Shakib on Sehwag Criticism: टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने सेंट विन्सेंटला झालेल्या सामन्यात गुरुवारी नेदरलँड्सला 25 धावांनी पराभूत केले. हा बांगलादेशचा ३ सामन्यांमधील दुसरा विजय होता. त्यामुळे बांगलादेशने सुपर-8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आपले आव्हान कायम राखले आहे.
बांगलादेशच्या या विजयात अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनने मोलाचा वाटा उचलला. त्याने फलंदाजी करताना 46 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
दरम्यान, या सामन्यानंतर शाकिबला पत्रकार परिषदेत भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर शाकिबने खेळाडू मैदानात उत्तर द्यायला येत नाही, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
शाकिबने या सामन्याआधी झालेल्या श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये फारशी चमकदार कामगिरी केली नव्हती. त्याला विकेट घेता आली नव्हती. तसेच त्याने दोन्ही सामन्यांत मिळून 11 धावाच केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीवर सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध बांगलादेशला पराभूत व्हावं लागल्यानंतर टीका केली होती.
सेहवाग म्हणाला होता, 'तुम्ही अनुभवी खेळाडू आहात, याआधी संघाचा कर्णधारही होता, पण तुमची ही अशी आकडेवारी आहे. तुम्हाला स्वत:ची लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला पाहिजे होती.'
'जर शाकिबला त्याच्या अनुभवामुळे संघात घेतलं असेल, तर तसं काही आपल्याला दिसत नाहीये. त्याने किमान खेळपट्टीवर टिकाव तरी धरला पाहिजे.'
'तू काही मॅथ्यु हेडन किंवा ऍडम गिलख्रिस्ट नाही, जे आखुड टप्प्याच्या चेंडूवर पुल शॉट खेळतात. तू एक बांगलादेशचा खेळाडू आहे, तुझ्या दर्जेनुसार खेळ. जर तू पुल किंवा हुक शॉट खेळू शकत नाहीयेस, तर जे शॉट्स तुला माहित आहेत, तेच खेळ.'
दरम्यान, सेहवागने केलेल्या या टीकेबद्दल शाकिबला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यानंतर विचारण्यात आले. त्याला आधी कोणी ही टीका केली हे कळाले नाही. त्यामुळे त्याने पत्रकाराला पुन्हा विचारलं 'कोण?' त्यानंतर जेव्हा पत्रकाराने त्याला सांगितले की विरेंद्र सेहवाग. त्यानंतर त्याने तिखट शब्दात उत्तर दिलं.
शाकिब म्हणाला, 'जर खेळाडू फलंदाज असेल, तर फलंदाजी करून संघासाठी योगदान देणे किंवा गोलंदाज असेल, तर गोलंदाजी करणे, हेच खेळाडूचे काम असते. विकेट मिळणे हा कधीकधी नशीबाचा भागही असतो. जर खेळाडू क्षेत्ररक्षक असेल, तर त्याने प्रत्येक धाव वाचवली पाहिजे आणि त्याला शक्य तेवढे झेल घेतले पाहिजेत. खरंतर कोणाला देण्यासाठी काहीच उत्तर नाहीये.'
'मला वाटतं सध्या संघात असलेल्या खेळाडूने संघासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे. जर तो योगदान देऊ शकला नाही, तर त्याबद्दल चर्चा होणे सहाजिक आहे. मला वाटत नाही की ही काही वाईट गोष्ट आहे.'
दरम्यान, आता बांगलादेशला पहिल्या फेरीतील अखेरचा सामना रविवारी नेपाळविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास बांगलादेश सुपर-8 फेरीत प्रवेश करेल. पण जर ते पराभूत झाले, तर त्यांना श्रीलंका - नेदरलँड्स सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.