कोल्हापूर: भारतीय लोकशाहीचा संविधान (राज्यघटना) हा आत्मा आहे. हे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा भाग आहे. भारतीय संविधान व त्यातील मूल्ये लोकांना समजावून सांगत, ती मूल्ये त्यांच्या जीवनपद्धतीचा भाग बनावीत, हे ध्येय कोल्हापूर जिल्ह्यातील युवा अभियंत्याने समोर ठेवले आहे. राजवैभव शोभा रामचंद्र (वय २६) असे त्याचे नाव असून, चार वर्षांपासून त्याची अविरत धडपड सुरू आहे. त्याने आतापर्यंत संविधान जागृतीचे साडेपाचशेहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक गावांत केले आहेत.
संविधान व त्यातील मूल्य जागृतीचे कामास सुरूवात
राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली हे राजवैभवचे गाव. वडील मुद्रांक विक्रेते. इलेक्ट्रिकल डिप्लोमानंतर राजवैभवने पदवी घेतली. वडील सामाजिक चळवळीत असल्याने राजवैभवने पदवीचे शिक्षण घेत असतानाच सामाजिक कार्यात स्वतःला गुंतविले. त्यातूनच भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाचे असल्याने संविधानाला अभिप्रेत असलेला नागरिक बनविण्याचा संकल्प त्याने सोडला. संविधान व त्यातील मूल्य जागृतीचे काम सुरू केले. ‘अंनिस’सह संविधान मूल्ये मानणाऱ्या सामाजिक संघटनांच्या मदतीने संविधान जागृतीचे कार्यक्रम करीत राजवैभव महाराष्ट्रभर फिरतो आहे.
साडेपाचशेहून अधिक कार्यक्रम
महिला, युवक, विद्यार्थी, कामगार, आदिवासी, शेतकरी, शिक्षक अशा वेगवेगळ्या समूहांसोबत त्यांच्याच भाषेत संविधान समजावून सांगतो आहे. विविध शाळा, महाविद्यालये यांसह विविध सामाजिक कार्यक्रमांत व्याख्यान, संवादशाळा, कार्यशाळा तो घेतो. चार वर्षांत आत्तापर्यंत त्याचे साडेपाचशेहून अधिक कार्यक्रम झाले आहेत.संविधानाधारित कविता, गाणी, भारूड, पोवाडा, ओव्या तयार केल्या आहेत. शाळकरी मुलांसाठी विविध खेळ तयार केले असून, त्या माध्यमातून संविधानात्मक मूल्ये बिंबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रोजच्या जगण्यात संविधानातील मूल्ये
राजवैभवने संविधानावर स्वत: भारूड लिहिले असूत, ते तो लोकांसमोर सादर करतो. २०१६ मध्ये मुंबई ते महू (मध्य प्रदेश) संविधान जागर यात्रा तसेच २०१७ मध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ या राज्यांत संविधान सन्मान यात्रेत त्याने व्याख्याने दिली आहेत. संविधानातील मूल्ये लोकांनी रोजच्या जगण्यात उतरविल्यास त्यांचे जगणे कसे सुसह्य होईल हे तो उदाहरणांसह समजावून सांगतो. या कार्यासाठी त्याने नोकरी सोडली आहे. उदरनिर्वाहासाठी तो पुस्तके लिहितो, पुस्तकांचे प्रकाशन करतो. गेल्या दोन महिन्यांत त्याचे ७० कार्यक्रम झाले आहेत.
संकल्प : ७५ संविधान संवादक पाच वर्षांत....
जास्तीत जास्त लोकांमध्ये संविधानात्मक मूल्ये रुजवून त्यांचे जगणे संविधानात्मक बनविण्याचा माझ्या प्रयत्न आहे. त्यासाठी माझ्यासह संविधानावर अभ्यास असलेल्या संविधान संवादकांची आवश्यकता आहे. येत्या मी ७५ संविधान संवादक तयार करणार आहे.
- राजवैभव शोभा रामचंद्र, युवा संविधान अभ्यासक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.