21 September in History: भाजप-शिवसेना युतीला राज्यात सत्ता स्थापन करण्याची पहिली संधी १९९५ मध्ये मिळाली. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असली, तरीही या युतीत तेव्हाही धुसफूस होतीच. २५ वर्षांपूर्वी खंबाटकी घाटातील बोगद्याच्या भूमिपूजनावरून भाजप-सेनेतील वाद चव्हाट्यावर आले होते. माहीत आहे तेव्हा काय झाले होते? झालं असं, की पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव मान्य झाला होता. यासह पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार होते. पण त्याआधीच शिवसेनेने भूमिपूजन उरकले.
१७४३ : तत्कालीन जयपूर संस्थानचे कर्तबगार व विद्याप्रेमी राजे सवाई जयसिंह यांचे निधन. त्यांनी प्रजेच्या सुखासाठी धर्मशाळा, रस्ते, विहिरी बांधल्या. बादशहाकडून त्यांनी जिझिया कर रद्द करविला. १७२८ मध्ये जयपूर ही राजधानी म्हणून त्या शहराची नवीन रचना केली.
१८४९ : ब्रिटिश साहित्यिक एडमंड गॉस यांचा जन्म. इंग्रजीबरोबरच स्कॅंडिनेव्हियन भाषांतील साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता. त्यांनी इब्सेन यांची नाटके अनुवादित करून इंग्लंडमध्ये लोकप्रिय केली. त्यांनी "फादर अँड सन' हे आत्मचरित्र लिहिले.
१९३१ : सुफी विचाराच्या सद्गुरू हजरत बाबाजान यांचे निधन. पुण्यात लष्करातील चारबावडी परिसरात बाबाजानचा दर्गा आहे.
१९३२ : मराठी संगीत रंगभूमीला नवीन संजीवनी देणारे संगीतकार, शास्त्रीय संगीताचे गायक, चिंतक, अभ्यासक, चतुरस्र प्रतिभेचे कलावंत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म. "पद्मश्री' सन्मान, होमी भाभा सन्मानवृत्ती, महाराष्ट्र शासनाचा "स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार', गोमंतक मराठी अकादमीचा "सूरश्री केसरबाई केरकर', महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार आदींनी पंडितजींना गौरविण्यात आले.
१९५० : इंग्रज खगोलशास्त्रज्ञ, गणिती व विश्वोत्पत्तिशास्त्रज्ञ एडवर्ड आर्थर मिलन यांचे निधन. त्यांचे बरेचसे संशोधन युद्धासंबंधीच्या विषयात असले तरी खगोलभौतिकी व विश्वोत्पत्ती या विषयातील त्यांच्या कामामुळे ते प्रसिद्धीस आले.
१९९३ : चित्रपटसृष्टीतील दिग्गज ताराचंद बडजात्या यांचे निधन
१९९४ : नामवंत उद्योजक आणि अजय मेटाकेम लिमिटेड, युनायटेड मेटाकेम वगैरे कंपन्यांचे संचालक माधवराव गोविंदराव पवार यांचे निधन.
१९९४ : बच्छराज अँड कंपनी, हिंदुस्थान शुगर मिल्स, मॅचवेल इलेक्ट्रिकल्स (इंडिया), हर्क्युलस हॉइस्ट्स वगैरे कंपन्यांचे त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांनी "जपान की सैर', "रुसी युवकों के बीच', "अटलांटिक के उसपार', "द यंग रशिया' व "सोशल रोल ऑफ बिझिनेस' ही पुस्तके लिहिली.
१९९४ : पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या फ्रेंच विभागाच्या प्रमुख डॉ. नीलिमा रेड्डी यांना फ्रेंच भाषा शिकविण्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल फ्रान्स सरकारतर्फे "ख्रुआ द शॉव्हलिअर द लॉर्द दे पाम ऍकॅदेमिक' हा पुरस्कार प्रदान.
१९९५ : पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे प्रभारी संचालक डॉ. पॉल रत्नासामी यांना इटली येथील "थर्ड वर्ल्ड नेटवर्क ऑफ सायंटिफिक ऑर्गनायझेशन'चा तंत्रज्ञानविषयक पुरस्कार जाहीर.
१९९८ : महिलांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत जागतिक विक्रम गेली दहा वर्षे नावावर असलेल्या फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर ऊर्फ "फ्लो जो' हिचे निधन.
१९९९ : ज्येष्ठ नाटककार, नाट्य दिग्दर्शक व निर्माते पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर ऊर्फ "दारव्हेकर मास्तर' यांचे निधन. "मास्तर' हा पूर्वी नाट्यदिग्दर्शकाला दिला जाणारा बहुमोल किताब होता. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद, विष्णूदास भावे पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांसह अनेक सन्मान त्यांना लाभले. "कट्यार काळजात घुसली' हे नाटक त्याच्या वेगळेपणामुळे विशेष गाजले. "अश्रूंची झाली फुले', "इथे ओशाळला मृत्यू', "नटसम्राट', "वीज म्हणाली धरतीला' इ. व्यावसायिक नाटके त्यांनी दिग्दर्शित केली.
२००१ : जहाजावरून जहाजावर मारा करू शकणाऱ्या "धनुष्य' या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.
२००३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि रामजन्मभूमी आंदोलनाचे मार्गदर्शक मोरोपंत मोरेश्वर पिंगळे यांचे निधन.
२००३ : यशस्वी गिर्यारोहण मोहिमेहून परतणारे इंडो-तिबेटी पोलिस दलाच्या पथकातील सर्वच्या सर्व नऊ जण हिमवादळात सापडून मृत्युमुखी पडले. उत्तरांचलमधील पिठोरागड जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. एस. डी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक पंचचुली हे २२,६५२ फूट उंचीचे शिखर सर करण्यासाठी गेले होते. या पथकात दोन शेर्पाही होते.
२००४ : धर्माच्या नावाने बोकाळणाऱ्या अधर्माशी "जिहाद' करण्याची जिद्द ज्यांच्यात आहे आणि त्यासाठी आवश्यक ती किंमत मोजायलाही तयार असणारे ज्येष्ठ विचारवंत असगर अली इंजिनिअर आणि कृतिशील सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना "प्रतिनोबेल' गणला जाणारा "राईट लाईव्हलिहूड' पुरस्कार जाहीर. असगर अलींनी भारतातील मुस्लिम आणि जातीय हिंसेविषयी अतिशय अभ्यासपूर्ण असे ४७ ग्रंथ लिहिले आहेत. वैदिक धर्माची संकल्पना, कार्ल मार्क्सची मीमांसा आणि गांधीजींची जीवनपद्धती, यांचा सुरेख मेळ घालण्याचा प्रयत्न स्वामी अग्निवेश करीत आहेत.
२०१४ : बंगळूर येथील फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे (एफकेसीसीआय) दिला जाणारा "भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या स्मृती पुरस्कार २०१४' भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना प्रदान.
२०१४ : दक्षिण कोरिया येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला बॅडमिंटनमध्ये १९८६ नंतर प्रथमच कांस्यपदक.