Property Expert  esakal
महाराष्ट्र बातम्या

वडिलोपार्जित प्रॉपर्टीसाठी ‘ती’च्या नशिबी संघर्षच! कायद्याने दिला समान हिस्सा, पण तोही मिळत नाही; विधिज्ञ म्हणतात ‘येथे’ न्याय मिळतोच, वाचा सविस्तर...

तात्या लांडगे

सोलापूर : हिंदू उत्तराधिकार कायद्यात २००५ मध्ये सुधारणा करण्यात आली. पहिल्यांदा वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींनाही हक्क देण्यात आले, पण हा अधिकार केवळ ९ सप्टेंबर २००५ नंतर ज्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांनाच मिळत होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यातील तारीख व वर्षाची अट रद्द केली. त्यामुळे आता वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांना समान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, महिलांना वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा सहसा मिळत नाही, त्यासाठी संघर्षच करावा लागतो. दुसरीकडे काहीजण स्वत:हून घेत नाहीत अशीही वस्तुस्थिती आहे.

हिंदू उत्तराधिकार कायद्यातील दुरुस्ती ९ सप्टेंबर २००५ पासून अमलात आली. या तारखेपूर्वी किंवा नंतर मुलीचा जन्म झाला तरी वडिलांच्या मालमत्तेत तिचा भावाइतकाच वाटा असेल, असे कायद्यात म्हटले आहे. दरम्यान, मुलगी सहसा माहेरील वडिलांच्या मालमत्तेत वाटा मागत नाही. मात्र, ज्या भावांना वडिलांनी प्रॉपर्टी देऊनही ते जन्मदात्यांनाच सांभाळत नाहीत किंवा भाऊ वाट्टेल तसे त्या मालमत्तेची विल्हेवाट लावू लागला, सासरी ‘ती’ला खूप अडचणी आल्यास ती भावाकडे म्हणजेच माहेरी आशा करते. त्यावेळी तिला हिस्सा डावलला जातो. वेळप्रसंगी तिचा माहेरच्यांकडूनच छळ केला जातो. त्यावेळी कायदेशीर हिस्सा डावलणाऱ्या माहेरच्यांविरूद्धच ती न्यायालयात धाव घेते. त्याठिकाणी ‘ती’ला न्याय मिळतोच. पण कायद्याने दिलेला हक्काचा हिस्सा मिळविण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.

वडिलोपार्जित मालमत्ता असल्यास?

हिंदू कायद्यात मालमत्तेची विभागणी वडिलोपार्जित आणि स्व-अर्जित अशा दोन प्रकारात केली जाते. वडिलोपार्जित मालमत्तेत चार पिढ्यांपूर्वीपर्यंतच्या पुरुषांच्या अधिग्रहीत मालमत्तेचा समावेश आहे. अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो, मग तो मुलगा असो वा मुलगी. २००५ पूर्वी अशा मालमत्तेवर केवळ मुलांचाच अधिकार होता, पण दुरुस्तीनंतर अशा मालमत्तांच्या विभागणीत वडील मुलीला वाटा नाकारू शकत नाहीत. कायद्याने मुलीचा जन्म होताच वडिलोपार्जित मालमत्तेवर तिचाही हक्क असतो.

वडिलांची स्वत:ची मालमत्ता

स्व-अर्जित मालमत्तेच्या बाबतीत मुलीची बाजू कमकुवत असते. वडिलांनी स्वत:च्या पैशातून जमीन विकत घेतली असेल, घर बांधले असेल किंवा विकत घेतले असेल तर ही मालमत्ता वडील ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतात. स्वत:ची मालमत्ता स्वत:च्या मर्जीने कोणालाही देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजे वडिलांनी आपल्या मालमत्तेत मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काही करू शकत नाही अशीही वस्तुस्थिती आहे.

इच्छापत्र लिहिण्यापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्यास काय?

इच्छापत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, तरी त्यांच्या मालमत्तेवर सर्व कायदेशीर वारसांचा समान हक्क असेल. हिंदू उत्तराधिकार कायद्यात पुरुष वारसदारांचे चार प्रकारात वर्गीकरण केले असून पहिला हक्क वारसदारांच्या पहिल्या वर्गाचा आहे. त्यात मुलींचाही समावेश असून वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा पूर्ण हक्क आहे.

जेव्हा मुलीचे लग्न होते, त्यावेळी...

२००५ पूर्वी हिंदू उत्तराधिकार कायद्यात मुलींना केवळ हिंदू अविभक्त कुटुंबातील सदस्य मानले जात होते, म्हणजेच समान वारसदार नव्हते. मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला हिंदू अविभक्त कुटुंबाचा भाग मानले जात नव्हते. २००५ च्या दुरुस्तीनंतर मुलीला समान वारसदार मानण्यात आले आहे. आता मुलीच्या लग्नाने वडिलांच्या मालमत्तेवरील त्याचा हक्क बदलत नाही. लग्नानंतरही वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क असतो.

दिवाणी न्यायालयातून मिळेल ‘ती’ला हक्क व अधिकार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलीला मुलांप्रमाणेच वडिलोपार्जित मिळकतीत तथा प्रॉपर्टीत जन्मत: हक्क देण्यात आला आहे. सध्या मुलांना जेवढा, तेवढाच हक्क व अधिकार मुलींनाही आहे. पण, ज्यावेळी त्यांचा हक्क-अधिकार डावलला जातो, तेव्हा मिळकत ज्या ठिकाणी आहे, तेथील दिवाणी न्यायालयात त्यांना थेट हक्क मागता येतो.

- जयदीप माने, विधिज्ञ, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT