Jalgaon-Raver Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

Eknath Khadse: तावडे, मुंडेंनंतर खडसेंचे होणार भाजपमध्ये पुनर्वसन? पवारांना डच्चू देण्याची चर्चा का झाली सुरू...

Komal Jadhav (कोमल जाधव)

Eknath Khadse:

जळगाव जिल्हा... उत्तर महाराष्ट्रातला महत्वाचा असा मतदारसंघ... जळगाव आणि रावेर या मतदारसंघावर कायम शिवसेना-भाजप युतीचं प्राबल्य राहिलं आहे. अशातच जळगावातलं एक बडं नाव आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

इंग्रजी वर्तमानपत्र टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, खडसे पुन्हा भाजपात परतण्याच्या चर्चा आहेत. आता या चर्चांमुळे एकनाथ खडसे पवारांना डच्चू देणार का? घरवापसी करुन भाजप त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार का? फडणवीस आणि महाजनांची यात काय भूमिका असेल? हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार भाजपाचे आहेत. ते म्हणजे cघातून उन्मेष पाटील तर रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे भाजपाकडून खासदार आहेत. पण, भाजपाच्या याच यशामागे खडसेंचंही योगदान राहिलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्यावेळी जळगावात भाजपाचं काहीच स्थान नव्हतं, त्यावेळी भाजपाला तळागाळापर्यंत पोहचवण्याचं महत्वाचं काम एकनाथ खडसेंनी केलं. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातलं प्रतिष्ठित नाव म्हणजे एकनाथ खडसे.

बरं २००९ ते २०१४ दरम्यान खडसे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे २०१४ साली त्यांचंच नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. पण इथे फडणवीसांनी बाजी मारली आणि ते मुख्यमंत्री झाले. तर, खडसे राज्याचे महसूलमंत्री झाले.

आता हा मी राजकीय घटनाक्रम सांगितला तो तेव्हाचा आहे, जेव्हा खडसे भाजपात होते... आता हे का सांगते? कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसेंच्या भाजपात घरवापसीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

खडसे भाजपात परतणार?

त्याचं झालं असं की, नुकतेच खडसे दिल्लीला जाऊन आले. सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणासाठी वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला आल्याचं खडसेंनी सांगितलं. पण खडसेंची दिल्लीवारी भाजपात घरवापसी करण्यासाठी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण सध्या दिल्लीतील सर्व भाजपप्रवेश हे राष्ट्रीय महासचिव आणि दिल्ली दरबारी वजन वाढवलेल्या विनोद तावडेंच्या उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे खडसे-तावडेंमध्ये चर्चा झाल्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत.

खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तेव्हा काय परिस्थिती होती?

आधी सांगितल्याप्रमाणे २०१४ साली मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली अन् खडसे महसूलमंत्री झाले. कथित भोसरी भूखंड खरेदी घोटाळ्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे २०१६ साली फडणवीसांनी खडसेंचा महसूलमंत्रिपदाचा राजीनामा घेतला आणि पुढे जे झालं ते संपूर्ण राज्यानं पाहिलं.

त्यानंतर फडणवीसांविरुद्ध खडसेंनी वेळोवेळी आपला राग, संताप बोलून दाखवला. २०१६ नंतर काही काळासाठी खडसे विजनवासात गेले. २०१९ साली त्यांचं आमदारकीचं तिकीट कापण्यात आलं. खडसेंच्या बाजूनं असणाऱ्या विनोद तावडे, पंकजा मुंडेंसारख्या नेत्यांनाही हळूहळू भाजपा प्रदेश कार्यकारिणीतून बाजूला सारण्यात आल्याचं दिसलं. त्यामुळे भाजपाकडून मिळणाऱ्या वागणुकीला वैतागलेल्या खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली अन् ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रवादीची वाट धरली.

खडसे पवारांना डच्चू देणार?

खरंतर १९८० ते २०२० असा तीन दशकांचा खडसेंचा मोठा राजकीय प्रवास राहिला आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांनी भाजपला तळागाळापर्यंत पोहचवण्याचं काम केलंय. आज जो भाजप गावपातळीवर पोहचला आहे. त्यातही खडसेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. पण २०१९ साली खडसेंचं आमदारकीचं तिकीट कापलं अन् तिथूनच खडसे विरुद्ध महाजन आणि फडणवीस यांच्यातला संघर्ष चव्हाट्यावर आला.

अखेर २०१९ ते ऑक्टोबर २०२० पर्यंत खडसे विजनवासात होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत त्यांनी पुन्हा राजकारणात एन्ट्री घेतली. पवारांनीही त्यांना थेट नेतेपद दिलं अन् मग विधानपरिषदेचं आमदार केलं. अन् विजनवासात गेलेल्या खडसेंना पुन्हा राजकारणाची दारं खुली केली. पण आता ३ वर्षांनी पुन्हा भाजपात पक्षप्रवेश करुन खडसे पवारांना डच्चू देणार असल्याबाबतही बोललं जातंय.

खडसेंचं राजकीय पुनर्वसन होणार का?

२०२० साली प्रवेश झाल्यानंतर खडसे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जोमात तयारीला लागले होते. मागील २ वर्षात शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष फुटला. त्यानंतर आता राज्यातील सर्व सत्तासमीकरणं बदलली आहेत. २०१९ साली खडसेंसोबतच बाजूला केलेले विनोद तावडे, पंकजा मुंडेंचं पक्षानं राजकीय पुनर्वसन केलंय. तावडे आता दिल्लीदरबारी सक्रीय झालेत. पक्षाकडून राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीनं सांभाळताना दिसताहेत.

पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे तावडे, मुंडेंपाठोपाठ ३ दशकं ज्यांनी पक्षविस्तारासाठी प्रयत्न केले अशा एकनाथ खडसेंनाही आता पक्षात परत घेण्याची तयारी सुरु असल्याच्या चर्चा आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन या दोघांवरही खडसे नाराज होते. मात्र ते दोघेही खडसेंच्या घरवापसीसाठी अनुकूल असल्याचं समजतंय. त्यामुळे खडसेंची घरवापसी झाल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवून पक्ष त्यांचं राजकीय पुनर्वसन करु शकतो, अशी चर्चा आहे.

खरंतर सून रक्षा खडसेला लोकसभेचं तिकीट भाजपनं दिलं. त्यानंतर खडसेंनी दिल्ली दौरा केल्यानं या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आधी खासगी कामासाठी दिल्लीला गेल्याचं सांगणाऱ्या खडसेंनी दिल्लीहून परतल्यानंतर सूचक प्रतिक्रिया दिली.

‘दिल्लीत जे झाले त्याविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढची दिशा ठरवू’, असं सांगताच खडसेंच्या भाजप घरवापसीचं निश्चित ठरल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. त्यामुळे आता यावर खडसे पुन्हा स्पष्ट काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT