छत्रपती संभाजीनगर: पुढील वर्षी लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. यानिमित्ताने नवीन पक्ष राज्यात आपले नशीब आजमावणार आहे. यात प्रामुख्याने तेलंगाणाचे मुख्यमंत्री यांच्या पक्षाचा प्रयत्न राहील. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हतबल होता कामा नये. पुढील काळात जोमाने कामाला लागावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मिटमिटा येथील सिल्वर लॉन्स येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर घेण्यात येत आहे. शनिवारी (ता.१७) अजित पवार यांच्या हस्ते मशाल पेटवून शिबिराचे उद्घाटन केले.
माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, संजय बनसोडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, प्रकाश गजभिये, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड.
प्रदेश कार्याध्यक्ष तथा शिबिराचे आयोजक प्रा. सुनील मगरे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजक प्रा. सुनील मगरे यांनी प्रास्ताविक केले.
अजित पवार म्हणाले, की सध्याच्या काळात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे विषय महत्वाचे आहेत. आपला पक्ष हा सेक्युलर आहे. बूथनिहाय कमिट्या स्थापन करा, त्यात सर्व समाजाच्या लोकांना सहभागी करुन घ्या.
पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. केवळ गर्दी जमवून आणि घोषणा देऊन चालणार नाही. प्रत्यक्ष कामे करा, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण कधी नव्हे, एवढे राजकारण ढवळून निघाले आहे. आपले सरकार असताना आदिवासींसह सर्व मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या होत्या.
आता त्या थांबविण्यात आल्या आहेत. या विषयी सरकारला देणे-घेणे नाही. सरकार केवळ शिंदेंचे ४० आमदार सांभाळण्यात आणि बदल्यांमधील भ्रष्टाचारात दंग असल्याचा टोलाही अजित पवारांनी लागावला.
आमच्या अडीच वर्षांच्या काळात एकही दंगल झाली नाही. आता एका वर्षांत दंगली झाल्या. धार्मिक गोष्टीवरून भाजप पोळी भाजून घेत आहे. राज्यात नवीन पक्ष येतील, तुम्हाला प्रलोभणे दाखवतील, निधी देतो, निवडणूका खर्च भरतो म्हणतील, याला बळी पडू नका.
सत्तेचा वापर करून माणसे ओढण्याचे काम सुरु आहे, याला बळी पडू नका, असा सल्लाही श्री. पवार यांनी दिला. राजेश टोपे म्हणाले, की जाती-जातीत कडवे हिंदुत्व पसरविण्याचे काम सध्या सुरु आहे. याला आळा घालणे गरजेचे आहे.
७४ टक्के लोकांना शिंदे मुख्यमंत्री नकोत
शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीत २६ टक्के लोकांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून आवडतात. म्हणजेच ७४ टक्के लोकांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नकोत, असे त्या जाहिरातीवरुन कळल्याचा टोला यावेळी श्री. पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचे रान करु, असे एका कार्यकर्त्याने कार्यक्रमात म्हटले. तोच धागा पकडत अजित पवार म्हणाले, की नंदूरबार, धुळे येथे प्रतिनिधी नाही. छत्रपती संभाजीनगरात एकही आमदार नाही.
जालन्यात केवळ एकच आमदार, परभणी एकही नाही, मग कसा होणार मुख्यमंत्री? यासाठी महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणा, असे आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.