Virat Kohli T20 World Cup 2024 : विराट कोहली हा भारतीय संघातील चिंतेचा विषय आहे असे आपण कधी ऐकलं नव्हतं. मात्र यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात विराट कोहलीची बॅटिंग स्टाईल हा चिंतेचा विषय म्हणून पाहिला जात आहे.
भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांना भारताच्या टी 20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्याच्या वाटेत विराट आडवा येत असल्याचं जाणवत आहे. विराट कोहलीने टी 20 वर्ल्डकपमध्ये दोनवेळा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवला आहे. नुकतेच त्यानं आयपीएलमध्ये मोठा धमाका करत 741 धावा केल्या आहेत. मात्र तरी देखील तो चिंतेचा विषय आहे.
संजय मांजरेकर यांना विराट कोहलीसारखा तीनही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज चिंतेचा विषय का वाटतोय?
संजय मांजरेकरांनी याबाबत स्टार स्पोर्ट्सशी बोलातना स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, 'सेमी फायनल आणि फायनल सारख्या मोठ्या सामन्यात एकच चिंता आहे विराट कोहली! विराट कोहली मोठ्या सामन्यात सर्व जबाबदारी स्वतःवर घेतो. तुम्हाला सर्व मोठ्या सामन्यात हे जाणवलं असेल. अशा सामन्यात विराटला स्वतः खूप वेळ फलंदाजी करावी असं वाटत असतं.
'त्याची इंडियन क्रिकेटमध्ये तशी प्रतिमा असल्यानं तो ती आपलीच जबाबदारी आहे असं समजून खेळतो. त्यानं खूप वेळ टिकून फलंदाजी करण्यापेक्षा मुक्तपणे बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्यानं त्याच्या प्रतिमेची चिंता करू नये. आपण वनडे वर्ल्डकपमध्ये ते पाहिलं आहे. त्यामुळं सेमी फायनल आणि फायनलमध्ये माझ्या दृष्टीने विराट कोहली हा चिंतेचा विषय आहे.'
मांजरेकर यांनी टी 20 क्रिकेटमधील अँकर इनिंगबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, 'टी 20 क्रिकेटमध्ये आता अँकर रोल असा काही प्रकार उरलेला नाही. तुम्ही प्रथम फलंदाजी करत असाल तर अँकर इनिंगचा संबंधच येत नाही. जर तुम्ही दोन चार विकेट्स गेल्यात म्हणून गोलंदाजाला आदर द्यायला गेला तर तुम्ही दोन तीन षटके वाया घालवता. हे मोठं नुकसान करणारं ठरू शकतं.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.