Kolhapur Crime esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : दोन दुर्घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू; करेकुंडीत निवृत्त जवानाचा दोन मुलींसह अंत

सकाळ डिजिटल टीम

अरुण यांचा मुलगा जयप्रकाश महागावातील शाळेत आठवीत शिकत होता. एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चंदगड/ गडहिंग्लज : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एकूण सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटना गजरगाव (ता. गडहिंग्लज) आणि करेकुंडी (ता. चंदगड) येथे गेल्या ४८ तासांत घडल्या. गजरगावच्या दुर्घटनेत दोघा सख्ख्या भावांसह एकाच्या मुलाचा मृत्यू झाला. एका मुलाला वाचविण्यात यश आले. करेकुंडीत निवृत्त जवानासह त्यांच्या जवळच्या नात्यातील दोन शाळकरी मुलींचा (School children) मृत्यू झाला.

करेकुंडी (ता. चंदगड) येथील पाझर तलावात पुतणी व मेहुणीच्या मुलीसह पोहण्यासाठी गेलेले निवृत्त जवान (Indian Soldier) विजय विठोबा शेनोळकर (वय ४८) यांचा बुडून मृत्यू झाला. पुतणी समृद्धी अजय शेनोळकर (१२, दोघेही रा. करेकुंडी) व मेहुणीची मुलगी चैतन्या नागोजी गावडे (१२, रा. आसगाव, ता. चंदगड) यांचा त्यात समावेश आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एकाचवेळी तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.

मृत चैतन्या उन्हाळी सुटीसाठी मावशीकडे करेकुंडी येथे आली होती. काल सायंकाळी विजय शेनोळकर तिला व पुतणी समृद्धीला घेऊन पाझर तलावाकडे पोहण्यासाठी गेले. याच वर्षी ग्रामस्थांनी तलावातील गाळ काढून खोलीकरण केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या वळीव पावसाने तलावात एके ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच ते पोहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने समृद्धी व चैतन्या बुडू लागल्या. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विजय सुद्धा चिखलात रुतले. त्यातून बाहेर पडणे शक्य न झाल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

या वेळी शेजारीच काही लहान मुले खेळत होती. ही घटना पाहून घाबरून ती गावाकडे पळत आली. त्यांनी घटना सांगितल्यानंतर ग्रामस्थ तलावाकडे धावले; मात्र तोपर्यंत बराच कालावधी उलटला होता. येथील ग्रामीण रुग्णालयात तिघांचीही उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आज सकाळी अकराच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

गजरगावात सख्ख्या भावांसह मुलाचा समावेश; पुतण्याला वाचविण्यात यश

महागाव : गजरगाव (ता. आजरा) येथील हिरण्यकेशी बंधाऱ्यावर सुळे येथील एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. एकाला वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये अरुण बचाराम कटाळे (वय ५२), मुलगा जयप्रकाश (१३) व त्यांचा सख्खा भाऊ उदय (४९) यांचा समावेश आहे. ही दुर्घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. आजरा पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुळे (ता. आजरा) येथील अरुण आणि उदय त्यांच्या पत्नी व दोन मुलांसह धुणे धुण्यासाठी गजरगाव येथील बंधाऱ्यावर आले होते. सकाळी दहा वाजता कटाळे बंधू व त्यांच्या पत्नी कपडे वाळत घालत होत्‍या. यावेळी त्यांच्यासोबत आलेले जयप्रकाश अरुण कटाळे व ॠग्वेद उदय कटाळे बंधाऱ्यात पोहत होते. पोहत पोहत नदी पलीकडे जात असताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामध्ये जयप्रकाश व ॠग्वेद बुडू लागले. हे काठावर असलेल्या अरुण व उदय यांच्या लक्षात आले. त्यानंतर दोघेही मुलांना वाचवण्यासाठी बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये गेले.

यामध्ये ॠग्वेदला वाचवण्यासाठी अरुण पकडत असताना ॠग्वेदनी अरुणला मिठी मारली व जयप्रकाशने उदयला मिठी मारली. यामध्ये चौघेही बुडाले. दरम्यान, हारुर येथील अंकुश चव्हाण या युवकाने जीवाची बाजी लावत ॠग्वेदला वाचविले. या घटनेमध्ये कटाळे कुटुंबातील अरुण, उदय, अरुण यांचा मुलगा जयप्रकाश (१३) यांचा बुडून मृत्यू झाला. यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले; पण जयप्रकाश याचा मृतदेह शोधण्यासाठी गडहिंग्लज अग्निशमन दलाचे पथक बोलावण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

उदय मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होते. ते यात्रेसाठी मूळ गावी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह आले होते. अरुण गावीच शेतीसह बदली चालक म्हणून काम करीत होते. अरुण यांचा मुलगा जयप्रकाश महागावातील शाळेत आठवीत शिकत होता. एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सुळे, हारूर, गजरगाव, महागावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घाटावर गर्दी केली होती. गावकामगार तलाठी संजय माळी, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, आनंदा नाईक, पोलिसपाटील सूर्यकांत केसरकर, अनिल देसाई यांनी भेट दिली. आजरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.

युवकाने धाडसाने वाचविले ॠग्वेदला

चौघेजण बंधाऱ्यात बुडत असलेले हारूर येथील युवक अंकुश चव्हाण याने पाहिले. प्रसंग बाका होता. क्षणाचाही विलंब न लावता त्याक्षणी तो सुमारे अर्धा किलोमीटर धावत येत नदीत झेपावला. त्याने पोहत येत ॠग्वेद उदय कटाळे (९) याचे प्राण वाचविले आहेत. चौघांपैकी एकट्याला वाचविण्यात यश आले आहे. कठीण प्रसंगी दाखविलेल्या धाडसामुळे अंकुश याचे परिसरात कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT