पैठण : पैठण येथील जायकवाडी धरणातून जाणाऱ्या डाव्या कालव्यावरील मोठी बाजारपेठ असलेल्या विहामांडवा ते टाकळी अंबड आणि पाच ते सहा खेड्यांना जोडणाऱ्या पुलाला गेल्या दहा ते बारा वर्षापासून भेगा, मधोमध छिद्र पडले असून यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर पुलाच्या खड्ड्यात पडल्याने आत्तापर्यंत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेकजणांचा जीव थोडक्यात वाचला आहे.
स्थानिकांनी आणि शेतकऱ्यांनी सात ते आठ वर्षापासून अनेकदा पाठपुरावे करूनही या पुलाच्या दुरूस्तीच्या कामाकडे पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. राजकीय नेत्यांनी आश्वासने देऊनही पुलाचे काम होत नाही. पाच वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री असलेल्या रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील जनतेची ही अवस्था आहे.
हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
दरम्यान, विहामांडवा हे पैठण तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. तर टाकळी अंबड, विठ्ठलनगर, शिवाजीनगर, हनुमाननगर, रामनगर, उंचेगाव अशा अनेक खेडेगावांना विहामांडवा येथे जाण्यासाठी डाव्या कालव्यावरून जाणाऱ्या पुलाचा वापर करावा लागतो. पण मागच्या दहा ते बारा वर्षापासून या पुलाच्या मध्यभागी दोन फूट रूंदीचे छिद्र पडले असून या पूलाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पाटबंधारे विभागाकडून या पूलाच्या दोन्ही बाजूने चार ते पाच फूट खोलीचे खड्डे खणत या पूलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तरीही काहीजण या पुलावरून प्रवास करत असून असून नागरिकांना सात ते आठ किलोमीटरचा जास्तीचा प्रवास करावा लागतो.
या पुलाच्या दोन्ही बाजूला खणलेल्या खड्ड्यामध्ये अनेक मोटारसायकल पलटी झाल्या असून नागरिक जखमी झाले आहेत. तर उसाचे वाढे घेऊन जाणारी बैलगाडी यामध्ये पलटी झाल्याने दोन नागरिक जखमी झाले आहेत. तर पुलाला आरपार पडलेल्या खड्ड्यामुळे अनेकांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शाळेतील विद्यार्थ्यांनाही याच मार्गाचा वापर करावा लागत असल्यामुळे पालकांनाही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची भिती वाटते.
पुलाच्या दुरावस्थेमुळे अनेकांचे गेले जीव तर अनेक जखमी
रात्री उशीरा या पुलावरून आपल्या आजारी पत्नीला घेऊन जात असताना पुलावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने कॅनॉलमध्ये दुचाकी पलटी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती राजेंद्र पन्हाळकर यांनी दिली. तर खड्ड्यात गाडी गेल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. उस घेऊन जाणाऱ्या बैलगाड्यालाही सात ते आठ किलोमीटर अंतर जास्त प्रवास करावा लागतो.
पाटबंधारे विभागाकडून दिरंगाई
सदर पूल हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत केलेल्या रस्त्यावर असल्यामुळे या कामासाठी सार्वजनिक विभागाने परवानगी द्यावी लागते पण अजून या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली नाही असं पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे अनेक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
जवळपास १० ते १२ वर्षापासून या पुलालाच्या मध्ये आरपार खड्डा पडला आहे. तर भिंतीलाही भेगा पडल्या आहेत. खालूनही पूलाला भेगा पडल्यामुळे आमच्या मुलांना शाळेत पाठवायलाही आम्हाला भिती वाटते. उसाच्या बैलगाड्या किंवा चारचाकी गाड्यांना यामुळे जवळपास सात ते आठ किलोमीटरचा जास्त प्रवास करावा लागत आहे. आमदार भुमरे हे प्रत्येक वेळी हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देतात पण हे काम १२ वर्षापासून रखडलेलेच आहे.
- दिलीप भोसले, स्थानिक शेतकरी
आम्ही अनेक निवदने पाटबंधारे विभागाकडे दिले आहेत. या पुलाच्या दुरूस्तीच्या कामासंदर्भात औरंगाबाद येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता. तर एकदा बेमुदत उपोषणही केले होते. त्यावेळी या पुलाच्या दुरूस्तीचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. पण गेल्या बारा वर्षापासून या पुलाची अवस्था अशीच असून पाटबंधारे विभागाकडे शिफारस करूनही या कामाला विलंब होत आहे.
- राजेंद्र पन्हाळकर, शेतकरी तथा अध्यक्ष व्यापारी महासंघ, विहामांडवा
या पुलाच्या दुरूस्तीचे प्रस्ताव आम्ही तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) पाठवले आहेत पण या कामाला अजून मान्यता मिळाली नाही. तांत्रिक मान्यता मिळाल्यावर प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवावा लागतो पण तांत्रिक मान्यता लवकर मिळत नसल्यामुळे आम्ही थेट प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.
- प्रशांत जाधव, मुख्य कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठण
या पुलाच्या दुरूस्तीच्या कामाचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. तो लवकरात लवकर मंजूर करून आम्ही महामंडळाकडे पाठवू. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर पुलाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात होईल.
- जयंत गवळी, मुख्य अधीक्षक अभियंता आणि मुख्य प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (जलसिंचन विभाग) औरंगाबाद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.