Jalgaon News : येथील नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्राजवळ तयार केलेल्या व शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या वसुंधरा पार्कची सध्या दुरावस्था झाली आहे. म्हणून नगरपालिकेने वसुंधरा पार्कची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी नवाळे यांनी तीन वर्षांत विविध उपक्रम राबवून सुंदर व हिरवेगार शहर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ( Neglect of Erandol Vasundhara Park by Municipal Administration )
आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शासनाच्या विविध योजनांद्वारे शहरासाठी मोठा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे मुख्याधिकारी नवाळे यांनी वसुंधरा पार्क, पुस्तकांचा बगीचा, नवीन वसाहतींमधील मोकळ्या जागांवर सार्वजनिक उद्यानांची निर्मिती यांसह विविध कामे करून पालिकेची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील मोकळ्या जागेवर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वसुंधरा पार्कची निर्मिती केली.
या पार्कमध्ये आंबा, चिक्कू, चिंच, निंब, वड, पिंपळ यांसारख्या विविध वृक्षांची लागवड केली. विविध फुलांची रोपे लावून शहराच्या सौंदर्यात भर टाकली. याठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून सुमारे पाचशे वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपनही केले. पार्कच्या देखभालदुरुस्तीची जबाबदारी महिला बचतगटाला देवून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून नवीन उपक्रम राबविला. (latest marathi news)
बचतगटातील महिलांनी पार्कची नियमित स्वच्छता करून योग्यप्रकारे देखभाल केली. महिला बचतगटाच्या सदस्यांनी दिवाळीत वसुंधरा पार्कमधील फुलांची विक्री करून आदर्श उभा केला. पार्कची निर्मिती केल्यानंतर पालिकेच्या उपक्रमाची राज्यभर चर्चा झाली. राज्यातील विविध पालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी पार्कला भेट देत कौतुक केले. मात्र, मुख्याधिकारी नवाळे यांची बदली झाल्यानंतर पार्कची अवस्था सध्या बेवारस व बिकट झाली आहे.
पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची गरज
सध्या पार्कमधील स्वच्छतेकडे पालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पार्कमध्ये सर्वत्र हिरवे गवत वाढले आहे. फुलझाडांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. लावलेले वृक्ष मोठे झाले असले तरी त्यांना गवताने वेढल्याने वाढ खुंटली आहे. पार्कच्या देखभालीचे व स्वच्छतेचे योग्य नियोजन केल्यास शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे.
मुख्याधिकारी नवाळे यांची बदलीनंतर पालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने शहरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. सहा महिन्यांपासून मुख्याधिकारीपदाचा पदभार धरणगावचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याकडे आहे. म्हणून पालिकेस पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची गरज आहे. याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन वसुंधरा पार्कची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.