कोल्हापूर : गेल्या आठवड्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने काल रात्रीपासून दिलासादायक सुरुवात केली आहे. पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा सायंकाळी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
धोकादायक वाहतूक बंद करण्यासाठी पोलिसांनी या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ४ बंधारे पाण्याखाली असून पंचगंगा नदीची पाणीपातळी १६ फूट ९ इंचापर्यंत वाढली आहे.
मॉन्सूनला सुरुवात झाल्यापासून काही दिवसच दमदार पाऊस पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र ऊन-पावसाचा पाठशिवणीचाच खेळ सुरू राहिला. काल रात्रीपासून मोठ्या पावसाने दिलासा देण्याचे काम केले आहे.
जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. आज दिवसभरही अधून-मधून का असेना पण जोराचा पाऊस होत राहिल्याने शेतात पाणी-पाणी झाले आहे. या पावसाने जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार आहे. रात्री झालेल्या पावसामुळे आज सकाळपासून पेरण्यांची धांदल उडाली आहे.
जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. आज त्याचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी तरी अंदाज बरोबर आला आहे. पुढील दिवसातही पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.
धरण -एकूण क्षमता -आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
राधानगरी -८.३६- ४.४१
तुळशी- ३.४७ - १.०३
वारणा - ३४.३९ -१५.०७
दूधगंगा - २५.३९ - ५.५९
कासारी - २.७७- १.२७
कडवी -२.५१ - १.१८
कुंभी -२.७१ - १.४९
पाटगाव - ३.७१ - १.५२
एनडीआरएफचे पथक दाखल
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. तरीही, महापुरात कोल्हापूरला दिलासा देणारे एनडीआरएफचे २१ जणांचे पथक आज येथे दाखल झाले आहे. याचे स्वागत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले. त्यानंतर या पथकाने जिल्ह्यातील पावसाची आणि पूरस्थितीची माहिती घेतली.
भविष्यात कोल्हापुरात पावसाचे प्रमाण वाढेल किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती घेतली.
एनडीआरएफ जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीसह निरीक्षक जालिंदर फुंदे आणि पुरुषोत्तम सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत हे पथक जिल्ह्यात थांबणार आहे. एका पथकाकडे तीन बोटी, तसेच लाइफ जॅकेट आणि लाईफ रिंग अशी साधन सामग्री उपलब्ध असणार आहे.
एनडीआरएफचे पथक कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर निरीक्षक जालिंदर फुंदे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेतली. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने चर्चा केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.