Mumbai News: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले असून या नामांतरणामुळे तथा शहरे आणि महसूल विभागाची नावे बदलल्यामुळे लोकांना काही त्रास होईल असे आम्हाला वाटत नाही.
इतकेच नव्हे तर राज्य सरकारने केलेले नामांतर वैधच असल्याचे स्पष्ट करत नामांतरणाला विरोध करणाऱ्या विविध याचिका मुख्य न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने आज फेटाळून लावल्या.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जून २०२२ मध्ये औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र महाविकास आघाडी सरकारने राजकीय स्वार्थासाठी नामांतरण केले असून कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा दावा करत शेख इस्माईल, मोहम्मद अहमद, अलीमुद्दीन शेख व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली त्या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
न्यायालयाने याबाबत राखून ठेवलेला निकाल आज (ता.८) जाहीर केला. ७६ पाणी निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता राज्य सरकारला कोणतेही महसूल क्षेत्र रद्द करण्याची आणि त्या क्षेत्राचे नाव बदलण्याची परवानगी देते त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर नाही. सरकारने दोन जिल्हे आणि शहरांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी वैधानिक तरतुदींचे पालन केले असा निष्कर्ष काढण्यास आम्हाला कोणताही संकोच वाटत नाही. महसूल क्षेत्र किंवा अगदी शहराच्या नावात बदल करण्याचा मुद्दा न्याय्य नाही कारण न्यायालयांकडे अशा प्रकरणाचा निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते साधन नाही.
जोपर्यंत एखादे प्रस्तावित नाव अत्याचारी आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा ठिकाणाला कोणत्या नावाने ओळखले जावे, याचे न्यायालयीन पुनरावलोकन केले जाऊ शकत नाही असे खंडपीठाने आदेशात नमूद करत नामांतरणाला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या.
उच्च न्यायालयाने ७६ पानी निकालात विल्यम शेक्सपिअरच्या रोमिओ आणि ज्युलियेट या नाटकाचे उदाहरण दिले आहे. नावात काय आहे? ज्याला आपण गुलाब म्हणतो त्याचा सुवास तितकाच गोड असतो.
शेक्सपियरने नावांच्या स्वरूपावर सखोल निरीक्षण केले आहे नावाने काहीही बदलत नाही. त्या गुलाबाला काहीतरी वेगळे म्हटले तरी त्याचा सुगंध देण्याचा गुणधर्म तसाच राहतो. फुलाचे सार काही बदलत नाही असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.