Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetti esakal
महाराष्ट्र बातम्या

उसाचा 400 रुपये हप्ता 17 दिवसांत न दिल्यास 2 ऑक्टोबरला प्रत्येक कारखान्यावर ढोल वाजवणार; राजू शेट्टींचा स्पष्ट इशारा

सकाळ डिजिटल टीम

उत्तरदायित्व सभेला वाहतुकीसाठी दोन कोटी आणि मंडपासाठी दोन कोटी कोठून आणले, हे जाहीर करा.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह (Kolhapur, Sangli) सीमाभागातील कारखान्यांनी (Sugar Factories) गेल्या गळीत हंगामातील उसाचा ४०० रुपये हप्ता सतरा दिवसांत न दिल्यास दोन ऑक्टोबरला प्रत्येक कारखान्यावर ढोल वाजवून कारखानदारांना जागे केले जाईल. त्यानंतर कारखान्यातून साखरेचा एक कणही बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मागील हंगामातील उसाला (Sugarcane Season) ४०० रुपये मिळावेत, यासह कारखान्यानी ऑनलाइन वजन काटे बसवावेत, त्याशिवाय अशा कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत, या मागणीसाठी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्याआधी जयसिंगपूर ते कोल्हापूर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शेट्टी यांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. शेट्टी म्हणाले, ‘‘गेल्या हंगामामध्ये गाळप साखरेसह उपपदार्थास चांगले दर मिळत आहेत. यामुळे साखर कारखान्याकडे एफआरपी आणि तोडणी वाहतूक व प्रक्रिया खर्च वजा जाता अजूनही पैसे शिल्लक आहेत. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांनी प्रतिटन ५०० रुपयांचा दुसरा हप्ता दिला आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा पुणे जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा जास्त आहे. साखर व इथेनॉल विक्री करुन कारखाने फायदा मिळवत आहेत. कारखान्यांना प्रतिटन दुसरा हप्ता ४०० रुपये देणे शक्य आहे. तरीही हा हप्ता देण्याची त्यांची मानसिकता नाही, अशा कारखानदारांना आम्ही पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही.’’

प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ‘‘महागाईच्या निर्देशांकानुसार उसाचा दर वाढला पाहिजे. वाढलेली महागाई, गगनाला भिडलेले औषधे, बी बियाणे व खतांचे दर यामुळे उत्पादन खर्चात बेहिशेबी वाढ झाली आहे. ऊस उत्पादनातून एकरी एक लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. तर, एक लाख खर्च येतो. एक एकर शेती असणाऱ्यांपेक्षा सेंट्रिंगच्या कामाला गेलेली पोरं जास्त उत्पन्न मिळवत आहेत.’’

सावकार मादनाईक म्हणाले, ‘‘ऊस दर मिळवल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना वीज पुरवठा करतानाही नियम डावलले जात आहेत. याचाही समाचार घ्यावा लागणार आहे.’’ दरम्यान, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जनता दलाचे शिवाजी परुळेकर, अजित पोवार, राजेंद्र गड्यान्नवार, बाळासाहेब पाटील, गौरव एक्के, राम शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.

त्या कारखान्यांना परवाने नकोत!

देशातील आणि राज्यातील पेट्रोलपंप ऑनलाईन झाले; मग राज्यातील दोनशेहून अधिक असणारे साखर कारखाने ऑनलाईन का होत नाहीत? डिजिटल वजन काटे नाहीत, त्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी नेत्यांनी एकमुखाने केली. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केले जात आहे. चार कारखाने शिल्लक आहेत. हंगाम सुरू होईपर्यंत त्या कारखान्यात डिजिटल वजन काटे सुरू केले जातील, असे प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी सांगितले.

अजित पवार यांनी कुठले प्रश्न सोडविले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न सोडवलेला नाही; मग त्यांनी कोणता पराक्रम केला म्हणून त्यांना कोल्हापुरात दोनशे किलो फुलांचा हार घातला, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजिर खुपसला, त्याप्रमाणे धनंजय मुंडे एक दिवस अजित पवार यांच्या पाठीत खंजिर खुपसतील. महाराष्ट्राच्या सत्तेत खोके बहाद्दर बसवले होते. टग्यांचे सरकार आले आहे.

उत्तरदायित्व सभेला वाहतुकीसाठी दोन कोटी आणि मंडपासाठी दोन कोटी कोठून आणले, हे जाहीर करा. कारखाने चालवणे तोट्याचे आहे, तर मग बडे राजकीय नेतेच का विकत घेतात, असाही सवाल शेट्टी, शिवाजी परुळेकर, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक यांनी केला. महाराणी ताराराणी पुतळा येथील चौकात शेतकऱ्यांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टर झळकावले. हे पोस्टर काढून घेताना पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली.

तोडणीची गडबड नको

यंदा ऊस तोडायला पैसे द्यायचे नाहीत, या बाबतचे ठराव गावांनी करावेत. ऊस तोडायला गडबड करू नका. यंदा तीन महिन्यांत लावण ते निडवा सर्व ऊस जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडणीस गडबड करू नये, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT