Belly Fat : मी भरपूर चालतो, व्यायाम करतो, तरीही ढेरी कमी होत नाही’, अशी ओरड कायमच केली जाते. पोटाचा घेर काही केल्या कमी होईना, अशी चिंता सतावणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारणही तसेच आहे. त्रोटक प्रयत्न करून उपयोग होत नाही. पोटाचा घेर कमी करण्यासाठी योग्य आहार, विहार, जाणीवपूर्वक प्रयत्न हीच गुरुकिल्ली उपयोगी पडते.
प्रत्येकाला आपले आरोग्य उत्तम असावे, अशी अपेक्षा असते. मात्र, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाहीत, चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील चरबीचे प्रमाण आटोक्यात ठेवले पाहिजे. सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे अनेक संशोधनाने सिद्ध झाले. जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, दुर्धर आजारांना निमंत्रण मिळते.
महिलांमध्ये पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीझ), वंध्यत्व, पाळीचा त्रास, गर्भाशयात गाठी आदी समस्या मेदाच्या अधिक प्रमाणामुळे होते. साधारण शास्त्रीयदृष्ट्या मान्य असलेले निकष म्हणजे पुरुषांमध्ये पोटाचा घेर साधारण ९० सें.मी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सें.मी. (३२ इंच) असा आहे, यापेक्षा पोटाचा घेर जास्त असेल, तर तो धोकादायक मानला जातो.
ढेरी वाढलेली असेल, तर कोमट पाण्यात अद्रक किसून, त्यात लिंबाचा रस किंवा आवळ्याची पूड घालावी. यात ‘क’ जीवनसत्त्व अधिक असल्याने रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढण्यास, रक्तवाहिन्यांत चरबी असेल तर ती बाहेर काढण्यास मदत होते. हा उपचार सातत्याने केला पाहिजे. किमान तीन महिने तरी यात सातत्य ठेवले, तरच ढेरी कमी करण्यास मोठी मदत मिळते.
पूर्वी साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर ढेरी वाढण्याचे प्रकार आढळत होते. आता मात्र आठ ते दहा वर्षांच्या मुलांपासून ढेरी सुटण्याचे प्रमाण दिसत आहे. पूर्वी मुले मस्ती करीत, उड्या मारत, खेळत, आता याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मुले नजरेसमोर हवीत म्हणून पालकच नकळत त्याच्या हातात रिमोट किंवा मोबाइल देऊन मोकळे होतात. कंटाळा आला असेल, असे म्हणत मुलांसाठी पिझ्झा, बर्गर किंवा फास्टफूड उपलब्ध करून देतात. हे पदार्थ पचण्यासाठी शरीराची तेवढी हालचाल गरजेची असते; पण तसे होत नाही.
व्यायामामध्ये सातत्य राखणे, जेवणाच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. जेवणात तंतुमय घटक असावेत. ते फॅट बाहेर काढण्यासाठी मदत करतात. उन्हाळ्यात रसरशीत फळे खावीत. अशा फळांमधून खनिज मिळते. ते रोगप्रतिकार शक्तीवाढीसाठी मदत करते. सर्व प्रकारचे पोषक अन्न घटक, हिरव्या भाज्या आहारात गरजेच्या आहेत.
अलीकडच्या काळात घरामध्ये टीव्हीसमोर बसून जेवण करण्याची पद्धत रूढ झाली आहे. मुळात लक्ष जेवणाकडेच असले पाहिजे. लक्ष दुसरीकडे असेल तर अन्न घटक व्यवस्थित पचत नाहीत. त्यातही अनेक जण आठवडाभर जेवण्यासंदर्भात सतर्क असतात. मात्र, तेच वीकेंड जोरदार सेलिब्रेट करतात. यामुळेही शरीरावर विपरीत परिणाम होतो. अन्नपचनासाठी योग्य प्रमाणातील हालचालींची गरज आहे. तसे नसेल तर शरीरात फॅट्स साचण्याचे प्रमाण वाढते.
भरपूर व्यायाम, सतत आनंददायी राहणे.
भूक लागल्यावर प्रसन्न वातावरणात सावकाश जेवावे.
जेवताना पोट काही प्रमाणात रिकामे ठेवणे.
झोपण्यापूर्वी तीन तास आधी भोजन आवश्यक.
दिवसभरात किमान तीन लिटर पाणी पिणे आवश्यक.
दररोज साधारण पाच हजार पावले म्हणजे सहा किलोमीटर चालणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.