सोलापूर : अहिंसा, जगा आणि जगू द्या या तत्त्वावर जैन धर्माची उभारणी झालेली आहे. या धर्मातील तत्त्वानुसार सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यात खूप वर्षांपासून जैन धर्म असल्याचे पाहायला मिळते. जिन या नावाने ओळखला जाणारा हा धर्म पुढे जैन झाला. सोलापूर शहरात प्राचीन जैन मंदिरे आहेत.
त्यातील काही बिगर जैन असणाऱ्या नागरिकांना दृष्टांत होऊन त्याची निर्मिती झालेली आहे. तर काही स्वयंभू मंदिरेही आहेत. आज महावीर जयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील जैन मंदिरांचा घेतलेला धांडोळा...
जैन धर्मात तीन मुख्य संप्रदाय असून, त्यामध्ये दिगंबर, श्वेतांबर आणि स्थानकवासी असे तीन संप्रदाय आहेत. दिगंबर जैन संप्रदायात ही काही प्रमुख समुदाय आहेत, ज्यामध्ये पंचम, कासार, गुजर, चतुर्थ यांचा समावेश होतो. सोलापुरातील सर्वात प्राचीन जैन मंदिर म्हणून सध्याचे कुमठे येथील जैन मंदिर ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास साधारण सातशे वर्षांपूर्वीचा असून, या गावाला पूर्वी ‘चंद्रगिरी’ म्हणून ओळखले जायचे. या ठिकाणी जैन धर्मीयांचे १२ वे तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू यांचे मंदिर आहे.
दक्षिण कसबा येथील लक्ष्मी मार्केट जवळील पार्श्वनाथ जैन मंदिर अतिप्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील कार्योत्सर्गी उभी नायक प्रतिमा श्री चिंतामणी पार्श्वनाथांची असून, ही प्रतिमा स्वयंभू आहे. मंदिराला कासार समुदायातील साधकांनी साधना केल्याने याला चिंतामणी जैन कासार मंदिर असेही संबोधले जाते.
जैन धर्मातील २३ वे तीर्थंकर हे भगवान पार्श्वनाथ यांचे हे मंदिर आहे. स्व. तात्या गोपाळ शेटे यांच्या पूर्वजांपैकी एकास दृष्टांत झाला की शमीच्या झाडाखाली जैन प्रतिमा आहे. त्या श्रावकाने तेथील जमीन उकरली असता प्रतिमा प्रकट झाली व ती प्रतिमा सुरक्षित ठिकाणी ठेऊन दिली. परिस्थिती सुधारल्यानंतर प्रभू मंदिर मी बांधील असा निश्चय त्यांनी केला व त्याप्रमाणे ज्या ठिकाणी भगवान पार्श्वनाथ यांची प्रतिमा प्रकट झाली.
जोडभावी पेठेतील या श्वेतांबर पंथीय जैन मंदिरास येत्या २७ एप्रिल रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या मंदिरातील श्री आदिनाथ प्रभू, श्री मुनिसुव्रत स्वामी व श्री नमिनाथ प्रभू यांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेस ३३४ वर्षे पूर्ण होत आहेत, हे मूर्तीवर लिहिलेल्या लेखातून प्रतीत होते.
शुक्रवार पेठेतील भगवान आदिनाथ यांचे हे मंदिर आहे. हुंमड समाजातील प्रमुख तत्कालीन नगरशेठ हरिभाई देवकरण गांधी घराण्यातील पूर्वजांनी शुक्रवार पेठ येथे जागा खरेदी करून हे मंदिर बांधले. मंदिर जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर देवाधिदेव मूलनायक श्री १००८ भगवान आदिनाथ यांचे मंदिर आहे.
या ठिकाणी भगवान अरहनाथ यांचे रत्नत्रय मंदिर जोडूनच असून, या दोन्ही मंदिरांना मिळून जोडमंदिर असेही संबोधतात. या मंदिरात असणाऱ्या भुयारातील श्री पार्श्वनाथ भगवंताच्या विशाल प्रतिमेची स्थापना देखील सन १९०५ मध्ये म्हणजेच मूळ मंदिराच्या प्रतिष्ठापनेवेळीच झाली आहे.
चाटी गल्लीतील मंदिराचे पूर्ण बांधकाम दगडी, असून गर्भगृह देखील दगडीच बांधण्यात आले आहे. या मंदिरात वर खाली अशी दोन वेदी आहेत. मुख्य मंदिरात मध्यभागी मूलनायक भगवान आदिनाथ यांची प्रतिमा असून, त्यांच्या उजव्या बाजूस भगवान महावीर यांची व डाव्या बाजूस भगवान शांतीनाथ यांची प्रतिमा आहे. हे मंदिर नरोबा अण्णा बुबणे यांनी बांधकाम करून समाजास अर्पण केलेले आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम आतून व बाहेरून दगडी असून त्याचे काम १८९४ साली करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.