dengue diet E sakal
health-fitness-wellness

Dengue Diet : डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट काउंट कसा वाढवावा? हा घ्या डायट प्लॅन!!

सकाळ डिजिटल टीम

आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर

डेंग्यू झाल्यावर सगळ्यांत पहिले टेन्शन येतं ते प्लेटलेट वाढवण्याचं!! आणि मग सुरू होतात काही घरगुती उपाय. जसं की पपईच्या पानांचा रस, मध आणि आल्याचा कीस किंवा मग तुळशीच्या पानांचा रस.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अशा उपायांनी फरक पडत असला तरीही, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशा औषधांची मात्रा म्हणजेच नेमका डोस किती असावा हे ठाऊक नसतो.

याशिवाय पबमेड आणि एनसीबीआय या जागतिक जर्नल मधील रिसर्च पाहिलं तर, त्यांच्या मते डेंग्यूसाठी पपईच्या पानांचा रस वापरणे हि फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट असू शकत नाही.

त्यामुळे अशावेळी डॉक्टरांकडे जाणं आणि आहारामध्ये योग्य ते बदल करण या दोन गोष्टींमुळे तुम्ही तुमचे प्लेटलेट काउंट पुन्हा वाढवू शकता. डेंग्यू झाल्यावर कोणता आहार घ्यायचा हे जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊया डेंग्यूची लक्षणे.

डेंग्यूची प्रमुख लक्षणे कोणती?

डेंग्यू तापाचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे तुम्हा आम्हाला ठाऊक असलेला सर्वसाधारण डेंग्यूचा ताप ज्याला डेंग्यू फिवर म्हणतात.आणि दुसरा थोडा जास्त धोकादायक डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा डेंग्यू हिमोरॅजिक फीवर.

डेंग्यू फिवरची लक्षणे:

१. अचानक थंडी वाजून ताप येणे.

२. डोकेदुखी आणि अंगदुखी.

४. हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना होणं.

५. उलटी मळमळ.

६. अंगावर रॅश येणं.

डेंग्यू शॉक सिंड्रोमची / डेंग्यू हिमोरॅजिक फीवरची लक्षणे :

१. पोटात दुखणे.

२. सतत उलट्या होणे.

३. नाक, हिरड्या, लघवी, उलटी किंवा शौचावाटे रक्तस्त्राव होणे.

४. श्वास घ्यायला त्रास होणे.

५. अशक्तपणा.

६. शरीरावर पुरळ उठणे.

७. गंभीर परिस्थितीमुळे रुग्णाच्या मेंदूवर, फुफ्फुसांववर किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो.

शरीरातील प्लेटलेटसची संख्या नेमकी किती असावी?

एनसीबीआय या जागतिक जर्नलनुसार एक घनमिलीटर रक्तातील प्लेटलेट काउंट हा साधारण २,५०,००० ते २,६०,००० असतो. परंतु सर्वसाधारणपणे हा आकडा एक घनमीलीटर रक्तामागे १,५०,००० ते ४,००,००० इतका पकडला जातो.

डेंग्यू मध्ये हा आकडा १०,००० पर्यंत खाली जाऊ शकतो. अशावेळी रुग्णाला बाहेरून प्लेटलेट देण्याची गरज पडू शकते. परंतु प्रत्येक वेळी ही वेळ येईल असे नाही.

बऱ्याचदा योग्य त्या वेळी आहारात योग्य ते बदल करून तुम्ही तुमचे प्लेटलेट काउंट वाढवू शकता. जाणून घेऊया " डेंग्यू झाल्यावर काय असावा आपला डायट प्लान?"

डेंग्यूचा डाएट प्लॅन :

नेचर या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार प्लेटलेट ची संख्या वाढवण्यासाठी विटामिन बी-१२ मदत करू शकते. विटामिन बी -१२ हे प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. याशिवाय काही प्रमाणात ते दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील आढळते.

त्यामुळे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी दूध, चीज, अंडी, शिंपले, पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे गरजेचे ठरते. परंतु हे पदार्थ शिजवताना त्यामधील मसाल्यांचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक असते.

विटामिन बी- १२ सोबत फोलेट, लोह, आणि विटामिन सी हे तीन घटक प्लेटलेट्सच्या वाढीसाठी आवश्यक असतात. यातील विटामिन सी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण आहारात पुरेसे विटामिन सी नसेल तर आहारातील लोह शरीरात शोषले जात नाही.

त्यामुळे शरीराला लोहाची कमतरता जाणवते. त्यासोबत विटामिन सी प्लेटलेट्सना एकत्र यायला मदत करत असल्याने लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे ठरते. वरील सर्व घटकांचा आहारात एकत्रितपणे समावेश करण्यासाठी खालील डायट प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

दिवसभरात काय खावे?

सकाळी उठल्यावर (८ वाजता) : पाणी, नारळपाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत, आवळ्याचे सरबत किंवा कुठल्याही फळाचा ज्यूस.

सकाळचा नाश्ता ( ९-१० वाजता) : चपाती किंवा भाकरी + हिरव्या पालेभाज्या ( पालक, मेथी, मुळा, लालमाठ, शेपू, अंबाडी) किंवा २ अंड्यांचे ऑमलेट/ २ उकडलेली अंडी/ कडधान्यांच्या भाज्या किंवा मूग डोसा, व्हेजिटेबल इडली, पोहे, शिरा, उपमा, उकडलेली कडधान्ये, नाचणीचे सत्व.

स्नॅक्स ( १० ते १२ दरम्यान) - संत्र्याचा ज्यूस/ मोसंबीचा ज्यूस/ किवी/ डाळिंब/ कलिंगड / सूर्यफुलाच्या किंवा भोपळ्याच्या बिया/ अळशीचा लाडू/नाचणीचा लाडू/राजगिऱ्याचा लाडू, शेंगदाणा चिक्की.

दुपारचे जेवण ( १२-१ दरम्यान) -

भात / खिचडी / चपाती/भाकरी

करी - डाळ / मसूर / मूग करी / मटकी करी / अंडा करी / चिकन करी / दुधी करी/ पालक करी (जेवणामध्ये मसाले कमी प्रमाणात वापरा)

भाजी - मेथी / भोपळी मिरची / टोमॅटो / पडवळ / दुधी / भोपळा / वांगी / घोसाळे / शिराळे / लाल माठ ( भाजी शिजल्यावर त्यात थोेडा ताजा लिंबाचा रस घाला)

कोशिंबीर (कांदा + काकडी + सफरचंद + डाळिंब + दही + सूर्यफुलाच्या बिया)

( टीप: दही किंवा लिंबूवर्गीय फळांमुळे सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास ते पदार्थ आहारातून वगळा)

संध्याकाळचा नाष्टा (४-५ दरम्यान) : उकडलेले रताळे, गाजर, दुधी किंवा बीटचा हलवा, उकडलेले चणे किंवा मका, कुरमुऱ्याचा लाडू, सँडविच, फळे.

संध्याकाळचा स्नॅक्स (५-७ दरम्यान) : नारळ पाणी, लिंबू पाणी, तिळाच्या लाडू, तिळाची चिक्की, कूरमुरे, पॉपकॉर्न.

संध्याकाळचे जेवण (८-९ दरम्यान): दुपारच्या जेवणात सांगितल्यानुसार ताजे पदार्थ.

डेंग्यू झाल्यावर काय खाऊ नये?

१. तळलेले तुपकट पदार्थ.

२. मसाल्याचे पदार्थ.

३. दारू.

४. कॉफी, सॉफ्ट ड्रिंकसारखे उत्तेजक पदार्थ.

५. पिझ्झा आणि बर्गरसारखे प्रोसेस फुड.

डेंग्यू बरा झाल्यावर आहारात बदल करणे गरजेचे आहे का?

हो!! डेंग्यू बरा झाल्यावर तुम्हाला आहारात काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते. कारण डेंग्यू बरा झालेला असला तरीही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ववत व्हायला वेळ लागतो. त्यामुळे अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात देणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांचा आणि फळांचा समावेश आहारात करणे गरजेचे असते.

याशिवाय बऱ्याचदा डेंग्यूच्या तापामध्ये वजन कमी होते. त्यामुळे आहारात प्रथिनांचा म्हणजेच दूध, अंडी, मांस, मासे आणि कडधान्यांचा समावेश करावा. शक्य असल्यास व्यायाम करून शरीराची झालेली झीज भरून काढावी.

ज्यामुळे भविष्यात येणाऱ्या प्रत्येक आजाराला तुम्ही खंबीरपणे तोंड देऊ शकाल.

( लेखक आहारतज्ञ आणि जैवतंत्रज्ञ असून मातापोषण आणि बालकांची वाढ या विषयावर संशोधन करत आहेत. )

सूचना: तुमच्या वैद्यकीय स्थितीनुसार तसेच तुमच्या आधीच्या काही वैद्यकीय पूर्वेतिहासानुसार तुमच्या पोषणाची गरज वेगळी असू शकते. अधिक आणि नेमक्या तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी/आहार तज्ञांशी संपर्क साधा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT