लोकसभा २०२४

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

सकाळ वृत्तेसवा

मतदान ही अत्यंत विचारपूर्वक करायची बाब आहे. आपल्याकडे मात्र काही लोक भावनेच्या भरात मतदान करतात. याचे उदाहरण १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघात पाहायला मिळाले होते. या मतदारसंघात झालेल्या लढतीत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी भारतीय लोकदलाचे दिग्गज नेते हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला होता. ही निवडणूक विविध कारणांमुळे चांगलीच गाजली होती.

हेमवती नंदन बहुगुणा हे मूळ काँग्रेसचेच नेते. आणीबाणी प्रकरणावेळी त्यांनी पक्षत्याग करत जनता पार्टीला साथ दिली. जनता पार्टीचे सरकार स्थापन होण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा होता. यामुळे काँग्रेसचा त्यांच्यावर राग होता. १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या ऑक्टोबरमध्ये झाली आणि त्याच वर्षी डिसेंबरअखेर लोकसभेची निवडणूक झाली. इंदिरा गांधींनंतर पक्षाची आणि विजयाची जबाबदारी राजीव गांधी यांच्या खांद्यावर आली होती. अलाहाबादमधून काँग्रेसने के. पी. तिवारी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, बहुगुणा यांनी येथून उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजीव यांनी अगदी ऐनवेळी त्यांचे मित्र अमिताभ बच्चन यांना मैदानात उतरविले.

बहुगुणा हे कसलेले राजकारणी असले आणि अलाहाबादमधून एकदा विजयीही झाले असले तरी, सुपरस्टार असलेल्या अमिताभ यांच्या ‘ग्लॅमर’ची मोहिनी तमाम लोकांवर होती. हा ‘छोरा गंगा किनारेवाला’ प्रत्यक्ष दिसतो कसा, हे पाहण्यासाठी हजारो लोक तासन्‌ तास वाट पाहात असत. त्यांच्या रोड शोवेळी तरुण मुलींची तर प्रचंड गर्दी होत असे. त्यामुळे बहुगुणा यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीची आणि केलेल्या कामांची वारंवार उजळणी केली तरी अमिताभ यांच्या ‘जादू’पुढे ती कामगिरी फिकी दिसत होती.

या ग्लॅमरचा प्रभाव मतदानातही दिसला. मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जेव्हा मतपेट्या उघडल्या, त्यावेळी ते आश्‍चर्याने थक्क झाले. अनेक मतपत्रिकांवर युवतींनी अमिताभ यांच्या नावासमोर शिक्का तर मारलाच होता; पण ओठांवरील लिपस्टिकचा वापर करत आपल्या प्रेमाचाही ठसा उमटविला होता. अर्थात, लिपस्टिकच्या खुणा असलेल्या जवळपास चार हजार मतपत्रिका बाद ठरल्या. पण तरीही, अमिताभ यांचा एक लाख ९० हजार मतांनी विजय झाला.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८५ जागांपैकी ८३ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. केवळ दोनच जागांवर त्यांना विजय मिळाल नाही. याच उत्तर प्रदेशमध्ये सध्या काँग्रेसकडे केवळ दोनच जागा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT