्या तळव्यावर ठेऊन उजव्या हाताने अलगद गोल फिरवत पाकळ्या एकत्र आणून बंद करून घ्याव्यात. म्हणजे मोदक तयार.
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेऊन त्यावर बसेल अशी चाळणी ठेवावी. त्यात हळदीचे किंवा केळीचे पान घालून तयार मोदक पाण्यात बुडवून १०/१५ मिनिटे वाफवून घ्यावेत. साजूक तूप घालून गरमागरम खायला द्यावेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.