नवी दिल्ली : आयपीएलमधील इंपॅक्ट खेळाडूच्या नियमावरून अनेक जणांनी नापसंती व्यक्त केली आहे; परंतु भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या नियमाचे समर्थन केले आहे. अशा खेळाडूमुळे स्पर्धेतील अनेक सामन्यांचा थरार अखेपर्यंत रंगला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इंपॅक्ट खेळाडूचा नियम चांगला आहे, इतर खेळांमध्येही अशा प्रकाराचे नियम आहेत. इंपॅक्ट खेळाडूमुळे काही सामने अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेले आहेत. गतवर्षीही तसेच घडले होते, त्यामुळे हवे तर या नियमात सुधारणा करा; पण हा नियम आयपीएलसाठी चांगला आहे, असे शास्त्री यांनी आर. अश्विन याच्या यूट्युब चॅनेलवर चर्चा करताना सांगितले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंपॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी झाले आहे, असे मत व्यक्त केले होते. अशीच भावना काही आजी- माजी खेळाडूंनीही व्यक्त केलेली आहे. आपल्या यूट्युब चॅनेलवर चर्चा करताना अश्विनने तर ध्रुव जुरेलचे उदाहरण दिले. गत आयपीएल स्पर्धेत तो इंपॅक्ट खेळाडू म्हणून खेळत होता आणि तेथे केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला पदार्पण करता आले, असे अश्विन म्हणाला.
जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे नियम आणले जातात तेव्हा काही जण हे नियम कसे अयोग्य आहेत हे सांगत असतात; परंतु १९० किंवा २०० पेक्षा अधिक धावा होत असतात तेव्हा प्रत्येक जण मिळालेल्या संधीचा कसा फायदा घेत असतो हे दिसून येते, अशा उदाहरणासह शास्त्री यांनी या नियमाचे समर्थन केले.
इंपॅक्ट खेळाडूचा नियम कायमस्वरूपी नाही. यंदाची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर आयपीएलशी संबंधित असलेल्या सर्वांशी चर्चा करून या नियमाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. इंपॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे दोन अतिरिक्त भारतीय खेळाडूला सामन्यात खेळण्याची संधी मिळते हेसुद्धा नाकारता येणार नाही, असेही शहा म्हणाले होते.
आम्हाला आयपीएलमधील प्रत्येक सामना चुरशीचा आणि रंगतदार झालेला पाहायचा आहे; परंतु प्रामुख्याने खेळाडूंनी या नियमाला विरोध केला तर हा नियम आम्ही रद्द करू; परंतु अजूनपर्यंत कोणीही अधिकृतपणे आम्हाला हा नियम नको, असे सांगितलेले नाही. आयपीएलनंतर लगेचच ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. ती पूर्ण झाली की आम्ही फेरआढाव्यासाठी सविस्तरपणे चर्चा करणार असल्याचे शहा यांनी सांगितले होते.
कशी झाली होती सुरुवात?
२०२३ मध्ये इंपॅक्ट खेळाडूचा नियम प्रथम वापरण्यात आला होता; परंतु या स्पर्धेअगोदर झालेल्या मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेत बारावा खेळाडू कोणत्याही क्षणी फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, असा नियम तयार करण्यात आला होता. त्यात सुधारणा करून इंपॅक्ट खेळाडू असा नियम आयपीएलसाठी वापरण्यात आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.