महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. विशेषत: या काळात मुलांकडे लक्ष देण्याची गरज असते.
पावसाळ्यात अनेक भागात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होते. याच घाण पाण्यामुळे विविध आजारांचा शिरकाव होतो. पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनियासह अनेक आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता ते जाणून घेऊयात.
पावसाळ्यात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका सर्वाधिक असतो. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते त्यामुळे डासांची संख्या वाढते. यापैकी एक रोग म्हणजे मलेरिया. मलेरिया झाल्यास ताप, उलट्या, सांधेदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून येणे, घाम येणे अशी लक्षणे दिसतात. मलेरिया टाळण्यासाठी रात्री मच्छरदाणी लावून झोपावे. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
डेंग्यू हा आजार डासांच्या चावण्याने पसरतो. पावसाळ्यात या आजाराचा धोका वाढतो. तीव्र ताप, अंगदुखी, पुरळ उठणे, डोकेदुखी, सांधेदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. डेंग्यूच्या काही केसेसमध्ये रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर होते की त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. घराभोवती पाणी साचू देऊ नका. घराच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
पावसाळ्यातही चिकुचनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्याची लक्षणे ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी इ. असतात. हा आजार टाळण्यासाठी, पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे. घराभोवती पाणी साचण्यापासून थांबवावे. संध्याकाळी खिडक्या बंद ठेवा.
पावसाळ्यात इन्फ्लूएंझा होण्याचा धोकाही असतो. या विषाणूचे चार प्रकार आहेत ज्यात ए, बी, सी आणि डी यांचा समावेश आहे. ताप, डोकेदुखी, डोळा दुखणे, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा, उलट्या होणे, जुलाब, थंडी वाजून येणे आणि घाम येणे ही त्याची लक्षणे आहेत.
स्वच्छ आणि उकळलेले पाणी प्या.
घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा.
वेळोवेळी हात धुत रहा.
बाहेरचे अन्न खाऊ नका.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.