devendra fadnavis mi punha yein
devendra fadnavis mi punha yein esakal
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'मी पुन्हा येईन'पासून 'मला जाऊ द्या'पर्यंतचा प्रवास; मागच्या पाच वर्षांमध्ये फडणवीसांचं राजकारण कसं बदललं?

संतोष कानडे

Devendra Fadnavis Latest News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वास्तविक त्यांच्या पक्षाकडून त्यांना तसं न करण्याची गळ घातली जात आहे. ज्या फडणवीसांनी २०१९ मध्ये 'मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता, त्याच फडणवीसांना 'मला जाऊ द्या' असं म्हणण्याची वेळ का आली? मागच्या पाच वर्षांमध्ये फडणवीसांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता? आणि भविष्यात फडणवीसांबाबत पक्ष काय निर्णय घेईल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

२०१४चा पूर्वाध आणि उत्तरार्ध

२०१४पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीसांना पक्षाने अचानक मुख्यमंत्री केलं, तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. कारण एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे असे दिग्गज नेते भाजपकडे असतानाही पक्षाने फडणवीसांना संधी दिली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची प्रशासनावर असलेली पकड, विषय समजून घेण्याची हातोटी आणि कामाचा उरक यामुळे सगळेच दिपून गेले होतं. शिवाय पक्षावरही त्यांचीच पकड होती.

२०१९च्या निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी भाजपमध्ये मेगा भरती केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये मेगाभरती झाली. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हाही फडणवीसांचं कसब आणि त्यांच्या राजकीय चातुर्याची चर्चा झाली होती.

शरद पवारांमुळे फडणवीसांचं एक पाऊल मागे

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीच्या आलेख खालच्या दिशेने सरकू लागला. त्याचं कारण होतं, अजित पवारांचं बंड. शरद पवारांकडून महाविकास आघाडीचा प्रयोग सुरु असतानाच अचानक अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीसांना पहाटेचा शपथविधी केला. तो प्रयोग फसल्याने फडणवीसांची नाचक्की झाली. पहाटेच्या शपथविधीचे अनेक कांगोरे आहे आणि कितीतरी गोपनिय मुद्दे आहेत. परंतु पक्षात आणि पक्षाबाहेर फडणवीस तोंडावर पडले होते. त्यामुळे त्यांचं एक पाऊल मागे पडलं.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं खरं पण फडणवीसांनी आपल्या खेळ्या थांबवल्या नाहीत. २०१९मध्ये राज्यात भाजपचे १०५ आमदार निवडून आले होते. तर युतीत असलेल्या शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आलेले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले होते. भाजपकडे मोठं संख्याबळल असतानाही ठाकरे-पवारांनी त्यांना खुबीने सत्तेबाहेर ठेवलं होतं. त्यामुळेच पुन्हा सत्तेत येण्यासाठी फडणवीसांनी खेळ्या सुरुच ठेवल्या होत्या.

पुन्हा सत्ता आली पण...

फडणवीसांच्या राजकीय चातुर्याची पक्षाला फायदा झाला आणि २०२२ मध्ये राज्यात पुन्हा एकदा सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे ४० आमदार पक्षातून बाहेर पडले आणि भाजपशी घरोबा केला. राज्यात भाजप आणि नव्या शिवसेनेचं सरकार स्थापन झालं. मास्टरमाईंड असलेले फडणवीस मुख्यमंत्री होती आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असं चित्र असताना अचानक शिंदेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं. सर्वांनाच धक्का होता. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा इतिहास बघता, असे धक्के ते सातत्याने देत असतात. यामुळे फडणवीस आणखी एक पाऊल मागे पडले.

एकामागोमाग एक पावलं मागे पडत गेली

प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. एकनाथ शिंदेंचं नाव फायनल झाल्याचं जाहीर केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा आग्रह केला. इच्छा नसताना फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. 'मी सरकारच्या बाहेर राहून पक्षाचं काम करीन' अशी त्यांची भूमिका होती. परंतु पक्षाने ते काही ऐकलं नाही. शिंदेंच्या नेतृत्वात मागच्या दोन वर्षांपासून ते काम करीत आहेत. फडणवीसांचं तिसरं पाऊल यामुळे मागे पडलं होतं.

शिवसेना-भाजपची तीस वर्षांची नैसर्गिक युती होती. त्यामुळे शिंदेंच्या बंड तसं पचलं गेलं. पण पुढे जेकाही झालं ते धक्का देणारं होतं. देशाच्या पंतप्रधानांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चारच दिवसांनी अजित पवारांनी सरकारमध्ये शपथ घेतली. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, हे तर सर्वश्रुत आहे. त्यांनी अनेकदा तशा इच्छा बोलून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे फडणवीस पुन्हा चौथं पाऊल मागे पडलं.

आज तेच देवेंद्र फडणवीस आणखी चार पावलं मागं जाण्याचा विचार करत आहेत. त्याचं कारण लोकसभा २०२४चे निकाल. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला केवळ ९ जागांवर यश मिळालं आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ जागा जिंकता आल्या. अजित पवारांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं. महाराष्ट्रात एनडीएच्या केवळ १७ जागा निवडून आल्या.

दुसरीकडे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं असून तब्बल ३० जागा त्यांनी जिंकल्या. काँग्रेसने १३ जागा जिंकल्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ९ जागा जिंकल्या तर शरद पवारांच्या पक्षाने ८ जागा जिंकून दमदार यश मिळवलं.

'मला जाऊ द्या' म्हणण्याची वेळ

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचून जात देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षसंघटनेचं काम करुन पुन्हा विधानसभेला सामोरं जावू, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु त्यांच्याच पक्षातल्या इतर पहिल्या फळीतल्या नेत्यांनी, त्यांच्या या निर्णयाला समर्थन दिलेलं नाही. सरकारमधून राहून त्यांनी पक्षाचं काम करावं, अशा भूमिकेत महाराष्ट्र भाजप आहे. शिवाय अमित शाह यांचंही हेच म्हणणं आहे.

मराठा आरक्षण, मुस्लिमांची नाराजी, संविधान बदलाच्या भीतीमुळे दलितांची नाराजी, धनगर आरक्षण.. अशा फॅक्टरमुळे भाजप आणि एनडीएला फटका बसला आहे. पक्षाची प्रतिमा सावरण्यात नेते कमी पडले; त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना आता मला जाऊ द्या, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT