Rajarshri Shahu Maharaj Jayanti 2024 : esakal
लाइफस्टाइल

Rajarshri Shahu Maharaj Jayanti 2024 : शाहु राजांची मैत्री निराळीच; चित्तीणही जंगलातून वाट काढत आली अन् महाराजांवर रूसून बसली!

सकाळ डिजिटल टीम

Rajarshri Shahu Maharaj Jayanti 2024 :

रयतेचे राजे राजर्षी शाहु महाराज आजही जनतेच्या मनावर राज्य करत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच शाहु राजांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो.

रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जसे जनतेवर प्रेम होते, तसेच त्यांचे जनावरांवरदेखील प्रेम होते, जनावरांना, श्वापदांना आपण प्रेम दिले की, तीही आपल्यावर तेवढेच प्रेम करतात. हे महाराजांनी सिद्ध करून दाखविले होते. प्रेमात शक्ती असते, त्यात चमत्कारदेखील असतो. महाराजांनी सोनतळी कॅम्पवर एका क्रूर खुनशी आफ्रिकन चित्त्याला पाळले होते. (Rajarshi Shahu Maharaj)

महाराजांनी तसे अनेक प्राणी पाळले होते. यात रानटी शिकारी कुत्री, चित्ते यांचाही समावेश होता. 70 वर्षांपूर्वी भारतामधून हीच चित्त्याची जात कायमचीचं नामशेष झाली. त्याच चित्त्यांना आता थेट आफ्रिकेतून पुन्हा भारतात आणण्यात आले आहे.

मात्र तुम्हाला माहिती आहे का एक काळ होता जेंव्हा छत्रपती शाहू महाराज याच चित्त्यांना शिकारीसाठी पाळत होते. एक दोन नव्हे तर तब्बल 35 हुन अधिक चित्ते त्यांनी पाळले होते. 

आजतागायत तरी अशा चित्त्याला कोणी पाळले नव्हते, परंतु महाराजांनी हे आक्रित करून दाखविले होते. तसेच महाराजांजवळ आफ्रिकन चित्त्याची एक मादीसुद्धा होती. या मादीला बालपणापासून महाराजांनी लळा लावला होता. ही बंधमुक्त मादी महाराज कॅम्पवर आले की, त्यांच्या अवतीभोवतीच सतत वावरत असे. हरणांच्या कळपातील फक्त काळविटाचीच शिकार करण्याची कला महाराजांनी तिला शिकविली होती. (Cheetah)

आफ्रिकन चित्ता व चित्तीण महाराजांनी पाळली आहे. ही खबर इतर संस्थानिकांनाच नव्हे तर ब्रिटिशांनादेखील खरी वाटत नसे. चित्तीण तर बंधमुक्त असते, यावरदेखील कोणी विश्वास ठेवीत नसत. महाराजांच्याजवळ देशोदेशींचे अनेक चित्ते होते. महाराजांजवळ एक नागपुरी चित्ता व माजात आलेली वरील चित्तीण होती.

आफ्रिकन चित्ता-चित्तीण एकत्र आणण्यापेक्षा नागपुरी चित्ता व आफ्रिकन चित्तीण यांच्यात संकरित जात निर्माण करावी, म्हणून महाराजांनी या दोघांना रायबागच्या जंगलात सोडून दिले. दोघांची जोडी जमली. दिवसभर ते जंगलात भक्ष्य शोधण्यासाठी एकत्र फिरत व रात्र होताच परतत.

महाराजांनी रायबागच्या ज्या शिकारखान्यात त्यांना ठेवले होते, तिथे ते परत येत व परत पहाटेच्या वेळी ते जंगलात जात. असेच काही दिवस निघून गेल्यावर त्या उभयतांच्यात रानटीपणा वाढला. आता माणूस दिसला की ते दूर दूर पळू लागले.

एक दिवस काय झाले कोणास ठाऊक, त्या चित्तीणीने व चित्त्याने एकाएकी जंगल सोडून दिले व 'पूर्वी महाराजांनी त्या चित्तीणीला व चित्त्याला शिकारीनिमित्त ज्या ज्या शिकारतळांवरून फिरविले होते. तिथे तिथे ती जोडी जाऊन पोहोचली.

चित्तीणीला महाराजांचा अधिक लळा असल्यामुळे तिने पुढे होऊन त्या शिकारतळांचा कानाकोपरा पालथा घातला. तिथे तिला कोठेही महाराज दिसले नाहीत, ती नाराज झाली. कोणत्याच शिकारतळावर महाराज नाहीत म्हटल्यावर ते दोघे भिर्डीला आले.

तिथेही महाराज नव्हते. तिथून पुढे सौंदती, जुंगूळ, शेडबाळवरून ते दोघे दानवाडला आले. तिथेही महाराज नाहीत हे कळल्यावर पंचगंगा नदी पार करून हुपरी, रेंदाळ पार्कात आले. नंतर सरळ कोल्हापूर शहराच्या पुर्वेकडील कागल नाक्याजवळ आले.

चित्तीण तर पुढे सारखी धावतच होती. पाठीमागून तो नर येत होता. कागलजवळ आल्यावर चित्तीणीच्या लक्षात आले की, चित्ता आपल्या सोबत नाही. त्या चित्त्याला शोधण्यासाठी ती टेकडीवर चढली. टेहळणी करू लागली. तिला तो चित्ता कोठेच दिसला नाही.

त्याचा नाद तिने सोडला व धावतच ती महाराजांच्या कोल्हापूरातील स्टेशन बंगल्याच्या आवारात आली. तिथे असणारी माणसांची वर्दळ पाहून ती परत माघारी परतली ती सरळ महाराजांच्या बावडे बंगल्यावर आली. सुदैवाने महाराज या वेळी बंगल्यात होते.

चित्तीण आल्याची खबर मिळताच महाराज धावतच बाहेर आले. महाराजांना पाहताच ती चित्तीण आनंदाने जागेवरच जोरजोरात हालचाल करू लागली. एकदम काय त्या चित्तीणीच्या मनात आले कोणास ठाऊक, महाराजांविरूद्ध बाजूला तोंड करून ती उभी राहिली. महाराजांनी ओळखले, ही आपल्यावर खूप रागावलेली आहे.

महाराज तिच्याजवळ गेले, त्याबरोबर महाराजांना एकही नख न लागू देता तिने खूप चापट्या मारल्या. महाराजांना अक्षरश: इकडून तिकडे घोळसविले. महाराज म्हणाले, “बाई, माझं चुकलं. मी परत तुला जंगलात पाठविणार नाही." असे म्हणताच चित्तीण एकदम शांत झाली. तिला भूकसूद्धा लागली होती. महाराजांनी स्वतःच्या हातांनी तिला पोटभर खावयास घातले.

(संबंधित प्रसंग प्रा. नानासाहेब साळुखे यांच्या ‘शाहूंच्या आठवणी’ या पुस्तकातून घेण्यात आले आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT