Gulabrao Patil, Chimanrao Patil, Kishore Patil, Anil Patil esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency Election 2024 : शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर 4 आमदारांचे लक्ष जनतेच्या कौलाकडे!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Constituency Election 2024 : राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आमदारांची फुट पडली, याचा फटका राजकीय दृष्टीने जळगाव जिल्ह्यालाही बसला. शिवसेनेचे तीनही आमदार फुटले तर राष्ट्रवादी कॉंगेसच्या जळगाव येथील एकमेव आमदाराने पक्ष सोडला.या फाटाफुटीनंतर शिवसेनेला नवीन चिन्ह मिळाले आहे. या फुटीनंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे जनतेचा कौल काय याची परीक्षा आता फुटलेल्या आमदारांचीही आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency Election 2024)

राज्यातील सत्तेत सन २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. सत्तेत असलेल्या शिवसेनेचे तब्बल चाळीस आमदार फुटून बाहेर पडले, त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार कोसळले. फुटलेल्या आमदारांनी भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिला.

त्या बळावर राज्यात फुटलेल्या शिवसेना आमदार व भाजपचे आमदार मिळून युतीचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर पुन्हा काही महिन्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही फुट पडली. फुटलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी भाजप व फुटलेल्या शिवसेनेला सत्तेत पाठींबा दिला आणि ‘महायुती’चे सरकार राज्यात स्थापन झाले.

शिवसेना फुटीचा जळगाव लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा व पाचोरा येथील तीनही आमदारांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यामुळे शिवसेनेचा जळगाव लोकसभा मतदारसंघात एकही आमदार राहिला नाही. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतरही पक्षाला मोठा फटका बसला. अमळनेर येथील पक्षाचे एकमेव आमदार पक्षाला सोडून गेले, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही एकही आमदार राहिला नाही.

फुटीनंतर तीनही आमदारांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना हा पक्ष तसेच पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणही मिळाले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनाही पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळाले. तर दुसरीकडे ज्या पक्षातून आमदार बाहेर पडले होते, त्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे चिन्ह दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे नाव आणि तुतारी हे चिन्ह दिले आहे. (Latest Marathi News)

राज्यातील या सर्व घडामोडीनंतर कोणत्याही मोठ्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आता प्रथमच लोकसभा निवडणूक होत आहेत. यातही भाजप तसेच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांची ‘महायुती’ तर शिवसेना उबाठा गट, राष्ट्रावादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि कॉंग्रेस यांची ‘महाविकास आघाडी’असे दोन वेगळे गटबंधन तयार झाले आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भारतीय जनता पक्षाकडे गेली आहे. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे ‘कमळ’ आणि शिवसेना ठाकरे गटाची ‘मशाल’ यांच्यात प्रथमच सामना होत आहे.

भाजपतर्फे स्मिता वाघ तर शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पवार उभे आहेत. या दोन्ही उमेदवारात हा सामना होत असला तरी आता खरी परीक्षा पक्ष फुटीनंतर होणाऱ्या निवडणूकीत तीन आमदारांची आहे. जळगाव लोकसभा क्षेत्रात शिवसेनेचे तब्बल तीन आमदार फुटल्याने या मतदारसंघात भविष्यातील विधानसभेच्या दृष्टीने ‘मशाल’ चिन्ह जनतेत जावे, यासाठी ठाकरे गटाने हा लोकसभा मतदार संघ आपल्याकडे घेतला आहे.

विशेष म्हणजे, पक्षाने भाजपमधून फोडून तेवढ्याच ताकदीचा करण पवार हा उमेदवार दिला आहे. महायुतीतील जळगाव ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील व पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचीही या निवडणूकीत खऱ्या अर्थाने परीक्षाच आहे. (Latest Marathi News)

फुटीनंतर शिवसेना उबाठा गटाला जनतेने याच मतदारसंघातून मताधिक्य दिल्यास विधानसभेत इतर नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे. तसेच शिवसेना उबाठा गटासह महाविकास आघाडीला ताकद मिळणार आहे. हीच स्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अमळनेरचे आमदार तसेच राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांचीही आहे.

अमळनेरमधून भाजपच्या ‘कमळा’ ला मताधिक्य देण्यासठी त्यांना कंबर कसावीच लागणार आहे. जर या ठिकाणी ‘मशाल’ तेजाळली तर विधानसभेत अनिल पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक दोन्ही उमेदवारांत होत असली तरी शिवसेना शिंदे गटाच्या तीन आमदारांच्या फुटीवरही जनतेचा कौल असणार आहे.

जर या आमदारांच्या मतदारसंघातून जनतेने भाजपला मताधिक्य दिले तर जनतेने त्यांच्या फुटीला मान्यता दिली असे म्हटले जाईल. मात्र शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारास मताधिक्य मिळाले तर मात्र जनतेच्या मनात फुटीवर तीव्र नाराजी आहे हे सिध्द होईल तसेच विधानसभेत त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT