Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांकडूनच वादाला खतपाणी! आंदोलनकर्त्यांना शब्द काय दिला ते आधी जाहीर करा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील आणि लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी काय शब्द दिले आहेत, ते आधी जाहीर करावेत,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले. ‘आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी नेते वादाला खतपाणी घालणारी विधाने करीत आहेत आणि अस्वस्थता थांबविण्याचे आवाहन आम्हाला करीत आहेत,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार मोहनलाल खाबिया यांच्या स्मरणार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीत उभारलेल्या स्टुडिओचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी पवार यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यावर पवार म्हणाले, ‘‘बारामती आणि बीड येथे भुजबळ यांच्या सभा झाल्या. त्या सभांमध्ये त्यांची भाषणे चांगली झाली, माझ्याबद्दल त्यांनी आस्था व्यक्त केली, असा चिमटा काढून ते पुढे म्हणाले, ‘भुजबळ माझ्याकडे आले, दीड तास थांबलेही.

दोन-चार गोष्टी सांगितल्या. खरे तर महाराष्ट्रात जातीयवाद वाढायला सत्ताधाऱ्यांची वक्तव्ये कारणीभूत ठरली. राज्यकर्त्यांनी वाद मिटविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. आम्हाला बाजूला ठेवून निर्णय घेतले आणि आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज असल्याचे म्हणत आहेत.’

पवार म्हणाले, ‘मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याशी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यांच्यात काय चर्चा झाली, त्यांनी काय आश्वासने दिली, हे त्यांनाच माहीत. त्याची कोणतीही कल्पना दिली नाही.

त्यामुळे आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. ते ही माहिती आम्हाला देत नाहीत, तोपर्यंत आम्ही यावर काही निर्णय घेऊ शकत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ.’

विधान परिषद निवडणुकीतील जयंत पाटील यांच्या पराभवाबाबत पवार म्हणाले, ‘पाटील हे मविआचे उमेदवार नव्हते. मात्र लोकसभेत डाव्यांना जागा देऊ शकलो नाही. परंतु लोकसभेनंतर त्यांना संधी देण्याचे एकमताने ठरले. योग्य व्यूहरचना करून ही निवडणूक लढविली असती, तर तिन्ही जागा निवडून आल्या असत्या.’

भाजपच्या अधिवेशनावरून पवार म्हणाले, ‘निवडणुकीत निकाल कमी-जास्त होत असतात. निकाल विचारात घेऊन तयारी करणे योग्यच आहे. हे सर्वच पक्ष करीत असतात. पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १७ ते १८ सभा घेतल्या. त्यापैकी केवळ चारच जागा निवडून आल्या. विधानसभेलाही त्यांनी यावे. लोक योग्यच निर्णय करतील.’

सर्वांचा विचार घेऊनच पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार परतीच्या वाटेवर आहेत. त्यांना पक्षात प्रवेश देणार का, यावर पवार म्हणाले, ‘‘अडचणीच्या काळात जे सोबत राहिले, त्यांचा आम्ही प्राधान्याने विचार करणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.’’ अजित पवार पुन्हा येणार असतील तर... त्यावरही पवार यांनी हेच उत्तर दिले.

राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारने केलेल्या विविध घोषणांवर पवार म्हणाले, ‘जयंत पाटील यांनी यापूर्वीच राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत आपली मते व्यक्त केली आहेत. यापूर्वी देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरील राज्य होते. आज ते अकराव्या क्रमांकावर गेले आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते काळजी घेत असावेत.’

ही बारामती आहे

अजित पवार यांनी बारामतीमध्ये भरपूर विकासकामे केली. त्यांचा दबदबा असतानाही सुप्रिया सुळे यांना लोकसभेला मताधिक्य कसे मिळाले, या प्रश्‍नावर मिस्कीलपणे हसत ते म्हणाले, ‘ही बारामती आहे. आतापर्यंत मी अनेक निवडणुका लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मी बारामतीत जात होतो. तुमचा लोकांशी संवाद असला पाहिजे. तुम्ही बोलता कसे, वागता कसे यावरून लोक आपली मते ठरवीत असतात.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT