Manchar News: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर- शेवाळवाडी ग्रामपंचायत (ता.आंबेगाव) बाह्यवळण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे आठ दिवसात दोन मोटरसायकलस्वार जमिनीवर पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे.
सुदैवाने मागच्या बाजूने वाहन नसल्याने मोठा अपघात टळला आहे. एका वर्षातच रस्त्याचे झालेले निकृष्ट काम ऐरणीवर आले आहे. खेड घाट ते कळंब (ता.आंबेगाव)या मार्गावरील निम्म्यापेक्षा अधिक दिवे बंद आहेत.
संबंधित अधिकारी व ठेकेदाराने त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. विजेचे दिवे सुरु करावेत. अन्यथा गावकर्यांना आंदोलन करावे लागेल.” असा इशारा शेवाळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक थोरात व निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट यांनी दिला आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग मंचरच्या बाहेरून तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी व मंचर शहराच्या बाहेरून एकूण पाच ते सहा किलोमीटर अंतरातून महामार्ग जात आहे. सदर रस्त्याचे काम सुरू असतानाच काम निकृष्ट होत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली होती.
पण राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या पहिल्याच पावसात रस्त्याला भेगा पडल्या असून डांबर निखळून पडले आहे.
पुण्याहून नाशिकला येताना ताशी ७० ते ८० वेगमर्यादेने वाहने धावतात. रस्त्याची दुरावस्था लक्षात येत नाही, त्यामुळे विशेषतः दुचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. दोन महिन्यापूर्वी असेच अपघात वाढले होते. त्यावेळी डागडूजी केली.
पण पुन्हा रस्त्याची जैसे थे अवस्था झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. अशी मागणी गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे यांच्याकडे केली आहे.
रस्त्याची व बंद पडलेल्या वीज दिव्यांची पाहणी करून मेदगे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले “गोरक्षनाथ मंदिर भोरवाडी ते तांबडेमळा या रस्त्याच्या मध्यभागी विजेचे दिवे बसवण्याबाबत महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनाही भेटून या भागातील गावकऱ्यांचे गाऱ्हाणे सांगणार आहे.
“पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावारून दररोज दहा हजाराहून अधिक वाहने ये-जा करतात. तसेच निघोटवाडी येथून खाली उतरून सेवा रस्त्याने श्री क्षेत्र भीमाशंकर कडे जावे लागते. निघोटवाडी चौकात सेवा रस्त्याला व्यवस्थित गतीरोधक केले नाहीत.
तसेच वीज व्यवस्था नाही. त्यामुळे विशेषतः रात्रीच्यावेळी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने दर्जेदार व योग्य उंचीचे गतीरोधक तयार करावे. तसेच वीज पुरवठा करावा.”
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.