पाचोडः अध्यात्मिकतेची आवड निर्माण झाल्याने कुणाला काहीएक न सांगता वयाच्या चौदाव्या वर्षी अचानक कुटूंबियांना सोडून घरातून निघून गेलेला बालक ऐन वयाच्या साठ वर्षानंतर वृद्धापकाळात आपल्या पाचोड (ता.पैठण) गावांत अवतरल्याने सर्वत्र कुतुहल निर्माण होऊन त्याचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. एवढेच नव्हे तर ज्या दिवशी त्याचे गावांत आगमन झाले त्याच दिवशी त्याच्या थोरल्या बहिणीचे निधन होऊन याची अंत्यविधीस हजेरी लागली हे विशेष.
पाचोड (ता.पैठण) येथील माणिकराव भुमरे यांना गयाबाई, अंसाबाई, चंद्रकलाबाई या तीन मुली तर लक्ष्मण, साहेबराव व सुरेश हे तीन मुले अशी एकूण सहा अपत्ये. सुरेश भुमरे हा सर्वात धाकटा मुलगा. बालपणापासुनच सुरेश हा आध्यात्मिक प्रवृत्तीचा असल्याने तो भजन किर्तनासाठी गाव व परिसरात जात असे. तेव्हा त्यांचे गावांतील अध्यात्मिक जेष्ठ नागरिक बाबुराव भुमरे यांचेशी घनिष्ट संबध आला. त्यातच बाबुराव यांनी सुरेश यांस पखवाज व अन्य साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानंतर तो अध्यात्मिकतेचे शिक्षण घेण्यासाठी एक वर्षाकरीता वेरूळ येथील जनार्दन स्वामी आश्रमामध्ये गेला.
वर्षभर आध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर तो पाचोड येथे आला व आपल्या दैनंदिन जिवन व कामकाजात रमला.परंतु त्याचे मन लागत नसल्याने त्याने पुन्हा अध्यात्मिक शिक्षण आत्मसात करण्यासाठी आळंदी गाठले व तीन वर्षे अध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर तो गावी परतला. मात्र आध्यत्मिक ओढ त्यांस स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या चौदाव्या वर्षी एक दिवस त्यांनी मनाचा निश्चय करून कुटुंबिय, मित्र, सवंगडी यांस काहीएक न सांगता अचानक घर सोडले ते कायमचेच. घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी आपले नाव सुरेश माणिकराव भुमरे ऐवजी रमेशभाई हरिश्चंद्र अवधूत हे नाव परिधान केले व त्याने बद्रीनाथ, केदारनाथ,अयोध्या, काशी, मथुरा आदी सर्व तिर्थक्षेत्रांना भेटी देऊन दर कोस दर मुक्काम करत पाच वर्षे काढली.
पाच वर्षे सर्व तिर्थक्षेत्राचे दर्शन व भेटी केल्यानंतर शेवटी ते द्वारकेत स्थायिक झाले. सुरवातीला आपल्या कुटुंबियांची आठवण येत असल्याने काही वर्ष त्यांनी निनावी आपल्या खुशालीचे पत्र पाठविले व काही वर्षानंतर येणारे त्याचे खुशहालीचे पत्रही बंद झाले. घर सोडून निघून गेल्यानंतर कुटुंबियांनी काही वर्षे सर्वत्र 'सुरेश'चा शोध घेतला. मात्र आता कुटुंबिय व नातेवाईकांनी त्याचा शोध घेणे बंद करून ते आपापल्या संसारात रममाण झाले, सर्व भाऊ, बहिणीचे विवाह होऊन ते मुलाबाळांचे आजी - आजोबा बनले. वृद्धापकाळामुळे हाती काठ्या आल्या वर्षामागून वर्षे उलटली, दरम्यान वडील माणिकराव, भाऊ लक्ष्मणराचे निधन झाले.
वयाची 'साठी' पार केलेल्या सुरेशभाऊंना उत्तरार्धात आता घराचे वेध लागले होते.त्यांत आपल्या जन्मभूमीची आठवण स्वस्थ बसू देईना. बुधवारी (ता.२९) सुरेशभाऊ आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या ओढीने पाचोडला आले. जेव्हा गाव गाठले तेव्हा बालपणाचे गाव पूर्णतः बदलले होते. गावांतील सिमेंट काँक्रीटची घरे, डांबरी रस्ते आदी पाहून ते भारावले. त्यांनी भावांचा पत्ता काढत घर गाठले, भाऊ, भावजया, पुतणे, सुना यांना आपला परिचय करून दिला.
तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर या कुटुंबियाची भेट झाली. सर्वजण सुरेशभाऊच्या अचानक आगमनाने आश्चर्यचकीत झाले. सर्वांनी मोठ्या आदराने त्यांचे दर्शन घेत त्यांचेवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. अन् काही वेळाने त्यांची मोठी बहीण गयाबाई मार्कंडे ,रा.बोधेगाव शेकटा (ता.शेवगाव) यांचे निधन झाल्याची बातमी आली. पंचेचाळीस वर्षानंतर सुरेश भुमरेचे गावात येणे व बहीणीच्या निधनाचे वृत्त समजणे हा सर्व योगायोगच. वडील व भावाच्या अंत्यविधीला हजेरी लागली नसली तरी बहीणीच्या अंत्यविधीस त्यांची हजेरी लागल्याचे पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बहिणीच्या अंत्यविधी उरकून ते तूर्तास आपल्या अन्य दोघी बहिणीला भेटण्यासाठी त्यांच्याकडे गेले असून सर्व ग्रामस्थ 'सुरेशभाऊ'चे पंचेचाळीस वर्षाचे अनुभव ऐकण्यासाठी सभोवताली गराडा करताना दिसतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.