BRS on Ajit Pawar : महाराष्ट्राचे राजकारण झपाट्याने बदलत आहे. अजित पवार यांनी आपल्या अनेक समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात बंडखोरी केली असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भारतीय राष्ट्र समीतीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. बीआरएस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना गाडण्याचे वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री बिआरएसचा असेल, असे भाकित केले आहे.
माणिक कदम म्हणाले, "रात्रीचा खेळ चाले या प्रकारे महाराष्ट्रामध्ये शपथविधी झाला आहे. महाराष्ट्रातील जनता डोकं खाजवायला लागली आहे की आता काय कारायचं आणि कुणाला मतदान करायचं. मात्र मतदार आता हुशार झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता के चंद्रशेखर राव यांच्या पाठीमागे उभी आहे.
"राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांना मतदान टाकलं तरी ते लोक भाजपकडे जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सक्षम पर्याय बीआरएस देणार आहे. येणाऱ्या काळात बीआरएसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार आहे. बीआरएस ना भाजपची टीम आहे ना काँग्रेसची टीम आहे. आम्ही शेतकऱ्यांची टीम आहोत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही," असा इशारा माणिक कदम यांनी दिला आहे.
बीआरएस महाराष्ट्रात स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करत आहेत. नांदेड, नागपूर, सोलापूर येथे के चंद्रशेखर राव यांनी सभा घेतल्या होत्या. अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळात बीआरएस नवीन पर्याय देणार का?, हे आगामी निवडणुकांनंतर स्पष्ट होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.