मुंबई : आगामी टी-२० विश्वकरंडकाचे बिगुल वाजले असून आता खेळाडू आपला फॉर्म राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसत आहेत. आयपीएलचा यंदाचा मोसम सध्या अंतिम टप्प्यात असून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उद्या (ता. ३) मुंबई इंडियन्स- कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये लढत रंगणार आहे. कोलकता संघासाठी प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी ही लढत महत्त्वाची असून मुंबईचा संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरील. याप्रसंगी टी-२० विश्वकरंडकाच्या दृष्टीने सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या या दोन भारतीय खेळाडूंचा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हार्दिक पंड्याला दहा सामन्यांमधून १९७ धावाच करता आल्या आहेत. यामध्ये एकही अर्धशतक नाही. तसेच १५०.३८च्या स्ट्राईकरेटनेच त्याला धावा करता आल्या आहेत. हार्दिकला गोलंदाजीतही ठसा उमटवता आलेला नाही. त्याने दहा सामन्यांमधून फक्त सहा फलंदाज बाद केले आहेत. एवढेच नव्हे तर ११च्या सरासरीने त्याच्या गोलंदाजीवर धावा फटकावण्यात आल्या आहेत. टी-२० विश्वकरंडकासाठी त्याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यामुळे तरी त्याच्या आत्मविश्वासात भर पडली असेल. मुंबईच्या उर्वरित तीन लढतींमधून त्याला आपली चमक दाखवावी लागणार आहे.
दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमातील लढतींमध्ये खेळला नाही; पण सात सामन्यांमध्ये त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले. या सात सामन्यांमधून त्याने दोन अर्धशतकांसह १७६ धावांची फटकेबाजी करण्यात आली आहे. त्याने १७०.८७च्या स्ट्राईकरेटने धावा केलेल्या आहेत; पण तरीही त्याच्या प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिकप्रमाणे उर्वरित तीन सामने त्याच्यासाठीही मोलाचे ठरणार आहेत.
विजय महत्त्वाचा
कोलकता संघाने १२ गुणांची कमाई केली आहे. त्यांच्या अजून पाच लढती बाकी आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची त्यांना अधिक संधी आहे; पण मागील सहापैकी तीन लढतींमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या लढतीत त्यांच्यासाठी विजय महत्त्वाचा ठरणार आहे. सुनील नारायण, आंद्रे रसेल, फिल सॉल्ट, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग यांच्या खांद्यावर फलंदाजी अवलंबून असणार आहे. तसेच सुनील नारायण याच्यासह हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा यांना गोलंदाजीत धमक दाखवावी लागणार आहे. मिचेल स्टार्कचा सुमार फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे.
रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. रोहितने यंदाच्या आयपीएल मोसमात आतापर्यंत ३१५ धावा फटकावल्या असून यामध्ये एक शतकाचा समावेश आहे. १५८.२९च्या स्ट्राईकरेटने त्याने धावा केलेल्या आहेत. टी-२० विश्वकरंडक आता एक महिन्यावर आला असताना त्याचा फलंदाजी फॉर्म महत्त्वाचा भूमिका बजावणार आहे. जसप्रीत बुमराला अखेरच्या लढतींमध्ये विश्रांती देण्यात येते का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.