रंगपंचमीनिमित्त विविध रंगाची उधळण होते. मात्र, सोलापुरात रंगपंचमीपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रंगबदली झाली आहे. अकलूजचे मोहिते-पाटील, माजी आमदार दिलीप माने, रश्मी बागल तसेच कोमल ढोबळे यांनी आपले राजकीय रंग बदलले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून विविध छोट्या पक्षांना एकत्र करत बचावात्मक पवित्रा घेतल्याने देशातील राजकीय समीकरणे अचानक बदलली गेली. यामुळे मागील पाच वर्षांत भाजपमध्ये सुरू असलेले इनकमिंग थांबले आणि आपापल्या सोयीनुसार नवी समीकरणे मांडली जाऊ लागली. याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातही दिसून येत आहे.
माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी घोषित करताच अकलूजकरांनी बंडाचे निशान फडकावले. अशात फलटनहून रामराजे नाईक-निंबाळकरांची साथ मिळाली. सलग दुसऱ्यांना माढा मतदारसंघात जिल्ह्यातील चार तालुके असताना अवघ्या दोन मतदारसंघाचा समवेश असलेल्या सातारा जिल्ह्याकडे खासदारपद जात असल्याच पाहून अकलूजकरांनी ‘आपला माणूस’चा नारा दिला. भाजप निंबाळकरांची उमेदवारी बदलत नाही, असे दिसताच मोहिते-पाटील परिवाराने हाती तुतारी घेतली आहे. आता भाजपकडून विधान परिषदेचे सदस्य मिळविलेल्या विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या समोर मात्र धर्मसंकट उभारले आहे.
सुरवातीला अपक्ष म्हणून आमदार झालेल्या दिलीप माने यांच्या घरी वडिलोपार्जित काँग्रेसची परंपरा आहे. पुढे दिलीप माने काँग्रेसमध्ये स्थिरावले. मात्र, सहकारक्षेत्रात शरद पवार यांच्या बरोबरीने वावरले. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, मार्केट यार्डात राजकीय जोडे बाहेर सोडत राष्ट्रवादीच्या बरोबर कायम राहिले. मध्येच शिवसेनेत जाण्याचा आत्मघातकी निर्णय घेतल्यावर मागील पाच वर्षाचा काळ विजनवासात काढावा लागला. त्यांनतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपल्या मूळ ठिकाणी घरवापसी केली आहे. मूळ पंरपरा काँग्रेसची असल्याने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हाच माने यांचा रंग होता. मध्येच भगवा रंग प्रिय झाल्याने आता जुना रंग पुसून नवा रंग खेळण्यास माने यांना कितपत यश येते, यावर त्यांची विधानसभेची रंगपंचमी अवलंबून आहे.
करमाळ्याचे बागल घराणे मुळात शेतकरी कामगार पक्षाचे होते. काळ बदलेल तसा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा आधार त्यांनी घेतला. यामध्ये आतापर्यंत शेकाप- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप, शिवसेना पुरस्कृत ते शिवसेना असा सर्व पक्षामध्ये फिरून त्यांचे राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे. २०१९ मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर आपण कोणत्या शिवसेनेचे आहोत हेच त्यांनी जाहीर केले नाही. दरम्यान, एकाच वेळी ठाकरे गट व शिंदे गट दोघांना ताटकळत राष्ट्रवादीशीही जवळीक साधली. इतके सर्व झाल्यानंतर रश्मी बागल यांनी भाजपचा आश्रय घेतला आहे. सर्व रंग खेळणारे बागल घराणे हे जिल्ह्यातील एकमेव राजकीय घराणे असेल.
शरद पवार यांचा हात धरून काँग्रेसमधून राजकीय कारर्किर्दीला प्रारंभ केलेले लक्ष्मणराव ढोबळे राष्ट्रवादीत मोठे झाले. एक प्राध्यापक ते शिक्षणमंत्री असा पल्ला गाठला. ज्या दिवशी शरद पवार पुरोगामी विचार सोडतील तेव्हाच मी शरद पवारांना सोडणार, असे छातीठोकपणे सांगणारे ढोबळ सर कधीतरी भाजपचा झेंडा हाती घेतील, असे कुणी स्वप्नातही मान्य केले नसते. मात्र, एक दिवस ढोबळे भाजपवासी झाले. प्रवक्ते पदापलीकडे भाजपकडून काहीच न मिळाल्याने तिथेही ते नाराजच आहेत. आता कन्या कोमल ढोबळे यांनी बीआरएससह अनेक ठिकाणी राजकीय रंगबाजी केली. अखेर त्यांनी पुन्हा शरद पवार यांचे स्टेट्स ठेवणे सुरू केले. मात्र, राजकीय रंगबदलीत त्यांचे स्टेट्स ढासळतच चालले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.