Shahu Maharaj, Kolhapur E sakal
मनोरंजन

Rajarshi Shahu Maharaj: परदेशी गाड्यांवर नव्हे तर समाजसुधारणेवर दौलतजादा करणाऱ्या राजांची गोष्ट सांगणारा सिनेमा

स्वाती केतकर-पंडित

कोल्हापूरचे शाहू महाराज खरंतर फक्त कोल्हापूरचे नव्हेत. ते साऱ्या मऱ्हाटी साम्राज्याचे छत्रपती होते. त्यांचं छत्र केवळ राजेशाहीचं नव्हतं तर लोकशाहीचं छत्र त्यांनी समाजावर धरलं. वरुण सुखराज हा तरुण दिग्दर्शक छत्रपती शाहू या ‘राजा माणसा’ची गोष्ट घेऊन येतोय, शाहू छत्रपती या सिनेमातून.

शेतकरी आंदोलनाचा संघर्ष आणि इतर अनेक डॉक्युमेंट्रीजमधून वेगळे विषय मांडणाऱ्या वरुण सुखराज या तरुण दिग्दर्शकाला छत्रपती शाहूंवर सिनेमा का करावासा वाटला, हे विचारल्यावर वरुण म्हणाला, छत्रपती असलेले शाहू आपल्या जीवनशैलीचा, ऐषोरामाचा विचार करण्याऐवजी, रयतेच्या जीवनशैलीचा विचार करत होते.

शाहूंनी सामाजिक सुधारणा करण्यावर भर दिला.

आपल्या ताफ्यात अधिक परदेशी गाड्या जमवण्याऐवजी शाहू आपल्या रयतेतल्या फासेपारध्यांना ट्रेनमधून फिरवून आणत होते.

ही केवढी विलक्षण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यावर सिनेमा करायला मिळणं हे माझं भाग्यच वाटतं मला!

आमचा हा सिनेमा आता लिहून तयार आहे. इतिहासकार जयसिंगराव पवार आणि कोल्हापूरच्या गादीचे वंशज शाहू महाराज यांच्याकडून मान्यता आणि मार्गदर्शन दोन्ही मिळाल्यानंतर आता आम्ही ऑन फ्लोअर जात आहोत.

विद्यमान छत्रपती शाहू महाराजांशी सिनेमाविषयक चर्चा करताना दिग्दर्शक वरुण सुखराज

हल्लीचे सगळे चरित्रपट ग्रँडच असतात. तत्कालीन सेट्स, गाड्या, वास्तू या सगळ्यातली भव्यदिव्यता हेच चरित्रपटाचं महत्वाचं अंग मानलं जातं.

शाहूंवरचा हा सिनेमापण असाच भव्यदिव्य असणार का? या प्रश्नावर वरुण म्हणाला, नक्कीच भव्य असणार आहे, कारण छत्रपतींवरचा सिनेमा आहे, पण दिसण्यातल्या भव्यदिव्यतेबरोबरच शाहूंच्या विचारांची भव्यताही मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.

खरोखरच शाहू महाराजांची सगळी विचारप्रक्रियाच भव्य होती. खरोखरच काळाच्या पुढची होती.

ज्या काळात नवऱ्याने बायकोला मारणं हे पाऊस पडण्याइतपत नॉर्मल मानलं जात असे त्या काळात शाहूंनी घरगुती हिंसाचारासंबंधी कायदा आणला.

जेव्हा तथाकथित उच्चवर्णीयांच्या घरात अस्पृश्यांना प्रवेश नसणं, यात कुणालाच काही खटकत नव्हतं, तेव्हा शाहूंनी वर्णभेद, वंशभेदाविरुद्ध आवाज उठवला.

समाजसुधारणांच्या बाबतीत शाहूंनी केवळ निर्णय घेतले नाही तर आधी ते स्वत:मध्ये बाणवून दाखवलं.

राजा म्हणून जनतेपुढे हा आदर्श ठेवला. त्यांना सामाजिक सुधारणांची गरज जाणवत होती. या सुधारणा करण्यासाठी आवश्यक पाठबळ आपण देऊ शकतो, याचं भान होतं त्यामुळे त्यांनी ते करून दाखवलं. हे सगळं अफाट वाटतं.

राजेशाहीतून लोकशाहीची मूल्य रुजवणारे शाहू

आपल्याकडे लोकशाही आहे. तिची मूळं आपण संविधानात शोधतो. तिथे आपल्याला हा सर्वांनी वेगळं असण्यातही समान असण्याचा विचार दिलेला आहे. पण हे संविधान लिहीणाऱ्या डॉ. आंबेडकरांना त्यांच्या प्रवासात एक मोठं बळ शाहूंनी दिलं होतं.

शाहूंच्या वागण्या-बोलण्या-चालण्यातून लोकशाहीची बीजं पेरली गेलीच पण त्यांच्या निर्णयप्रक्रियेतूनसुद्धा ते दिसत होतं.

लोकशाहीला बळ देतील असे निर्णय राजेशाहीतून घेण्याचं धाडस शाहूंनी दाखवलं.

आज आपण लोकशाहीची जी फळं चाखतो, त्याचं एक कारण छत्रपती शाहू महाराज आहेत.

आजच्या तरुणाला, आजच्या जनतेला शाहू महाराज रिलेट होतील का, हा प्रश्न विचारल्यावर वरुण म्हणाला, नक्कीच होतील, कारण ते आजचेच आहेत.

आजची तरुणाई नो नॉनसेन्स आहे. शाहूंचंसुद्धा असंच होतं. त्यांनी दिलेला विचार आजच्या काळाशी समरुप आहे.

आज स्वातंत्र्य, सामाजिक समता, उच्चशिक्षण अशा ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळाल्यात त्यांची पायाभरणी शाहूंनीच केली आहे.

त्यामुळे जोपर्यंत लोकशाही आहे, त्यावर विश्वास ठेवणारी, त्यानुरुप चालणारी लोकं आहेत तोवर शाहू रिलेट होतच राहतील.

आदिपुरुषसारख्या चित्रपटातून तरुणाईची भाषा म्हणून लेखकांनी ज्याचं स्पष्टीकरण दिलं, तशा 'सो कॉल्ड' तरुणाईच्या भाषेबद्दल वरुणचं मत लक्षात घ्यावं असं आहे.

तो म्हणतो. तरुण जगभरातला उत्तम, सकस कंटेंट पाहतात, ऐकतात, वाचतात. त्यामुळे उगाच तरुणांच्या भाषेत लिहीलं म्हणत, भाषेशी छेडछाड करण्याला माझा विरोधच आहे. मुळात कंटेंट उत्तम असेल तर भाषेची अशी मोडतोड करण्याची आवश्यकताच नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT