आघाडी, महायुतीकडून राष्ट्रीय, राज्यपातळीवर नेते-मंडळींच्या बऱ्यापैकी सभा मतदारसंघातील विविध भागांत झाल्या आहेत.
कोल्हापूर : संवाद मेळावा, वैयक्तिक गाठीभेटी, मिसळ पे चर्चा, सभांच्या माध्यमातून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यात आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. प्रचारासाठी तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचविण्यासाठी उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी ‘घर टू घर’ प्रचाराचा वेग वाढविला आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीकडून (Mahayuti) अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा कोल्हापुरात प्रचार सुरू झाला. त्यानंतर हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti), माजी आमदार सत्यजित पाटील, आदींनी प्रचाराचा प्रारंभ केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराची गती आणखी वाढली. आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्याने चुरस वाढली आहे. ती प्रचारातही आहे.
ग्रामीण भागातील विविध गावांसह कोल्हापूर (Kolhapur) शहरातील विविध पेठा, कॉलनींमध्ये दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरात प्रचार सुरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तीन ते चारवेळा या दोन्ही उमेदवारांची पत्रके प्रत्येक मतदाराच्या घरात वितरित केली आहेत. विविध संघटना, क्षेत्रनिहाय मेळावे, संवाद कार्यक्रम घेतले जात आहेत. मतदारसंघातील प्रत्येक घटकांपर्यंत त्याद्वारे पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाविकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा घेण्यात आली. त्यात जोरदारपणे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दिवसागणिक उन्हासह प्रचाराचा पाराही वाढत आहे.
आघाडी, महायुतीकडून राष्ट्रीय, राज्यपातळीवर नेते-मंडळींच्या बऱ्यापैकी सभा मतदारसंघातील विविध भागांत झाल्या आहेत. त्यातून एकमेकांच्या पक्ष, कार्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. उमेदवारांचा बहुतांश गावांचा दौरा पूर्ण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रविवार (ता. ५) हा प्रचारासाठीचा अखेरचा दिवस असणार आहे. या उरलेल्या दिवसांमध्ये जास्तीतजास्त मतदारांपर्यंत आपली भूमिका आणि चिन्ह पोहोचविण्यासाठी ‘घर टू घर’ प्रचारावर भर देण्याचे नियोजन उमेदवार, त्यांच्या नेत्यांनी केला आहे. त्यांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते राबत आहेत. पक्षाचे स्कार्फ, टोपी घालून मतदानाचे आवाहन करत प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्ते पोहोचत आहेत. त्याने प्रचारातील रंगत वाढत आहे.
महायुतींकडून दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रांतील विकास आणि यापुढील काळातील विकासाची गॅरंटी या मुद्द्यांवर अधिक भर देऊन प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीकडून देशाबरोबरच स्थानिक विकासाकडे केंद्र सरकारचे झालेले दुर्लक्ष, भविष्यात कशा पद्धतीने समाजातील विविध घटकांना न्याय देणार याबाबतचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात आहे.
यापुढील तीन दिवसांमध्ये आता पदयात्रा आणि जिल्ह्यातील स्थानिक आणि राज्य पातळीवर काही नेत्यांच्या सभा रंगणार आहेत. शहरातील काही भागांमध्ये कॉर्नर सभांचेही नियोजन सुरू आहे. गल्ली-बोळांतून प्रचाराच्या वाहनांचा आवाज आणखी घुमणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.