बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाच टीएमसी पाणी सोडण्याची विनंती आज (ता. ३१) पत्राद्वारे केली आहे. जलाशयातील पाणी पातळी घटल्यानंतर कर्नाटक दरवर्षी महाराष्ट्राकडून पाणी घेते. त्याचप्रमाणे यंदाही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवत पाच टीएमसी पाणी पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे.
या पत्रामध्ये म्हटले आहे की, ‘‘बेळगाव व गुलबर्गासह उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती आहे. तसेच जनावरांना पाण्याची टंचाई भासत आहे. त्यासाठी कृष्णा आणि भीमा नदी पात्रात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे’’ महाराष्ट्र शासनाकडे भीमा आणि कृष्णा नदीला यापूर्वी तीन टीएमसी पाणी सोडण्याबाबत विनंती करण्यात आली होती.
त्याची दखल घेऊन महाराष्ट्राने मे महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये एक टीएमसी पाणी सोडले आहे. त्याबद्दल सिद्धरामय्या यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण, यंदा उन्हाळा अधिक तीव्र झाला असून, जलाशयांची पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे पाणी टंचाई तीव्र झाली असल्याने पाच टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.
बेळगावसह उत्तर कर्नाटकाला पिण्यासाठी दोन टीएमसी पाणी वारणा व कोयना जलाशयामधून सोडले जावे. तसेच महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून तीन टीएमसी पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या जाव्यात. पाच टीएमसी पाणी जून महिन्यामध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.