छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठा आरक्षणासह विविध नऊ मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या २० जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी राज्यातील २८८ मतदारसंघांत उमेदवार उभे करायचे की पाडायचे, याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी बैठकीची तारीख ठरविली जाईल,’’ असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मराठा महासंवाद शांतता रॅलीच्या समारोपादरम्यान छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शनिवारी ते बोलत होते. जरांगे यांचे सायंकाळी पाच वाजता सिडको चौकात आगमन झाले होते, त्यानंतर ते रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी क्रांती चौकात पोचले.
भाषणादरम्यान, ‘विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या ओबीसी नेत्यांनीच जातीयवाद केला. ज्या मराठा आमदारांनी ओबीसी नेते निवडून देण्यासाठी मतदान केले आहे, त्यांना पाडू,’ असा इशाराही त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर यापूर्वी मागणी केलेल्या ‘सगेसोयऱ्यां’च्या आमच्या व्याख्येनुसार आरक्षण द्यावे, यासह उर्वरित आठ मागण्या मान्य केल्या नाही तर मराठवाड्यातील मराठा समाजबांधव मुंबईत धडकतील, असेही जरांगे यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
येत्या २० जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार असून त्या दिवशी उमेदवार उभे करायचे की पाडायचे यावर निर्णय होणार नाही. परंतु, या विषयावर बैठक कधी घ्यायची? हे ठरविले जाईल. विशेष म्हणजे कोटींच्या संख्येत मराठे माझ्यासोबत आहेत त्यामुळे जे काही करेल ते सर्व मराठ्यांना विश्वासात घेऊन करणार असेही जरांगे म्हणाले.
‘‘ मराठा समाजासाठी राज्य शासनाकडून काढण्यात येणारा ‘सगेसोयरे’ अध्यादेश बेकायदा व घटनाबाह्य असेल. मुळात आपण एकत्र आलो तर आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर देऊ,’’ असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज येथे दिला.
ओबीसी जनमोर्चातर्फे येथील अक्कमहादेवी मंटपामध्ये आयोजित ‘संविधानिक न्याय हक्क’ सभेत ते बोलत होते. ओबीसी नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे अध्यक्षस्थानी होते. प्रा. हाके म्हणाले, ‘‘मनोज जरांगे यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार व प्रशासन अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.
सगेसोयरे यांचा आरक्षणात समावेश केला, तर आमच्या आरक्षणावर घाला येईल. आम्ही मोठा भाऊ म्हणून मराठा आरक्षण मोर्चात पडेल ते काम करीत साथ दिली. सुरुवातीला केवळ शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागणारे आता ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करीत आहेत.
त्याला सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. ओबीसींनी ७० वर्षे आरक्षणाचा लाभ घेतला म्हणतात; परंतु आरक्षणाचा लाभ तीस वर्षांपासून होत आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लागला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.’’
‘‘आजवर या ना त्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील इतर नेत्यांनी आरक्षण संपविण्यासाठी डाव टाकले आहेत. आताही पुन्हा नव्याने ते डाव टाकत आहेत. परंतु, अख्खा मराठा समाज त्यांचा डाव समजतो. त्यामुळे आज (१३ जुलै) अंतिम निर्णय घेण्याऐवजी तो समाजहितासाठी चार-पाच दिवस पुढे ढकलतो आहे,’’ असे जरांगे म्हणाले. त्यांनी मंत्री भुजबळांवरही कडवट शब्दांत टीका केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.