Ashadhi Wari sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari : वारीतून क्रोधमुक्त जीवनाची शिकवण

सकाळ वृत्तसेवा

जीवनमूल्ये

डॉ. यशोधन महाराज साखरे

मानव अविवेकी विचारहीन होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी क्रोध हे महत्त्वाचे कारण आहे. क्रोध म्हणजे काय? मानवाच्या मनांत पूर्वसंस्कार, तत्कालीन परिस्थिती, संगती, चिंतन आदी कारणांनी एखाद्या पदार्थाच्या प्राप्तीची अथवा निवृत्तीची इच्छा निर्माण होते. त्यानंतर त्याच्या प्राप्तीसाठी मानव प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात इच्छा परिपूर्तीसाठी एखाद्या व्यक्तीचा अथवा वस्तूचा प्रतिबंध येतो. त्या संबंधी निर्माण होणाऱ्या भावनेला क्रोध असे म्हणतात.

क्रोधामुळे माणसाच्या ठिकाणी अविवेक निर्माण होतो. यामुळे क्रोधाविष्ट माणसाला, आपण काय करतो आहे, याचे भान राहत नाही. या विषयी श्रीमद् वाल्मीकी रामायणात, ‘वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित्। नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नवाच्यं विद्यते क्वचित्॥’ असा श्‍लोक आहे. याचा भाव असा की, क्रोधाविष्ट माणसाला काय बोलावे व काय बोलू नये याचा विवेक राहात नाही. क्रुद्ध मनुष्य काहीही बोलू शकतो व काहीही करू शकतो. त्याच्या दृष्टीने काहीही अकार्य आणि अवाच्य राहात नाही.

कित्येकदा क्रोधाग्नी शांत झाल्यावर, किंचित विवेक जागा झाल्यावर त्या क्रोधाविष्ट माणसाला आपण केलेल्या गोष्टींचा पश्‍चात्ताप होतो. परंतु, कित्येकदा ती गोष्ट घडून गेल्यानंतर झालेल्या पश्चात्तापाचा काही उपयोग होत नाही. या विषयी सुभाषितकार म्हणतात, ‘क्रोधो मूलमनर्थानां क्रोधः संसारबन्धनम्। धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात् क्रोधं विवर्जयेत्॥’ याचा भावार्थ असा की, क्रोध हा समस्त संकटांचे मूळ कारण आहे. क्रोध संसार बंधनाचे कारण आहे. क्रोध धर्माचा नाश करणारा आहे. यास्तव क्रोधाचा त्याग करणे आवश्यक आहे. क्रोधाचा त्याग करण्याला अक्रोध असे म्हणतात. हे एक मानवी जीवनमूल्य आहे. पण, ‘मी कोणावरही, कधीही रागवणार नाही’ असे घोकून अथवा तसा निश्‍चय करून क्रोधत्यागरूप अक्रोधिता अंगी बाणवणे प्रत्येकवेळी प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. किंबहुना एखाद्या माणसाने सांगितले की, ‘मी क्रोधाचा त्याग केला आहे’ आणि त्याला कोणी वारंवार विचारले की, ‘तुम्ही कशाचा त्याग केला आहे?’ तर विचारणाऱ्याचाच त्या माणसाला क्रोध येतो. असे असल्याने अक्रोधिता अवस्थेसाठी क्रोधाचे जे कारण आहे, त्याचा परित्याग करणे आवश्यक आहे.

श्री भगवान या क्रोधाच्या कारण परंपरेविषयी म्हणतात, ‘कामात् क्रोधोभिजायते।’ कामना हे क्रोधाचे कारण आहे. यास्तव अक्रोधितावस्था येण्यासाठी मानवाने प्रथमतः निष्काम होणे आवश्यक आहे. श्री हनुमंतरायांचे वर्णन करताना श्रीसंत नामदेव महाराज म्हणतात, ‘खेळिया माजी हनुम्या शहाणा। न पडे काम व्यसनी रे। कामचि नाही तेथे क्रोधची कैचा। तेथे कैचे भांडण रे।’ श्री हनुमंतराय अक्रोधी का आहेत? त्याचे कारण ते निष्काम आहेत.

निष्कामता साधण्यासाठी कोणती साधना करावी, या विषयी श्री एकनाथ महाराज म्हणतात, ‘तैसे घेता राम-नाम। नुरे तेथे क्रोध-काम॥’ मुखाने भगवंताचे नाम घेतल्याने काम क्रोध हे निवृत्त होतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, ‘काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली। आवडी धरिली पायासवे॥’ विठ्ठल स्वरूपाची आवड निर्माण झाल्यामुळे आम्ही काम क्रोधाधिकही श्री विठ्ठलाला समर्पण केले आहेत. वारीमध्ये भगवंत नामोच्चारण घडते आणि विठ्ठलाची आवड आहेच. या दोन साधनांद्वारे वारकरी हे पंढरीकडे वाटचाल करण्याबरोबरच अक्रोधितेकडेही वाटचाल करीत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT