हमिरपूर : ऑलिंपिक भारतात आयोजित करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि २०३६ मधील स्पर्धेसाठी होणाऱ्या बोली युद्धात इतर स्पर्धकांशी स्पर्धा करण्याची ताकद भारतामध्ये आहे, असा विश्वास क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. २०३६ मधील ऑलिंपिकचे यजमान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती कमिशनच्या बैठकीत ठरणार आहे, पण बैठक २०२६ किंवा २०२७ च्या अगोदर होणार नाही. याच कालावधीत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नव्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष थॉमस बाक हे भारताला ऑलिंपिक यजमानपद मिळावे यासाठी आशावादी आहेत.
ऑलिंपिक यजमानपद मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण तयार आहोत आणि सहजच त्यात बाजी मारू. या शर्यतीत इतर कोणतेही देश असले तरी आमची ताकद अधिक आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. २०३६ मधील यजमानपदासाठी पोलंड, इंडोनेशिया, मॅक्सिको, कतार आणि सौदी अरेबिया हे देशसुद्धा उत्सुक आहेत.
गतवर्षी आपला भांडवली खर्च १० लाख कोटी होता. त्याच्या आदल्या वर्षी ७.५ लाख कोटी इतका होता; तर यंदा ही रक्कम ११,११,१११ कोटी इतकी आहे. क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी फार तर ५ हजार कोटी लागतील. हीच रक्कम २० हजार कोटींपर्यंत गेली तरी आपण या सुविधा तयार करू शकतो, असा विश्वास व्यक्त करताना अनुराग ठाकूर यांनी ऑलिंपिकच्या आयोजनात निधीची कमतरता असणार नाही, असे स्पष्ट केले.
केंद्र सरकारने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्या अगोदर २०३० मधील युवा ऑलिंपिकचे यजमानपद मिळवून आम्ही पहिले पाऊल टाकणार आहोत. ही युवा ऑलिंपिक अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता अधिक आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. किरण रिजिजू यांच्याकडून २०२१ मध्ये क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणारे ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधील हमिरपूर या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. देशात होत असलेल्या आर्थिक प्रगतीमुळे आपण ऑलिंपिकच्या आयोजनाचे स्वप्न बाळगले आहे. आपल्या देशात रेल्वे, विमानतळ आणि रस्त्यांचे भलेमोठे जाळे तयार होत आहे, असे ठाकूर म्हणतात.
ऑलिंपिकसाठी इतका होतो खर्च
२०१६ मध्ये झालेल्या ऑलिंपिकसाठी रिओने ११.१ अब्ज डॉलर, तर २०२० मधील स्पर्धेसाठी टोकियोने १२.९ अब्ज डॉलर खर्च केला होता. २०३६ पर्यंत ही रक्कम अधिक प्रमाणात वाढलेली असेल.
गरिबांचाही फायदा होईल...
अशा भव्य स्पर्धांसाठी वापरण्यात येणारा निधी लोककल्याणासाठी वापरला तर तो अधिक संयुक्तिक ठरेल, असा प्रश्न विचारला असता ठाकूर म्हणाले, अशा स्पर्धा या गरीब आणि उपेक्षितांसाठी वेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरत असतात.
आयपीएलचे उदाहरण
सर्वांसाठी फायदा असे सांगताना ठाकूर यांनी आयपीएलचे उदाहरण दिले. आयपीएलच्या अडीच महिन्यांत हजारो नव्हे तर लाखो लोकांना वेगवेगळ्या मार्गाने रोजगार मिळतो आणि हा पैसा अर्थव्यवस्थेत येत असतो, असे सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.