महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे मुल्यांकन करण्यासाठी CEC राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन दिल्लीत पोहोचले. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
गाझियाबादच्या लोणी येथील टेक्नो सिटी औद्योगिक परिसरात आज आग लागली आहे.
महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यानंतर भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी अंबरनाथ दफनभूमीची पाहणी केली असून परवानगीसाठी आई-वडील अंबरनाथ नगरपालिकेत अर्ज देण्यासाठी गेले होते.
सिनेट निवडणुकीवरून मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाला झापलं आहे. उद्याच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. मतमोजणी करून निकाल जाहीर करा, असे आदेशच हायकोर्टानं दिले आहेत. उद्याची मतमोजणीला स्थगिती देण्यासंदर्भात काढण्यात आल होतं पत्रक. पत्रकावरून मुंबई हायकोर्टानं खडे बोल सुनावले आहेत.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी अमित शाह, देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र आहे. अण्णा शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात, अमित शाह यांच्याकडं स्वतःचं कुटुंब आणि वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
ज्याप्रमाणे किरीट सोमय्या यांना संरक्षण दिलं आहे, त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावं. कारण किरीट सोमय्या यांच्यापेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफिया आणि त्यांच्या चेले-चपाट्यांकडून आहे, असं पत्रात सांगून संरक्षणाची मागणी केली आहे. हे प्रकरण झाल्यानंतर आम्हाला तसेच आमच्या वकिलांना धमक्या येत आहेत. अक्षय शिंदे याचा खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून 'महाविजय संवाद' यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून युवा सेनेचे पदाधिकारी युवा महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तरूणांशी संवाद साधणार आहेत तसेच शिवसेना सोशल आवाजच्या माध्यमातून कॅम्पेनिंग करत लाडकी बहिण संपर्क अभियन राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक याच्या नेतृत्वात महाविजय संवाद यात्रा काढली जाणार आहे. २७ सप्टेबरपासून या यात्रेला सुरूवात होणार असून मुंबई शहर व उपनगर पहिल्या टप्यात ही यात्रा होणार आहे.
तर १३ आॅक्टोंबर पासून १६ आॅक्टोंबरपर्यंत मराठवाड्यात युवासेनेतर्फे ही यात्रा काढली जाणार असून २० आॅक्टोंबर ते २२ आॅक्टोंबर दरम्यान कोकणमध्ये यात्रा केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात जाऊन शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे.
माहिमच्या हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी हा धमकीचा फोन आला होता. हाजी अली दर्ग्यात बाॅम्ब ठेवल्याची माहिती देत तातडीने दर्गा खाली करण्याची धमकी देण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा फोन आला होता. स्वत:चं नाव पवन सांगणाऱ्या इसमाने अर्वाच्च शिवीगाळ करत दर्ग्या विषयी वादग्रस्त विधानही केली. ताडदेव पोलिस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्ती विरोधात कलम ३५१(२), ३५२, ३५३(२), ३५३(३), भादवी २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मोहाली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशीरा बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधे ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली भेट.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालात पॅरासिटामॉल सह ५० औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरली. सीडीएससीओने पॅरासिटामॉलच्या अनेक गुणधर्मांची चाचणी केली आणि त्यात कॅल्शियम, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी आवश्यक असलेल्या अनेक औषधांचा समावेश होता
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल नुकतेच जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ते तुरुंगात होते. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या इतर नेत्यांसमोर आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
ठग सुकेश चंद्रशेखरने केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांवर 10 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला होता. आता या प्रकरणी सीबीआयने तुरुंगात सुकेशचा जबाब नोंदवला आहे.
पुण्यातील बहुराष्ट्रीय अर्न्स्ट अँड यंग (ENY) च्या 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा कामाच्या दबावामुळे मृत्यू झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या घटनेपासून मोठ्या व्यावसायिक कंपन्यांमधील कामाचा ताण आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी बुधवारी मृत अण्णा सेबॅस्टियन पेरिले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधे ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी संवादही साधला.
मुंबईतल्या सहा जागांवरुन महाविकास आघाडीत तिढा असल्याचे म्हटले जात आहे. भायखळा, अणुशक्ति नगर, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, कुर्ला आणि चेंबूर या जागांवर वाद होण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेले कुरनूर धरण १००% भरले आहे. सतत पडणारा परतीचा पाऊस आणि एकरुख योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातून येत असलेल्या पाण्यामुळे धरण भरले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात तरुणाची हत्या करण्यात आली आहे, संदीप शिरगावे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
४ ऑक्टोबर पर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम आहे. पूजा खेडकरला तोपर्यंत अटक करता येणार नाही
पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामिनासाठी दिलासा मिळत आहे हे गंभीर असा दावा UPSC च्या वकिलांनी केली आहे.
तमिळनाडूचे माजी मंत्री सेंथील बालाजी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. १४ जून २०२३ रोज़ी बालाजी यांना अटक झाली होती. ED कडून त्यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली होती.
शिवसेना खासदार संजय राऊत आज रात्री दिल्लीत येण्याची शक्यता आहे. उद्या दिल्लीतील काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संजय राऊत भेटी घेणार असल्याची माहिती आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मलिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन जागावाटप बद्दल चर्चा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटातील नेते खासदार संजय राऊत सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागावाटपवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
संभाजीनगरमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे. महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची आज रात्री बैठक होईल. तिन्ही घटक पक्षाचे मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत महायुतीची बैठक झाली त्यात ९० जागांवर तिढा आहे त्यावर आजच्या चर्चा होणार आहे. या आजच्या बैठकीतील माहिती अमित शहा यांना मुंबईच्या दौऱ्यावेळीस देण्यात येणार आहे. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. गांधी यांच्या या दौऱ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश काँग्रेसला नवी ऊर्जा मिळणार आहे. त्यामुळे राहुल यांचा हा दौऱ्या महत्त्वाचा मानला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एस पी कॉलेज ला होणार का नवीन ठिकाणी होणार? याबाबत दुपारी बारा वाजता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. गणेश कला क्रीडा रंग मंच मोदींच्या सभेसाठी पर्यायी स्थळ म्हणून निवडण्यात आले आहे. दुपारी बारा वाजता एसपीजी, जिल्हा प्रशासन कोर कमिटी तसेच पोलीस यांच्यात अंतिम बैठक होणार आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. गणेश कला क्रीडा रंग म्हणजे या ठिकाणची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
काँग्रेस नेते विश्वजित कदम सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अशी अचानक भेट घेण्याचं कारण समजू शकले नाही, पण या भेटीच्या वृत्ताने राजकीय तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
पंजाब: पटियाला येथील राजीव गांधी राष्ट्रीय विधी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. कुलगुरू जय शंकर सिंह यांनी वसतिगृहातील महिलांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
- सकाळी ८ वाजता धरणातून ५५३ क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यानं पाण्याचा विसर्ग
- पावसाचा जोर वाढल्यास धरणातून टप्प्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार
- नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट असल्याने यंत्रणा अलर्टवर
- धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास नाशिकमध्ये पुन्हा गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
मुंबई : सर्व लोकल ट्रेन सुरळीत सुरू असून मुख्य मार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार 3-4 मिनिटे उशिरा धावत आहेत. पावसाबाबत सावधानता म्हणून हा निर्णय घेत असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
राशिवडे बुद्रुक : भोगावती साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.२७) दुपारी एक वाजता होत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या साखर कारखान्याच्या पुढील हंगामासंदर्भात धोरण आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीतबाबत या सभेमध्ये चर्चा रंगण्याची शक्यता आहे. याकडे कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या पाच ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. श्री. गांधी कोल्हापुरात होणाऱ्या ‘संविधान सन्मान संमेलनात’ विविध सामाजिक संघटना, मागासवर्गीय संघटना, आदिवासी संघटनेसोबत संवाद साधतील.
कोल्हापूर : लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता ३० सप्टेंबरला जमा होणार आहे. जिल्ह्यात नऊ लाख ९१ हजार ५५३ लाभार्थी आहेत. त्यापैकी एक लाख ११ हजार बहिणींची आधारसोबत बॅंक सिडिंग प्रक्रिया न झाल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चोर असल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलांना रात्रभर बांधून ठेवत, मारहाण करत केस भादरून परिसरातून विवस्त्र धिंड काढल्याचा गंभीर प्रकार विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी सूरज पटवा याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झालीये. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल ५-१० मिनिट उशिराने धावत आहेत. सध्या कोणत्याही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे : राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आजही (ता. २६) पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
Latest Marathi Live Updates 26 September 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या मेट्रो रेल्वेला मोदी सायंकाळी हिरवा झेंडा दाखवतील. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपले सहावे उपोषण नऊ दिवसांनंतर स्थगित केले. तसेच ओबीसीं’चे आरक्षण अबाधित राहावे, ‘ओबीसीं’मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, आदी मागण्यांसाठी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनीही आपले बेमुदत उपोषण स्थगित केले. राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आजही पावसाची शक्यता आहे. सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५ हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.