मुंबई- जे नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले आहेत. शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष सोडून गेलेल्यांना आता पक्षात जागा नाही. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७० ते ८० जागा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना पवारांनी दिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाची बैठक पार पडली. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष, खासदार सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात पक्षबांधणीला सुरुवात करा. आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आपल्यालाच काम करायचं आहे. आपणच पक्ष पुढे घेऊन जायचा आहे, अशा सूचना शरद पवार यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.
बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. केंद्र सरकार काही ठराविक लोकांचा प्रचार करण्यासाठी जी-२० कार्यक्रमाचा वापर करत आहे. जी-२० नेत्यांसाठी तांब्याचा-चांदीच्या भांड्याचा वापर मी कधी यापूर्वी ऐकला नाही. नेत्याची प्रतिमा वाढवण्यासाठी हे केलं जातंय, अशी टीका त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा करुन घेण्यासाठी अशाप्रकारचे काम केले जात आहे. यापेक्षा सामान्यांचे हित, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी अशा प्रश्नांकडे सध्याचे सत्ताधारी पाहात नाहीत. याची जाणीव लोकांना करु देण्यासाठी आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन प्रचार करु असं पवार म्हणाले. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.